Homeमाय व्हॉईसदिल्ली पोलिसांचे आता...

दिल्ली पोलिसांचे आता ‘बेटी जरा धीरे से’…

अहो, ऐकलं का, दिल्ली पोलीस म्हणे त्यांची ‘प्रतिमा’ बदलणार! दरवेळेस ‘पिछवाडा’ काढणारे आता नमस्ते जी.. बोलणार. हे वाचून चकित झालात ना? आम्ही तर थेट चक्रावूनच गेलो. खरंतर विश्वासच बसेना. इतकी वर्षे ‘पिछवाडा’, ‘मादxxx’, ‘घुसा देंगे’, ‘दादीके मय्यतमे नहीं आये भोसxxxx’ ‘मारो सालोंको..’ हीच भाषा पोलिसांनी वापरलेली पाहिली आहे, ऐकली आहे आणि आता एकदम ‘यु टर्न’ बात कुछ हजम नहीं हो रही… पण तुमच्याआमच्या नशिबाने हे खरं आहे. अलीकडेच दिल्ली मुक्कामी जंतरमंतर येथे जेन झी, कॉक्रोच जनता पार्टी व विद्यार्थ्यांच्या निदर्शनाच्या वेळी पोलिसांनी जे बेछूट वर्तन केले व विरोधी पक्ष तसेच आम जनतेचा प्रचंड रोष ओढवून घेतल्यानेच दिल्ली पोलीस प्रशासनाने ही नियमावली जाहीर केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

पोलिसावाले बाबू दंडा…

या आंदोलनातील पोलिसांच्या वर्तनाविरुद्ध ‘पोलिसावाले दादा दंडा चला दे’ हे गाणे सध्या विद्यार्थीवर्गात प्रचंड लोकप्रिय झाले आहे. देशातील सर्व पोलिसांनी एकदातरी हे गाणे ऐकावे, अशी आमची विनंती राहील. जंतरमंतरवर झालेल्या या अत्याचाराचे पडसाद संपूर्ण देशभर उमटल्याने सरकार तसेच पोलीसयंत्रणा कधी नव्हे इतकी खडबडून जागी झाली व ही पोलिसांसाठीची नियमावली बाहेर आली. पोलिसांसाठी केलेली ही नियमावली संपूर्ण दिल्ली राज्यासाठी असून निदर्शने, हरताळ, मोर्चे आदी आंदोलनाच्या सर्व प्रकारांच्या वेळी असेच वर्तन अपेक्षित असल्याची समजही सर्वाना देण्यात आल्याची समजते! ही नियमावली म्हणजे सुचिन्ह आहे. दिल्ली पोलिसांचा हा कित्ता सर्वांनीच गिरवण्याची गरज आहे.

प्रत्येकाकडे कॅमेरा

जंतरमंतर आंदोलनाच्या वेळेस पोलिसांचे प्रत्येक वर्तन विद्यार्थ्यांनी कॅमेऱ्यात टिपून समाजमाध्यम, विशेषतः इन्स्टाग्रामवर सरकार व पोलिसांना उघडे पाडले होते. याचा धसका पोलिसांनी घेऊन निदर्शनावेळेस प्रत्येकाच्या हातात कॅमेरा असल्याचे गृहीत धरून पोलिसांनी हात जोडून त्यांचे स्वागत करावे. जवळ जाऊच नये, असे सक्त आदेशवजा सूचना देण्यात आल्या आहेत. भाषा ही संयमाची व मृदू असावी, जसे की ‘छोरे, इतना आवाज नहीं करते’, ‘बेटी जरा धीरे से’ ‘मौसी कुछ हुआ है क्या’ ‘चाचाजी आवाज मत बढाईये’… पोलीस अशी आर्जवे करत असतानाची दृश्ये विलोभनीय असतील नाही. निदर्शने करत असताना आंदोलक आजारी झाल्यास त्वरित पोलिसांनी आपल्या कॅमेऱ्याने सर्व चित्रित करावे. रुग्णवाहिका येईपर्यंत त्यांची काळजी घेणे वगैरे गोष्टी समंजसपणे पार पाडाव्यात! मुख्य म्हणजे या आंदोलनाच्या काळात पोलिसांनी शांत राहून पाहवे व अगदीच हिंसा किंवा जमाव अनावर होऊन काही विपरीत करायचा प्रयत्न करत असेल तर तुम्हीही तुमचे कॅमेरे तयार ठेवा. हे सर्व करत असताना तुम्ही तुमचा संयम ढळू देऊ नका!

उचकावू नका

तरुण निदर्शकांना उगाचच उचकावू नका. त्यांच्यासमोर शांत राहा. नेहमीप्रमाणे त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुम्ही अरे म्हटलेत की ते कारे म्हणणारच, हे पक्के लक्षात ठेवा.

“मंत्री हा जुल्मी गडे, यास पुन्हा निवडू नका

छळीतो हा फार तुम्हा, यास मत देऊ नका।।

साधूचा आव जनी

सत्तेची हाव मनी

मागील दारी घुसूनी

खातो हा भाव फुका!

मारी उड्या टना टना

नच अंगी नम्रपणा

मग्रुरी दावी जना

यास भीक घालू नका (केशवकुमार)

असे विडंबनकाव्य असेल तरीही निदर्शकांवर कारवाई नको. आजच या नियमावलीबाबत उलटसुलट काही लिहीत नाही. पण मनात जरूर शंका आहे. या एका नियमावलीने दिल्ली पोलिसाचे मत परिवर्तन होईल?

“दुनिया जिसे कहते हो,

जादू का खिलोना है

मिल जाये तो मिट्टी है,

खो जाये तो सोना है” ( निदा फाजली)

अशी काहीशी अवस्था नाही झाली तरी मिळवले!

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आणि गुन्हेविषयक अभ्यासक आहेत.)

Continue reading

मुंढेंच्या कारवाईविरूद्ध न्यायालयाचे अर्थशून्य ताशेरे! बहोत नाइंसाफी है यह…

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून संपूर्ण राज्यभर एकच हलकल्लोळ माजला आहे. भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. औषध नियंत्रण नियमावलीचे पालन न करणाऱ्यांचे तर आता पितळ उघडे पडत आहे. अधूनमधून कारवाईचा दणका बसलेली...

शिवसेनाप्रमुखांची अटक हे पोलीस कर्तव्याचे फलित! संबंध मधुरच!!

पोलीस आयुक्त नियम आणि कायद्याच्या चौकटीतच काम करत असतो, नव्हे त्याला तसे करावेच लागते. म्हणूनच सत्तारूढ राजकीय नेत्यांनी 'आवडता-नावडता' अधिकारी असे शिक्के कुणावरही मारू नयेत, अशी स्पष्टोक्ती मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग यांनी येथे केली. ज्येष्ठ पत्रकार...

हेतूपुरस्सर धूळ खात पडलेल्या मिडी बसेस आणा आधी मुंबईच्या रस्त्यांवर!

मुंबई महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नुकताच 'लोकसवांद'मध्ये प्रथमच विस्तृत संवाद साधत पालिका प्रशासनासमोरील काही आव्हाने व भविष्यातील मोठ्या प्रकल्पांबाबत चर्चा केली. एखाद्या मोठ्या महानगरीचे व्यवस्थापन करणे तसे जिकरीचेच आणि आव्हानत्मक असते यात शंकाच नाही....
Skip to content