Homeचिट चॅटदेवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त झाला...

देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त झाला ‘पैलवान दत्तक योजने’चा शुभारंभ

महाराष्ट्राच्या मातीने देशाला असंख्य मल्ल दिले; मात्र गरिबीमुळे अनेक गुणी पैलवानांची स्वप्ने आखाड्याबाहेरच थांबली. हीच परंपरा मोडून काढण्याचा निर्धार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (युडब्ल्यूएफआय) आणि देवाभाऊ केसरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘पैलवान दत्तक योजना २०२६-२७’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मंगळवारी मलबार हिल येथील सेवा सदन बंगल्यावर शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ११ होतकरू पैलवानांना दत्तक घेत त्यांना शिष्यवृत्ती, मानधन आणि क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे मागे पडणाऱ्या प्रतिभावान मल्लांच्या स्वप्नांना आता भक्कम आधार मिळणार आहे.

या ११ मल्लांवर विश्वासाची मोहोर

या योजनेत सोहम कुंभार, ज्ञानवी पाटील, संग्राम खुर्द, रणवीर जाधव, श्रीकर नायकवडी, वैष्णवी पाटील, वीरेन पाटील, हर्षल घाटके, विश्वजीत सावंत, पियुष शेवाळे आणि व्यंकटेश चोरगे या ११ होतकरू पैलवानांची निवड करण्यात आली. आर्थिक आधारासह दर्जेदार प्रशिक्षणासाठी हा उपक्रम त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

५० पैलवान दत्तक घेण्याचा निर्धार

मार्गदर्शन करताना गिरीश महाजन म्हणाले की, महाराष्ट्राला कुस्तीची समृद्ध परंपरा लाभली आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक गुणवंत खेळाडू आर्थिक अडचणींमुळे मोठ्या संधींपासून दूर राहतात. ही केवळ आर्थिक मदतीची योजना नसून युवा पैलवानांच्या स्वप्नांना बळ देणारी सामाजिक चळवळ आहे. उद्योग क्षेत्र, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने भविष्यात ५० पैलवान दत्तक घेण्याचा आमचा मानस आहे. निवड झालेल्या पैलवानांनी शिस्त, कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर महाराष्ट्रासह देशाचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे.

गरीबीमुळे स्वप्ने थांबता कामा नयेत

युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष काझी अब्दुल मतीन यांनी सांगितले की, या योजनेत निवड झालेली बहुतांश मुले शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गुणवंत खेळाडूची स्वप्ने अपूर्ण राहू नयेत, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. नव्या पिढीतील होतकरू पैलवान घडविणे हे आमच्या फेडरेशनचे ध्येय असून ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

ग्रामीण कुस्तीला मिळणार नवे बळ

देवाभाऊ केसरी फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित पटेल म्हणाले की, ही फक्त शिष्यवृत्ती योजना नाही. ग्रामीण भागातील कुस्ती संस्कृतीला नवसंजीवनी देणारा हा उपक्रम आहे. समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेतल्यास महाराष्ट्रातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान घडू शकतात. भविष्यात या योजनेचा विस्तार अधिक व्यापक स्वरूपात केला जाईल.

शाहू महाराजांच्या विचारांना आधुनिक सलाम

युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव दत्तात्रय जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात तसेच त्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी पैलवानांना दत्तक घेऊन त्यांना आर्थिक आधार दिला. त्याच प्रेरणेतून आधुनिक काळात ही संकल्पना नव्याने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील होतकरू मुलांना दर्जेदार प्रशिक्षण, पोषण आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरेल.

दिग्गज मल्लांची उपस्थिती

या सोहळ्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव (पोलीस उपायुक्त, मुंबई), ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी (सहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई) तसेच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

निवड समितीची महत्त्वपूर्ण भूमिका

या योजनेसाठी भिमराव पाटील, समिंदर जाधव, रामदास देसाई, ज्ञानेश्वर आस्वले, जालिंदर देशमुख, संजय जाधव, राहुल जाधव, आनंदा पाटील आणि अभिजित पाटील यांनी निवड समिती सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

‘उधार का उजाला’चे गुरुवारी प्रकाशन

सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित आणि कवयित्री प्रज्ञा जांभेकर लिखित ‘उधार का उजाला’, या हिंदी कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ येत्या गुरुवारी, ३० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुंबईतल्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि या कवितासंग्रहाचे...

जाणून घ्या, गुरू आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व!

उद्या आषाढ पौर्णिमा; म्‍हणजेच साधक, शिष्‍य ज्‍या दिवसाची अत्‍यंत आतुरतेने वाट पाहत असतो, तो गुरुपौर्णिमेचा मंगलमय दिवस! शिष्‍याच्‍या संपूर्ण जीवनाला व्‍यापून राहिलेल्‍या सर्वशक्‍तीमान आणि सर्वज्ञ गुरूंच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी, साधनेचे पुढील ध्‍येय गाठण्‍याचा निश्‍चय करण्‍यासाठी हा दिवस साधक...

एसआयआरसाठी लागणारी माहिती जमा करा ८ ऑगस्टपर्यंत

महाराष्ट्रात सध्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून, सध्याच्या मतदारयादीतील सर्व मतदारांनी येत्या ८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरून त्यावर स्वाक्षरी करून गृहभेटीला येणाऱ्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले...
Skip to content