राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना अद्याप मूळ गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला प्राप्त झालेला नसल्याने अकरावी प्रवेशप्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ नये, याकरीता प्रवेश निश्चित करताना ही कागदपत्रे सादर करण्याची सक्ती न करण्याचे निर्देश कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि कनिष्ठ महाविद्यालयांना याबाबतच्या सूचना जारी केल्या आहेत. सन २०२६-२७च्या अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत नियमित फेरी क्रमांक १ सुरू असून २९ मे २०२६ रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चित करताना मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे अनिवार्य होते. ही अट आता तात्पुरती शिथिल करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना संबंधित कागदपत्रे अद्याप प्राप्त झालेली नाहीत, त्यांच्याकडून गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध होताच सादर करण्यात येईल, असे हमीपत्र घेऊन त्यांचा प्रवेश निश्चित करता येणार आहे.
आधार व्हेरिफाइड विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका डिजीलॉकरमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला निर्धारित काळात सादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात येऊ शकतो, याची जाणीवही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे दहावीचा निकाल लागल्यानंतर कागदपत्रांच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशप्रक्रियेत सहभागी होणे शक्य होईल, असा विश्वास दादाजी भुसे यांनी व्यक्त केला आहे.

