Homeन्यूज ॲट अ ग्लांसनोव्हेंबरपासून राज्यात हवामान...

नोव्हेंबरपासून राज्यात हवामान कोरडे; मात्र 3-4 दिवस पावसाचेच!

यंदा उन्हाळ्यातच आलेला पाऊस हिवाळा सुरू झाला तरी मुक्काम हलवायला तयार नाही. मान्सून संपला; पण मान्सूनोत्तर अवकाळी पावसाचा खेळ अजूनही सुरूच आहे. आता बंगालच्या उपसागरातील मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तसेच ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात पाऊस सुरू आहे. तो ऑक्टोबर अखेरपर्यंत, आणखी 3-4 दिवस धुमशान माजवणार आहे. हा पाऊस रब्बीला उपयुक्त असला तरी लोकं आता पावसाला वैतागली आहेत. शेवटी, ऑक्टोबरबरोबरच हा नकोसा झालेला पाऊस जाणार आहे. नोव्हेंबरपासून राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविली आहे.

सततच्या पावसानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात, 5 नोव्हेंबरपर्यंत पाऊस पूर्णतः थांबणार आहे. त्यानंतर राज्यातील हवामान कोरडे होण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. 6 नोव्हेंबरनंतर थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मात्र नागरिकांनी आणि विशेषतः मच्छीमारांनी सतर्क राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे. दमट हवामानामुळे, विशेषत: दुपारनंतर संध्याकाळच्या सुमारास जोरदार सरी कोसळू शकतात. राज्याच्या काही भागात विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

मोंथा चक्रीवादळ तीव्र, आज रात्री आंध्रात धडकणार

बंगालच्या उपसागरात मोंथा चक्रीवादळ तीव्र होत आहे. 90-110 किमी/प्रतितास एव्हढ्या प्रचंड वेगवान वाऱ्यांसह मोंथा चक्रीवादळ आज रात्रीपर्यंत आंध्र प्रदेशातील कोनासीमा-काकीनाडा किनाऱ्यादरम्यान धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, ओडिशासह अनेक राज्यात येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात समुद्र अत्यंत खवळलेला राहण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीलगतच्या भागातही काही ठिकाणी ताशी 50-55 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. राज्याच्या बहुतांश भागात 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने झोंबणारा वारा राहण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रातही तीव्र कमी दाब क्षेत्र सक्रीय

अरबी समुद्रात, मुंबईच्या नैऋत्यला 400 किलोमीटरवर असलेले कमी दाब क्षेत्र आता कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात रूपांतरित झाले आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह दक्षिण-पश्चिम व उत्तर-मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. अरबी समुद्रातील हे तीव्र कमी दाब क्षेत्र, मुंबईपासून दूर उत्तर व ईशान्यकडे मार्गक्रमणाची शक्यता आहे. एकूणच मोंथा चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात, तर अरबी समुद्रातील हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रातही पुढील 3-4 दिवस पावसाची शक्यता आहे.

आज राज्यातील “या” जिल्ह्यात पावसाचा अलर्ट

आज, मंगळवार, 28 ऑक्टोबर रोजी, मराठवाडा व खान्देशचा काही भाग वगळता मुंबई-कोकणासह उर्वरित संपूर्ण राज्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आजपासून विदर्भातील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. ताज्या आयएमडी अपडेट्सनुसार, “मोंथा”मुळे मंगळवारी गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट आहे. या काळात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याच्या अंदाज आहे.

29 ऑक्टोबर: विदर्भात ऑरेंज अलर्ट

बुधवार,  29 ऑक्टोबर रोजी विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आहे. तर, नाशिक, पालघर, ठाणे, अहिल्यानगर, पुणे, सातारा, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

30 ऑक्टोबर: धुळे, नंदुरबारमध्ये पावसाचा अलर्ट

गुरुवार, 30 ऑक्टोबर रोजी धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Continue reading

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १०...

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....
Skip to content