Homeन्यूज अँड व्ह्यूजठाणे पालिकेच्या बेसमेंटमध्ये...

ठाणे पालिकेच्या बेसमेंटमध्ये आहे ५० घमेली धूळ!

ठाणे शहरात संपूर्ण लोकमान्य नगर अगदी जुन्या बस डेपोपासून तो नव्या बस डेपोपर्यंत फेरफटका मारला असता रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेल्या दुचाक्या व रिक्षा यांना चकवत नागरिक कसे चालत असतील याचा विचारच न केलेला बरा. लोकमान्य नगरात तर एका ठिकाणी रिक्षा रांगेत उभ्या करून रस्ता अडवलेलाआहे. संतापाची बाब म्हणजे या बश्या रिक्षांपैकी अनेक रिक्षा एकतर कंडम झालेल्या तरी आहेत किंवा वर्षभरात त्यांना रस्ताच दाखवलेला नाही, अशा अवस्थेत आहेत. आपला परिसर कसा ठेवलेला आहे हे पाहण्यासाठी दिवंगत धर्मवीर आनंद दिघे रात्री-अपरात्री परिसराला भेट देत असत याची आठवण काही ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी करून दिली. पोलीस हवालदार वा वाहतूक पोलीस काही शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा परिसरातील स्वघोषित भाईमंडळी टारगट पोरांना हाताशी धरून ‘बवाल’ निर्माण करतात अशी तक्रारही काहींनी केली. महापौर शर्मिलाताईंनी या परिसराला भेट देऊन (न कळवता) परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

अलीकडेच ठाणे महापालिका मुख्यालयातील पत्रकारांच्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथराव म्हणाले होते की, पत्रकारांनी थंड वातावरणातून आता बाहेर पडून थोडे ‘गरम’ झाले पाहिजे. म्हणजेच आता पालिका कारभारावर टीका करणारेही काहीतरी सडेतोड लिहा. उपमुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा सरळ अर्थ कारभारावर टीका करा, असाच होतो. ठाणे महापालिकेच्या कारभारावर टीका करायलाही हजार गोष्टी सहजी सापडतील. त्याही अगदी मुख्यालयाच्या इमारतीपासूनच! इमारत परिसराचे सोडा. पण इमारतीच्या आतही सर्वत्र धूळच

दिसते. बेसमेंटमध्ये तर आरामात ५० घमेली धूळ केव्हाही मिळू शकते. पत्रकार कक्षाशेजारील प्रसाधनगृहातील नळच कुणीतरी काढून घेऊन गेलेले आहेत. इमारत परिसरातील रस्ते व पदपथही म्हणावे तसे नाहीत. समतल हा शब्द महापालिका अभियंत्यांना जणू माहीतच नसावा, इतके शहरातील रस्ते उंचसखल आहेत. उदाहरण म्हणून गावदेवी व गोखले रस्ता परिसरातील रस्त्याचे घेता येईल. मी पैज लावायला तयार आहे की, या दोन्हीपैकी किमान दोन फूट रस्ता खड्ड्याविना दाखवावा व माझ्याकडून २०० रुपये घेऊन जावेत. (गरीब श्रमिक पत्रकार इतकेच देऊ शकतो.) पदपथाची अवस्था तर शहरभर दुर्दशा या शब्दानेच व्यक्त करावी लागेल.

माजी मुख्यमंत्री व आजी उपमुख्यमंत्र्यांच्या वागळे इस्टेट, किसन नगर वा विस्तारित सावरकर नगरातील अवस्था तर अधिक बिकट आहे. विस्तारित सावरकर नागराच्या आधी असलेल्या लोकमान्य नगरात तर पार्किंग केलेल्या गाड्या व बाईक्स पायी नागरिकांचे चालणे मुश्किल झाले आहे. कंडम झालेल्या रिक्षाही अनेकांनी दुर्मिळ वस्तू सांभाळाव्या तशा बाळगल्या आहेत. वानगीदाखल वर उल्लेख केलेले दोनच भाग व त्यातील ही काही अंश दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अन्यथा कोपरीपासून ते वाघबीळपर्यंत तसेच बाळकूमपासून वर्तकनगरपर्यंतचे अनेक भाग असे काढून दाखवता येतील की, जणू काही महापालिका प्रशासनाचे अस्तित्त्वच नाही. बाळकूममधील अशोकनगर भागात तर केव्हाही जा तुमचे स्वागत कचऱ्याच्या ढिगानेच होईल. घोडबंदर रोडवरील शेकडो इमारतीत नियमित पाणीपुरवठाच होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. तक्रारींचा पाढा तरी वाचू किती? घशाला कोरड पडेल…

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

एक संध्याकाळ ‘बर्वे संचित’च्या सानिध्यात!

ही संध्याकाळ कधीच विसरता येणारी नाही. (संध्याकाळ हा शब्द वाचला की काही रोमँटिक असं वाटेल, पण असं अजिबात नाही. पण, एका वेगळ्या अर्थाचा 'रोमान्स' जरूर आहे.) गर्दीच्या ठिकाणचे आपले रवींद्र नाट्यमंदिर संध्याकाळी फक्त गर्दीच नव्हे तर वाहतुकीच्या प्रचंड कोंडीसाठीही...

ठाणे शहरातल्या वाहतूककोंडीचे बिल पोलिसांच्या वाहतूक शाखेवर!

ठाणे शहराच्या कोपरी उड्डाणपुलावर क्रेन कोसळणे, माजिवडा चौकात रस्ता खचणे, घोडबंदर रोडवरील खोळम्बलेली सेवारस्त्यांची कामे, तसेच शहरभर या ना त्या कारणाने खोदून ठेवलेल्या अनेक रस्त्यांमुळे प्रचंड वाहतूककोंडी होत असताना त्याचे बिल पोलिसांच्या वाहतूक शाखेवर फाडले जात असल्याने वाहतूक पोलिसात...

मदिरा व मदिराक्षी! पोलीस अधिकाऱ्यांचे डोंबिवलीच्या वेशीवर ‘मै टल्ली हो गयी..’

डोंबिवलीनजिकच्या शीळ फाट्यावरून डोंबिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडले नावाचे सुंदर गाव आहे. गावात अजून बऱ्यापैकी निसर्ग शाबूत आहे. उंच इमारती आहेत. पण उंची गगनाला वेसण घालण्याइतपत नाही, ही जमेची बाजू! हे पडले गाव सुरु होताच मुक्ता नामक विकासकाची ओळख व्हायला...
Skip to content