Homeबॅक पेजअसा साजरा करा...

असा साजरा करा श्रीराम जन्मोत्सव!

श्रीरामनवमी! श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या तिथीला नेहमीपेक्षा 1 हजार पटीने कार्यरत असलेल्या श्रीरामतत्त्वाचा लाभ मिळण्यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम।’ हा नामजप जास्तीतजास्त करावा.

श्रीराम म्हणजे अनेक भाविकांची श्रद्धाज्योत! धर्माच्या सर्व मर्यादा पाळणारा अर्थात् ‘मर्यादापुरुषोत्तम’, आदर्श पुत्र, आदर्श बंधु, आदर्श पति, आदर्श मित्र, आदर्श राजा, आदर्श शत्रु असा सर्वार्थाने आदर्श ठरेल असा कोण, असे विचारताच डोळ्यांसमोर नाव येते ते म्हणजे ‘श्रीराम’! आदर्श राज्याला आजही रामराज्याचीच उपमा देतात. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात आपण श्रीरामनवमीचा इतिहास आणि महत्त्व, हा उत्सव साजरा करण्याची पद्धत, श्रीराम उपासनेच्या संदर्भातील काही धार्मिक कृती यांची माहिती आणि रामनामाचे महत्व यांविषयी जाणून घेणार आहोत. रामनवमीला श्रीरामाची उपासना आणि नामजप करून रामराज्य स्थापनेचा संकल्प करूया!

श्रीराम

1. तिथी: रामनवमी हा उत्सव चैत्र शुद्ध नवमी या तिथीला साजरा करतात.

2. इतिहास: श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ रामनवमी साजरी करतात. यादिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असताना अयोध्येत रामचंद्रांचा जन्म झाला.

3. श्रीरामनवमीचे आध्यात्मिक महत्त्व: देवता अन् अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्त्व भूतलावर जास्त प्रमाणात कार्यरत असते. रामनवमीच्या दिवशी श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते. रामनवमीला ‘श्रीराम जय राम जय जय राम।’ हा नामजप, तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीरामतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होते.

श्रीराम

4. श्रीराम जय राम जय जय राम – श्रीरामाच्या नामजपाचा अर्थ: ‘रामसे बडा रामका नाम‘, असे म्हटलेलेच आहे. ‘रामाचे एक नाम विष्णुसहस्रनामाच्या बरोबरीचे आहे’, अशी रामनामाची महती साक्षात् शिवाने गायिली आहे. देवतेचा नामजप भावपूर्ण झाला, तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो. नामजप करताना त्यातील अर्थाकडे लक्ष देऊन केला, तर तो अधिक भावपूर्ण होण्यास मदत होते. यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम।’ या नामजपातील शब्दांचा अर्थ समजून घेऊया. ‘श्रीराम‘ हे श्रीरामाचे आवाहन आहे. ‘जय राम’ हे स्तुतीवाचक आहे, तर ‘जय जय राम’ हे ‘नमः’ प्रमाणे शरणागतीचे दर्शक आहे.

5. श्रीरामाची पूजा: श्रीरामाची पूजा करताना त्याला गंध करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने लावावे. तसेच श्रीरामाला हळद-कुंकू वाहताना आधी हळद आणि नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहवे. आदल्या दिवशीचे निर्माल्य काढतानासुद्धा अंगठा आणि अनामिका याच दोन बोटांचा वापर करावा. अंगठा आणि अनामिका जोडून होणार्‍या मुद्रेमुळे शरीरातील अनाहतचक्र जागृत होते. त्यामुळे भक्तिभाव निर्माण होण्यास साहाय्य होते.

6. रामनवमीच्या दिवशी पूजाविधी करण्याची पद्धत: प्रभु श्रीरामांचा जन्म माध्यान्हकाळी म्हणजे दुपारी 12 वाजता साजरा करतात. रामजन्मोत्सव साजरा करताना प्रभु श्रीरामांच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करावी. श्रीरामासाठी तुळशी आणि चाफ्याच्या फुलांचा हार घालावा. दुपारी 12 वाजता शंखनाद करून ‘प्रभु श्रीरामचंद्र की जय!’ असा जयघोष करावा आणि त्यानंतर श्रीरामाचा पाळणा लावावा. त्यानंतर आरती करावी. नैवेद्याला सुंठवडा (सुंठेचे आणि साखरेचे एकत्रित मिश्रण) ठेवावा. त्यानंतर तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटावा.

श्रीराम

7. उत्सव साजरा करण्याची पद्धत: कित्येक राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो. रामायणाचे पारायण, कथाकीर्तन आणि राममूर्तीला विविध शृंगार, अशाप्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. माध्यान्हकाळी, कुंची (बाळाच्या डोक्याला बांधायचे एक वस्त्र. हे वस्त्र पाठीपर्यंत असते.) घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात आणि भक्तमंडळी त्यावर गुलाल अन् फुले उधळतात. (काही ठिकाणी नारळाऐवजी श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवतात.) याप्रसंगी श्रीरामाचा पाळणा (रामजन्माचे गीत) म्हटला जातो. त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करतात आणि प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. काही ठिकाणी सुंठवड्याबरोबर महाप्रसादही देतात.

8. रामनवमीला रामराज्य स्थापनेचा संकल्प करूया!– रामराज्यातील प्रजा धर्माचरणी होती; म्हणूनच तिला श्रीरामासारखा सात्त्विक राज्यकर्ता लाभला आणि आदर्श असे रामराज्य उपभोगता आले. तसेच आपणही धर्माचरणी अन् ईश्वराचे भक्त बनलो, तर पूर्वीसारखेच रामराज्य (धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र) आताही अवतरेल! नित्य धर्माचरण आणि धर्माधिष्ठित राज्यकारभार याद्वारे आदर्श राज्यकारभार करणारा मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे प्रभु श्रीराम! प्रजेचे जीवन संपन्न करणारे; गुन्हेगारी, भ्रष्टाचार आदींना स्थान नसलेले अशी रामराज्याची ख्याती होती. असे आदर्श राज्य (हिंदु राष्ट्र) स्थापण्याचा निर्धार करूया.

(संदर्भ: सनातन संस्थेचा ग्रंथ ‘श्रीराम’)

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content