अनेक मराठी वृत्तवाहिन्या सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना (उबाठा) विरुद्ध शिवसेना या पक्षफूट/विलिनीकरण प्रकरणात कपिल सिब्बल यांनी मांडलेल्या युक्तिवादाचे मोठे भांडवल करत आहेत. सिब्बल सर्वोच्च न्यायालयाला ‘धनुष्यबाण’ या निवडणूक/पक्षचिन्हाला स्थगित ठेवण्याचे आवाहन करत आहेत. सिब्बल यांच्या युक्तिवादाला शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे भासवून त्याचा गवगवा करणे, म्हणजे केवळ एका युक्तिवादाला अंतिम निकालाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे. न्यायाधीशांनी अंतिम निकाल सुनावण्यापूर्वीच असे करणे म्हणजे निकालावर प्रभाव टाकण्याचा किंवा न्यायाधीश तसेच जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून एक विशिष्ट कथानक पुढे नेण्याचा प्रयत्न असल्यासारखे आहे.

या घडामोडीमुळे शिवसेनेच्या शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे, अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या काही अज्ञानी लोकांना हे समजत नाही की ‘धनुष्यबाण’ हे राज्यनिहाय निवडणूक चिन्ह आहे. महाराष्ट्रात अविभाजित शिवसेनेला आणि झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाला (JMM) निवडणुकीसाठी हेच चिन्ह भारत निवडणूक आयोगाने (ECI) वाटप केले आहे. सर्वोच्च न्यायालयाला ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर सरसकट स्थगिती लावणे शक्य होणार नाही. जर सर्वोच्च न्यायालयाने अशी सरसकट स्थगिती दिली, तर झारखंडचे JMMचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचीही तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते, कारण JMMलाही निवडणुकांसाठी हेच चिन्ह देण्यात आले आहे.

समजा, सर्वोच्च न्यायालयाने केवळ महाराष्ट्रापुरते या चिन्हावर निर्बंध घातले, तरी तो शिवेसेनच्या एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी धक्का ठरू शकतो. परंतु त्याहून मोठे नुकसान शिवसेना (उबाठा)चे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकीय उद्दिष्टाचे होईल. कारण त्यांना केवळ चिन्हावरच नव्हे, तर अविभाजित पक्षावरही नियंत्रण मिळवायचे आहे. असा युक्तिवाद करणे हे केवळ आत्मघातकी ठरणारे नाही, तर सिब्बल यांचे स्वतःचे पक्षकार शिवसेना (उबाठा)चे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठीही तितकेच नुकसानकारक ठरू शकते. दुसऱ्या पक्षाची बाजू अद्याप पूर्णपणे ऐकून घेतलेली नसताना आणि अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नसताना, केवळ एका युक्तिवादाच्या आधारावर विजयाचा दावा करण्यासारख्या या बातम्या आहेत. राजकीय पक्ष केवळ न्यायालयातील युक्तिवादांच्या जोरावर आपले राजकीय अस्तित्त्व टिकवून ठेवण्याची अपेक्षा करू शकत नाहीत, हेही अशा प्रकारची बातमीदारी करणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

