Homeमाय व्हॉईसहॉटेल्स कचाट्यात तर...

हॉटेल्स कचाट्यात तर फेरीवाले मोकाट!

मुंबई शहर आणि राज्यातील काही प्रमुख शहरे लॉकडाऊनच्या सीमारेषेवर उभी आहेत. याचे साधे कारण कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत आहे. याला कारण नागरिकांचा हलगर्जीपणा हेच आहे. अनावश्यक गर्दी करणे, मास्क न घालणे, एकमेकांपासून दूर उभे न राहणे आदी अनेक कारणांमुळे कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. अशा वातावरणात हॉटेल्स, बार कचाट्यात सापडलेले दिसतात तर फेरीवाले मात्र मोकाट वावरताना दिसत आहेत.

कोरोनाचे संकट गंभीर असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वचजण सांगत आहेत आणि ते खरेही आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात हॉटेल्स, बार, मॉल आणि पब्सवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. ते योग्यही आहेत.

अगदी याचवेळी दोनच दिवसांपूर्वी दादर येथील एक स्नेही शाह यांनी त्या परिसरातील एक व्हिडिओ काढून मला पाठवला आहे. दादर रेल्वेस्थानकाच्या (प) जवळच असलेल्या केळकर मार्गावर बसलेले फेरीवाले यात दिसत असून त्यांनी एकमेकांत कोणतेच अंतर ठेवलेले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. इतकेच नव्हे तर अनेक फेरीवाल्यांच्या तोंडावर मास्क दिसतच नाही. याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे गिऱ्हाईक वर्गही फेरीवाल्याभोवती कोंडाळे करून माल विकत घेत आहे.

फेरीवाले गरीब वर्गातून येतात. त्यांचे पोट हातावर असते, हे मलाही मान्य आहे. त्यांच्यावर निर्बंध आणले तर त्यांच्या घरचे कसे होणार? तुम्ही इतके निष्ठुर कसे? आदी अनेक प्रश्नांचा भडिमार होईल, याची मला कल्पना आहे. काही फेरीवाल्यांचा अपवाद सोडून जर तुम्ही दादरच्या दोन्ही बाजूंना फेरफटका मारलात तर हे फेरीवाले गरीब आहेत हा तुमचा भ्रम खोटा ठरेल.

या फेरी धंद्याचे एक मोठे रॅकेट आहे. त्यात करोडो (पुन्हा कोटी) रुपयांची उलाढाल होते. एकट्या दादर भागात सुमारे 25/30 हजार फेरीवाले असावेत असा अंदाज एका जाणकाराने व्यक्त केला. राजकीय नेते, महापालिका आणि पोलीस यांना हप्त्यापोटीच एक ते सव्वा कोटी रुपये (माझा आपला मध्यमवर्गीय अंदाज.. नाहीतर आकाशाइतकी भरारी ठरलेलीच). एकदा तुम्ही या फेरीवाल्याच्या नोंदीत आलात की तुम्ही निवडाल त्या फूटपाथवर बिनदिक्कतपणे बसू शकता.

पोलिसांना आणि पालिकेला डरना नही! असं लीडरच बजावतो. झालं, मग तुमचा धंदाही सुरू आणि रातीबही सुरू. ज्यांना महिन्याचा हप्ता मोठा वाटतो त्यांच्यासाठी सवलत म्हणून रात्री नऊ, सव्वानऊच्या सुमारास भाईका आदमी वसुली के लिये आता है! अशीच परिस्थिती कमीअधिक प्रमाणात ठाणे, कल्याण, नवी मुंबई आदी मुंबईच्या आजूबाजूला असलेल्या नवीन शहरांमध्ये आहे.

मुंबईतही फेरीवाल्यांमध्ये परप्रांतीयांचे प्रमाण बरेच आहे. तरी काही भागात मराठी टक्का दिसतो. ठाणे शहरात मात्र असे मुळीच नाही. कारण येथील फेरीवाल्यांचा धंदा 80/85 टक्के उत्तर भारतीयांच्या हातात आहे. हरिनिवास परिसरातील फुलांचा व्यवसाय तसेच ढोकाली नाका परिसरातील भाजीचा व्यवसाय एकहाती उत्तर भारतीयांच्या हातात आहे. त्यांच्या हातात गेल्याचे दुःख नाही. परंतु एकही नियम ही मंडळी पाळत नाहीत.

सुकूर गार्डन या इमारतीबाहेरील फूटपाथवर कायमची व्हेदर शेड टाकून एका महाभागाने तीन हात गाड्यांचा परिसर व्यापला आहे. आता बोला. ठाण्यातील कोर्ट नाक्यावरून पेढ्या मारुतीकडे चालत गेलात तर फेरीवाल्यांचा सागरच दिसेल. बॅरिकेड्स लावून धंदा करणारेही अनेक जण आहेत. गेल्या सात आठ दिवसांपासून सरकार सतत ओरडून, विनवण्या करून सांगत आहे की निर्बंध पाळा. पण मुंबईतील फेरीवाले तसेच ठाणे आणि अन्य भागातील फेरीवाले कोठलाच निर्बंध पाळायला तयार नाहीत, हे मी डोळ्यांनी पाहिले आहे. फेरीवाल्यांच्या नेत्यांनी तरी आता बिळातून बाहेर पडून आपल्या फेरीवाल्यांना समजवावे.

दादर परिसरात अजून एक मजेशीर हकीकत कानावर पडली. ती अशी. या परिसरातील अनेक दुकानदार या फेरीवाल्यांचे आश्रयदाते आहेत. त्या परिसरातील लढाऊ नेत्याने फेरीवाल्याविरुद्ध आंदोलनही केले होते. परंतु त्याचा काही एक परिणाम झाला नसल्याचे फेरफटक्यात दिसून आले. जहाँ भी देखो फेरीवाले.. फेरीवाले.. असे झाल्याने सर्व नागरिकांना रस्त्यावरूनच चालावे लागते आणि त्यात दादर येथील प्रचंड वाहतूक, फूटपाथवर जेमतेम अर्धा फूट जागा चालायला मिळते.

त्यात दादर हे मार्केट प्लेस असल्याने दिवसभर व रात्री उशिरापर्यंत गर्दीच गर्दी असते. माझे तर मुंबई व ठाणे शहरातील पोलीस व महापालिका आवाहन राहील की, आठवड्यातील एक-दोन दिवस तर कोणताही लवाजमा किंवा सुरक्षा न घेता दादर व ठाण्यातील मार्केट परिसरात फिरून दाखवा आणि कुटुंबाच्या प्रतिक्रिया जाहीर करा. या दोन्ही शहरातील पालकमंत्र्यांनीही जरा लाल दिव्याची गाडी सोडून खासगी टॅक्सीने मार्केट परिसरात फेरफटका मारण्याची गरज आहे. ठाणे स्थानकांच्या दोन्ही बाजू रिक्षावाल्यांनी बजबजपुरित परिवर्तीत केल्या आहेत. फेरीवाल्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्याची वेळ आली आहे. कारण दादर भागात एका घरात दहा-दहा फेरीवाले आहेत. आज इतकेच..

Continue reading

येथे प्रत्येक छायाचित्र बोलते…

"For me the subject of the picture is always important than the picture" हा सुविचार दिवंगत छायाचित्रकार रजनीश काकडे यांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनात प्रकर्षाने जाणवत होता. रजनीशला आदरांजली वाहण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या...

‘एशियाटीक’ची निवडणूक जूनमध्ये तरी होणार? दोन्ही बाजूंच्या सदस्यांत घुसखोर!

मुंबईतल्या एशियाटीक लायब्ररी, या प्रतिष्ठित संस्थेची निवडणूक 'घुसखोर' सदस्यांशिवाय जून महिन्यात घेण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला असला तरी ती जूनमध्येच होईल की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. कारण नव्याने निवडल्या जाणाऱ्या कार्यकारिणीची मुदत केवळ सप्टेंबर...

ठाणे पालिकेच्या बेसमेंटमध्ये आहे ५० घमेली धूळ!

ठाणे शहरात संपूर्ण लोकमान्य नगर अगदी जुन्या बस डेपोपासून तो नव्या बस डेपोपर्यंत फेरफटका मारला असता रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेल्या दुचाक्या व रिक्षा यांना चकवत नागरिक कसे चालत असतील याचा विचारच न केलेला बरा. लोकमान्य नगरात तर एका ठिकाणी...
Skip to content