Homeकल्चर +एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

“आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात,” अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त ‘विनय आपटे प्रतिष्ठान’तर्फे आयोजित एकांकिका सादरीकरणाच्या कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे हा सोहळा प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विनय आपटे यांचे शिष्य अभिनेते संकर्षण कऱ्हाडे, सुप्रसिद्ध अ‍ॅडगुरू भरत दाभोळकर आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

याप्रसंगी बोलताना डॉ. उदय निरगुडकर यांनी विनय आपटे यांच्यासोबतच्या वैयक्तिक आठवणींना उजाळा दिला. “एकदा आवाजाच्या कार्यशाळेसाठी विनयजी ठाण्यात स्कूटरवरून भिजत भिजत आले. पाऊस वाढल्याने सगळीकडे पाणी साचले आणि आता परत जाता येणार नाही, हे लक्षात येताच त्यांनी ‘आपण रात्रीपर्यंत कार्यशाळा घेऊ’ असे म्हणत थेट रात्री १२ वाजेपर्यंत कार्यशाळा घेतली.” हा त्यांच्यातील कामाप्रती असलेला विलक्षण गुण निरगुडकर यांनी आवर्जून सांगितला.

संस्थेच्या विश्वस्त वैजयंती आपटे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, विनय आपटे स्वतःच्या वाढदिवसाला कधीही सुट्टी न घेता नियमित काम करायचे. त्यामुळेच त्यांचा वाढदिवस हा नाट्यक्षेत्रात पहिलं पाऊल टाकणाऱ्या तरुण मुलांच्या सादरीकरणाने साजरा करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. विनय आपटे यांनी मालिका, चित्रपट, नाटक, जाहिरात अशा सर्व माध्यमांत मुक्त संचार केला, तरी त्यांचे खरे प्रेम ‘नाटक’ हेच राहिले. त्यांच्या अभिनय, दिग्दर्शन आणि लेखनाचा प्रवास उलगडणारी एक विशेष ध्वनी-चित्रफितही (AV) यावेळी दाखवण्यात आली.

पुरस्कारप्राप्त एकांकिकांचे दमदार सादरीकरण: या सोहळ्यात विविध स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळालेल्या विजेत्या एकांकिका सादर करण्यात आल्या.

प्रथम एकांकिका: ४०पेक्षा जास्त कलाकार असलेली आणि अनेक स्पर्धा गाजवणारी जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ‘मढं निघालं अनुदानाला’ ही एकांकिका यावेळी सादर झाली. याचे लेखन प्रतीक चौधरी यांनी केले असून दिग्दर्शन महेश कापरेकर आणि सागर चव्हाण यांचे आहे.

द्वितीय एकांकिका : मध्यंतरानंतर पार्ल्याच्या म. ल. डहाणूकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी BYP संस्थेची, सर्वेश देसाई लिखित आणि पराग ओझा दिग्दर्शित ‘जब वी मेट’ ही एकांकिका सादर केली.

उत्तम विषय, कलाकारांचे कसदार सादरीकरण आणि नेटके आयोजन यामुळे ठाणेकर रसिक प्रेक्षकांनी नाट्यगृहात शेवटपर्यंत लक्षणीय गर्दी केली होती.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content