ठाणे शहराच्या कोपरी उड्डाणपुलावर क्रेन कोसळणे, माजिवडा चौकात रस्ता खचणे, घोडबंदर रोडवरील खोळम्बलेली सेवारस्त्यांची कामे, तसेच शहरभर या ना त्या कारणाने खोदून ठेवलेल्या अनेक रस्त्यांमुळे प्रचंड वाहतूककोंडी होत असताना त्याचे बिल पोलिसांच्या वाहतूक शाखेवर फाडले जात असल्याने वाहतूक पोलिसात काहीसा असंतोष असल्याचे दिसून आले. गेले आठदहा दिवस अगदी सॅटिस पुलापासून ते वाघाबिळ आणि कोलशेतपासून उलट ठाणे रेल्वेस्थानक व्हाया कोपरी, आनंदनगर आदी भागात फिरून जे दृश्य व माहिती समोर आली ती ठाणे शहराच्या दृष्टीने कुठल्याही परिस्थितीत योग्य नसल्याचे मत झाले आहे.
खचला कुठे हे कळले नाही
उदाहरण द्यायचे झाले तर सुमारे १५ दिवसांपूर्वी माजिवडा चौकात उड्डाणंपुलाखालील रस्ता खचला व अचानक शहराला वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. रस्ता खचणे हे जरी नैसर्गिक असले तरी तो नेमका कुठे खचला आहे (किमान आसपास तरी ) महापालिकेच्या अभियंत्यांना कळायला हवे होते. हल्ली तंत्रज्ञान इतके प्रगत झालेले आहे की त्यामुळे रस्ता नेमका कुठे खचला हे कळू शकते. परंतु पालिकेच्या अभियंत्यांनी अंदाजपंजे बुद्धी लढवून एका ठिकाणी काम सुरु केले. ते करत असताना त्यांना कळले की, अरे, येथे नव्हे तेथे खचला आहे. झाले.. पुन्हा दुसरीकडे खणणे सुरु करण्यात आले. यात तब्बल चार दिवस गेले आणि वाहतूक पोलीस जनतेच्या व मालवाहू कंपन्याच्या शिव्या खात आहेत. या कामाच्या ठिकाणी भेट दिली असता रस्ता नीट करण्याचे काम जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आल्याचे दिसून आले. सर्व काही ठीक झाले तर उद्यापासून ही लेन वाहतुकीसाठी खुली केली जाईल असे समजते.

सेवारस्ता वर्षांपासून बंद
आर मॉल नजीकचा मानपाड्याला जाणारा सेवारस्ता गेले वर्षभर बंद आहे. रस्त्याचे बांधकाम सुरु असल्याचे सांगण्यात आले. पूर्वी मेट्रोच्या कामाचे कारण सांगितले जात असे. पण मेट्रोचे काम संपत आले तरी सेवारस्ता अजूनही बंदच आहे. तशीच परिस्थिती विहंग हॉटेलनजिकच्या सेवारस्त्यांची आहे. खरेतर राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी लक्ष घालून ते काम लवकर निपटायला हवे होते. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे ठाणे शहराकडे लक्ष जरूर आहे. अधूनमधून ते अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतात. पण कुणीही अधिकारी हलताना दिसत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे एकनाथरावांचा मवाळ स्वभाव! अधिकाऱ्यांची झाडाझडती घेऊन ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कामाला लावण्याची कधी नव्हे इतकी गरज आहे. आम्हाला तर असे वाटते की, पालिकेच्या अधिकाऱ्यांना रिफ्रेश कोर्सला पाठवण्याची वेळ आलेली आहे. बाबा आदमच्या शिक्षणावर किती वेळ निभाव लागेल. अपडेट होण्याची गरज आहे.
मुख्यमंत्र्यांनी मुक्कामाला यावे
मुख्यमंत्री देवाभाऊंनी मुख्य सचिवांना बरोबर घेऊन ठाणे शहरात एकदोन दिवसांचे शिबीर घ्यावे. त्यात केवळ वरिष्ठ अधिकारी नगरविकासाबाबत आपली स्पष्ट मते मांडतील. आतापर्यंत राजकीय नेत्यांचे ऐकत आलात. त्यांनी शहराचा कसा विकास झाला हे सांगितलेले आपल्यापुढे आहेच. आता अधिकाऱ्यांचे ऐकण्यापेक्षा येथे मुक्काम करू पाहावे. या मंथनातूनच शहर विकासाचा ‘अमृत’कलश बाहेर येईल. अखेर आपण सर्वचजण ‘उम्मीद पे जिते है!’ हेही करून बघूया!

