Homeमाय व्हॉईस'केइएम'मध्ये मदत कक्षालाच...

‘केइएम’मध्ये मदत कक्षालाच हवी मदत! तपासायला डॉक्टर मिळाला तर उत्तमच!!

मुंबई महापालिकेच्या प्रमुख समजल्या जाणाऱ्या केइएम रुग्णालयात डॉक्टरांसहित कर्मचारी-कामगारांमध्ये सुमारे २० टक्के इतकी मोठी कपात करण्यात आली असून मोडकळीस आलेले स्ट्रेचर्स वगैरे सामान गोदमात ढकलून देण्यासाठीही कामगार नसल्याची संतापजनक माहिती हाती आली आहे. अपघात विभागातील डॉक्टरांची संख्या तर एक-दोन डॉक्टरांवर आल्याचे मी स्वतः पाहिलेले आहे. संध्याकाळी सहा वाजल्यानंतर रुग्णांची संख्या वाढत असताना तेथे केवळ एकच डॉक्टर हजर होता. आता बोला! तेथे खुर्च्या आणि डेस्कटॉप चार होते. अर्थात एक सोडून सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या.

मदत कक्षालाच मदत हवीय

काल संध्याकाळी सुमारे साडेचार वाजल्यापासून सुमारे दोन-अडीच तास रुग्णालयात व त्या परिसरात घालवल्यानंतर हेच का ते एकेकाळचे प्रसिद्ध केइएम रुग्णालय, असा प्रश्न पडावा इतकी परिस्थिती बिघडली असल्याचे लक्षात आले. रुग्णालयात प्रवेश करताच एक काहीसा चकाचक ‘मदत कक्ष’ समोर येतो. तो बंद असतो. पण, काचेतून तेथे आधुनिक उपकरणे दिसतात.. हायसे वाटते. आजूबाजूला विचारतो की, कक्षातली व्यक्ती कुठाय? माणसे सांगतात- माहित नाही, आम्ही तरी पाहिली नाही. एका कामगारला विचारले तर तो म्हणाला ‘अंगठा’ दाखवल्यानंतर ते कशालाच अंगठा दाखवतात! (बायोमेट्रिक हजेरी लावली की ते गुल होतात.) जवळच उलटी करून ठेवलेली एक व्हिलचेअर व स्ट्रेचरकडें पाहून विचारणा केली असता तो म्हणाला, साहेब कंत्राटदाराने माणसेच भरलेली नाहीत. अनेकांची कंत्राटे रिन्यूच केली नसल्याने संपूर्ण रुग्णालयात कामगार-कर्मचारीच नव्हेत, तर डॉक्टरांचीही कमतरता आहे. सुमारे २० टक्के कामगार-कर्मचारी आणि डॉक्टरांची भरतीच होत नसल्याने अर्थात कमतरताच आहे.

कमतरता जाते ५० टक्क्यांवर

आता पाहा. मुळात २० टक्के भरती नाही म्हणजे उरलेल्या तुटपुंज्या मनुष्यबळात सर्वांच्या रजा, ऐनवेळी मारलेल्या दांड्या, आजारपणाची रजा, हक्काच्या साप्ताहिक सुट्ट्या वगैरे लक्षात घेतल्या तर एकूण मनुष्यबळाच्या ५० टक्केच माणसे कामासाठी उपलब्ध असतात. आता मला सांगा, हे ५० टक्के कामगार-कर्मचारी व डाक्टर्स कमी आहेत तर रुग्णालय चालणारच कसे? रुग्णालयाचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्रशासकीय अधिकारी, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब माहित नाही की कुणी मुद्दामहून स्वतःची कॉलर टाईट करण्यासाठी मुख्यालयात कळवलेच नाही? याची शहानिशा होणे गरजेचे आहे, कारण हल्ली एक नवीनच ट्रेंड सुरु झालेला आहे की, ‘बघा साहेब, आम्ही कमी माणसातही कामे उरकून घेतो.’ आमचे काय ‘ते’ बोला.

केइएम

समोरचा पदपथ गलिच्छ

रुग्णाल्यासमोरचा तसेच आजूबाजूचा परिसरही म्हणावा तितका स्वच्छ व साफसुथरा दिसला नाही. समोरच्याच पदपथावर खाऊ गल्ली आहे. तेथील गटाराचे चेंबर फुटलेले दिसलें तर बाजूला असलेल्या इमारतीतही लिकेज असून त्याच्या बाथरूमचे पाणी इतस्तता पसरलेले दिसलें. बिस्लेरी पाण्याचे पॅक्सही अनेक ठिकाणी पदपथावर दिसले. दादाभाई चमारवाला लेनवरही अतिक्रमणे आहेत. मेरवानजी मार्गावरील पदपथावर तर एकाने सलूनच थाटलेले आहे व तेही उघड्यावर! रुग्णालय परिसर स्वच्छ असावा इतकी माफक अपेक्षा जनतेने करू नये का? परंतु आपल्या लोकप्रतिनिधींना वा प्रशासनालाही तशी अपेक्षा नसावी याचा खेद वाटतो.

एमआरआय यंत्र बंदच!

एमआरआय यंत्र गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याच्या वृत्ताचा इन्कार केलेला असला तरी यंत्र बंद आहे, याचा पुरावा मी स्वतः आहे. त्या यंत्राची मुदत संपल्याचे मात्र मान्य करण्यात आले. माझ्या माहितीनुसार रुग्णालयात दोन यंत्रे आहेत. या दोनपैकी कुठले ना कुठले यंत्र नेहमीच बंद असते. गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी पाहिली तर या तीन वर्षात सुमारे दीड वर्षे एखादे यंत्र बंदच हॊते, असे अनुमान सहज काढता येईल. या वादात जास्त पडत नाही. परंतु वेळ येताच कधी यंत्र बंद होते, दुरुस्त करण्यात किती वेळ गेला, कपंनीने काय काय उत्तरं दिली, हेही तपशीलाने देण्याचा प्रयत्न नक्की करेन. “Healthy citizens are the greatest asset any country we have” हे प्रसिद्ध वचन प्रशासन व सरकारने अवश्य लक्षात ठेवावे इतकेच.

“नजर जबसे तमाशाही हुई है।

जमाने भर मे रुसवाई हुई है।।

अशी गत व्हायला नको.

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

मुंबई बॉम्बस्फोटांचे मास्टरमाईंड अंमली पदार्थांच्या फॅक्टरीमागे?

मुंबईच्या आग्रीपाडा पोलीसठाण्याच्या समोरच्या बाजूसच असलेल्या घास गल्लीतील अमली पदार्थांचा कारखाना नार्कोटिक्स विभागाने उद्ध्वस्त केल्यानंतर गेले सुमारे पाच-सहा दिवस दक्षिणमध्य मुंबईतील अनेक भागांना भेटी दिल्यानंतर एक गोष्ट हळूहळू स्पष्ट होत आहे की, या अमली पदार्थांच्या व्यापार व कारखान्यांमागे मुंबईत...

आग्रीपाड्यातली ‘यास्मिन’ आणि पोलिसांचे ‘डोला रे डोला…’!

बुधवारच्या जवळजवळ सर्वच वर्तमानपत्रात 'आग्रीपाडा येथील ड्रग फॅक्टरी उद्ध्वस्त', अशी बातमी वाचली व मन एकदम भूतकाळात गेले. लगेचच मनाशी ठरवले, आज आग्रीपाड्यात जायचेच आणि गेलोही! आग्रीपाडा पोलीसठाण्याच्या दारातच उतरलो. आजूबाजूला नजर टाकली. प्रशस्त रस्ता, गगनचुंबी इमारती.. काही इमारती तर...

ठाणे पालिकेच्या गावदेवी मार्केटला ना ओसी, ना योग्य अग्नीसुरक्षा!

ठाणे शहरातील महापालिकेच्या गावदेवी मार्केटला आग लागून सर्व मार्केट आगीत भस्मसात झाल्याला आज आठवडा झाला असूनही मार्केट सफाईचे काम अत्यंत हळू सुरु असल्याबाबत गाळेधारकांनी संताप व्यक्त केला आहे. यांत्रिक झाडू वा आधुनिक पद्धतीने सफाई न करता बाबा आदमच्या काळाप्रमाणे...
Skip to content