यशवंत दिनकर फडके उर्फ य. दि. यांचा पहिला एन्काऊंटर सुमारे 50 वर्षांपूर्वी चर्चगेटजवळील केसी महाविद्यालयात ‘बॉम्बे कॉलेज ऑफ जर्नालीझम’च्या वर्गात झाला. त्यांचा विषय अर्थातच राजकारण, खास करून महाराष्ट्रातील राजकारण असा होता. काही काळानेच पत्रकारितेत रीतसर प्रवेश झाल्यावर मात्र विविध चर्चा, पुस्तकप्रकाशन समारंभ, साहित्यविषयक कार्यक्रम या सर्वात त्यांची भेट होतच गेली. त्यांची काही पुस्तकेही घेतली व त्यांच्या वाचनाने त्यांच्या प्रेमातच पडलो. प्रश्न व उत्तरपक्ष, दोन्ही बाजू घेऊन ते किल्ला लढवायचे. परंतु, गोम अशी असायची की, य. दि. कुणाच्या बाजूचे आहेत, हे नेमके कळू द्यायचे नाहीत. हीच तर सापेक्षी इतिहासाकाराची खरी ओळख!
य. दिं.ची आठवण व्हायला त्यांच्या सुविद्य पत्नी वासंती फडके यांनी लिहिलेल्या ‘य दि : एक स्मरण’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवारी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहलयात झाला. अक्षर प्रकाशनाने हा कार्यक्रम सुरेख आयोजित केला होता. एक शनिवार : य. दिं.ची स्मरणगाथा ऐकताना धन्य जाहलो. गेल्या 50 वर्षांत त्यांची विविध रूपे पाहिली होती. हा इतिहासच डोळ्यामोरून सरकला. पाऊस असतानाही या समारंभाला श्रोत्यांनी मोठा प्रतिसाद दिला हे महत्त्वाचे. या समारंभास दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, दीपक परब, अरुणा पेंडसे व स्वतः वासंतीबाई उपस्थित होत्या.

“या सर्व घडून गेलेल्या गोष्टी आहेत. त्या-त्या वेळेला त्यांची खंत वाटली. काही चांगल्या गोष्टीही अनुभवल्या. अखेरीस ते सगळे मागे सारून पुढची वाटचाल करावीच लागेल..” अशा उचित शब्दांत मनोगत व्यक्त करून य. दि. कसे शिस्तीने काम करत असत, याच्या काही आठवणी वासंतीबाईंनी सांगितल्या. य. दिं.चे सुपुत्र अनिरुद्ध यांनीही आपल्या बाबांच्या आठवणी सांगितल्या. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष असताना सरकारने दिलेली गाडी सरकारी कामासाठीच ते कसे वापरत असत, याची माहितीही त्यांनी आजच्या परिस्थितीत सांगितली.
“As a historiyn I have spent much of my carrer warning people about dangers of nostalgiya” या वचनाप्रमाणे य. दि. यांनी इतिहास व समाज इतिहास अभ्यासला. “अखेर हा सारा उद्योग मी आपल्याभोवतीच्या समाजाचे आपल्या परीने आकलन करून घेण्यासाठी आणि आपल्या फावल्या वेळात एखाद्या ज्ञानक्षेत्रात रमण्यासाठी, आपल्या आनंदासाठी चालवलेला आहे.” असे स्पष्ट मत ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्रात’ त्यांनी व्यक्त केले आहे. या मताशी त्यांनी अखेरपर्यंत इमान राखले हे मान्यच करावे लागेल. या पुस्तकप्रकाशन समारंभप्रसंगी माजी कुलगुरू मुणगेकर यांनी ‘आजचा महाराष्ट्र वैचारिकदृष्ट्या दरिद्री’ असल्याचे सांगून राज्याकर्त्यांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. मर्यादित अर्थाने हे विधान खरे असेलही. पण मग तुम्हीही राज्यकर्ते होतातच ना कधी काळी… फार नाही 10/15 वर्षांपूर्वी आपणही होता राज्यगादीवर!
एकूणच समाजात एक-एक संस्था सुलभीकरणाकडे ओढली जात असताना ‘आजच्याच’ विचाराला प्राधान्य दिले जात असताना ‘नीरक्षीर’ विचार करायला समाजाकडे तरी वेळ आहे का?
(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

