Homeब्लॅक अँड व्हाईटकाँग्रेसकडून यावेळी निष्ठावंत...

काँग्रेसकडून यावेळी निष्ठावंत नव्या चेहऱ्यांना संधी!

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. त्यामागे जनतेची भक्कम साथ होती. २०१९ला राज्यात काँग्रेसचा एकच खासदार होता. पण, २०२४मध्ये १४ खासदार झाले. लोकसभेला विजय मिळाला तशीच कामगिरी विधानसभेलाही करायची आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवणार आहे. ज्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली अशा निष्ठावान नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीत संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.

काँग्रेस

विधानसभा निवडणुकीच्या तयाराची आढावा बैठक व मराठवाड्यातील खासदार यांचा सत्कार सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे आज संपन्न झाला. त्यावेळी चेन्नीथला बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान आदी उपस्थित होते.

काँग्रेस

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगरसाठी २००० कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली, ती केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून. महायुती सरकार खोकेबाजच नाहीतर धोकेबाजही आहे. या लबाडांचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही. २०१४मध्ये देवेंद्र फडणवीसांनी धनगर, मराठा, आदिवासी समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले. पण १० वर्षं सत्ता असतानाही आरक्षण मात्र दिले नाही. भाजपा व फडणवीस यांनी जाती-जातीमध्ये भांडणे लावली आहेत. मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधी तुम्हाला न्याय देतील.

काँग्रेस

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकशाही व राज्यघटनेवर आघात होत असताना देशातील सर्वसामान्य माणूस काँग्रेस इंडिया आघाडीच्या पाठीशी उभा राहिला याची इतिहासात नोंद होईल. भारतीय जनता पक्षाला अहंकार झाला होता तो अहंकार जनतेने भेदून टाकला आहे. आता विधानसभा निवडणुकीलाही इतिहास घडवायचा आहे. खोके देऊन आमदार फोडून बनवलेले हे खोके सरकार भ्रष्टाचाराने माखलेले आहे. या सरकारचा भ्रष्टाचार विधानसभेत मांडला. पण सरकारने एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. या भ्रष्ट सरकारला घरी पाठवण्यासाठी विधानसभेला जास्तीतजास्त जागा निवडून आणा.

काँग्रेस

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी महायुती सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले की, भाजपाने लोकसभेला रामाच्या नावाने मते मागतिली. पण जेथे जेथे प्रभूरामाचा पावन स्पर्श झाला त्या-त्या जागी भाजपाचा पराभव झाला. महायुती सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे. ५ लाख कोटी रुपयांची टेंडर मंजूर करून त्यातून लूट केली आहे. एक एक उद्योग गुजरातला पळवून नेले. महायुती सरकारने महाराष्ट्राच्या खुर्चीवर बसून राज्य गुजरातला गहाण टाकले आहे. आता राज्याच्या स्वाभिमान परत आणण्यासाठी लढाई लढावी लागणार आहे.

Continue reading

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....

टिव्ही पत्रकारितेचा चेहरामोहरा बदलणारे दिग्गज टेड टर्नर यांचे निधन

जगातील पहिली २४ तास बातम्या देणारी वृत्तवाहिनी 'सीएनएन' सुरू करून टेलिव्हिजन (टिव्ही) पत्रकारितेचा चेहरामोहरा बदलणारे दिग्गज माध्यम सम्राट टेड टर्नर यांचे वयाच्या ८७व्या वर्षी नुकतेच निधन झाले. १९८०मध्ये त्यांनी 'केबल न्यूज नेटवर्क'ची स्थापना केली, ज्याने ठराविक वेळेत बातम्या देण्याच्या...
Skip to content