इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६च्या अंतिम सामन्याच्या यजमानपदाबाबत मोठी उलथापालथ झाली आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी)चे होमग्राऊंड असलेल्या बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमकडून फायनलचे यजमानपद हिसकावून घेण्यात आले आहे. आता आयपीएल २०२६चा अंतिम सोहळा ३१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. बीसीसीआयने बुधवारी या निर्णयावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले.
बेंगळुरूकडून फायनलची संधी जाण्यामागे प्रामुख्याने कर्नाटकच्या आमदारांचा ‘तिकीट वाद’ कारणीभूत ठरल्याचे समोर येत आहे. कर्नाटकच्या काही आमदारांनी, विशेषतः काँग्रेस आमदार विजयानंद कशप्पनवार यांनी, प्रत्येक आमदाराला किमान ५ व्हीआयपी तिकिटे देण्याची मागणी केली होती. “आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्हाला रांगेत उभे करू नका,” अशी भूमिका त्यांनी घेतली होती. कर्नाटक विधानसभेतही या मुद्द्यावरून गदारोळ झाला होता. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनवर या आमदारांकडून प्रचंड दबाव टाकला जात होता. क्रिकेटच्या सामन्यात राजकीय हस्तक्षेप आणि तिकिटांच्या वाटपावरून सुरू असलेला हा गोंधळ पाहता, बीसीसीआयने सुरक्षेच्या आणि नियोजनाच्या कारणास्तव फायनलचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला.
सुरक्षेचा प्रश्न आणि जुन्या आठवणी
गेल्या वर्षी ४ जूनला आरसीबीच्या विजयानंतर काढलेल्या ‘ट्रॉफी परेड’दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठी चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे स्टेडियमच्या सुरक्षाव्यवस्थेवर आधीच प्रश्नचिन्ह होते. या पार्श्वभूमीवर, मोठ्या गर्दीच्या फायनल सामन्यासाठी बीसीसीआयने कोणताही धोका पत्करण्यास नकार दिला. परिणामी अंतीम सामन्याचे स्थळच बदलले गेल्याचे समजते.
आयपीएल २०२६ नॉकआउट सामन्यांचे नवे वेळापत्रक
सामना | तारीख | मैदान / शहर
- क्वॉलिफायर १ | २६ मे | एचपीसीए स्टेडियम, धरमशाला
- एलमिनेटर | २७ मे | मुल्लानपूर, नवी चंदीगड
| क्वॉलिफायर २ | २९ मे | मुल्लानपूर, नवी चंदीगड
- ग्रँड फायनल | ३१ मे | नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
बेंगळुरू पूर्णपणे ‘आउट’
विशेष म्हणजे, केवळ फायनलच नव्हे तर एकही बाद फेरीचा (प्ले ऑफ) सामना बेंगळुरूला मिळालेला नाही. धरमशाला आणि चंदीगडसारख्या नवीन केंद्रांना नॉकआउट सामन्यांची संधी देण्यात आली आहे. आरसीबीने गेल्या वर्षी विजेतेपद पटकावल्यामुळे परंपरेनुसार फायनल बेंगळुरूमध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, राजकीय आणि तांत्रिक कारणांमुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.
बीसीसीआयचे मत
“हवामान आणि इतर तांत्रिक बाबींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे,” असे बीसीसीआयकडून अधिकृतपणे सांगण्यात आले असले तरी, पडद्यामागील तिकीट वादच याला कारणीभूत असल्याचे क्रीडा वर्तुळात बोलले जात आहे.

