महाराष्ट्रातल्या नाशिक-सोलापूर-अक्कलकोट, या 374 किमी लांबीच्या सहा पदरी ग्रीनफील्ड ऍक्सेस कंट्रोल्ड मार्गिकेच्या बांधकामाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (टोल आकारणीद्वारे) तत्त्वावरील या प्रकल्पासाठी साधारण 19,142 कोटी रुपये खर्च येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने या मार्गिकेच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर यासारख्या महत्त्वाच्या प्रादेशिक शहरांना जोडत पुढे कुर्नूलसाठी संपर्कव्यवस्था प्रदान करेल. ही पायाभूत सुविधा पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद् आराखड्याच्या तत्त्वांतर्गत एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधा विकासाला गती देण्याच्या प्रक्रियेत उचललेले एक पाऊल आहे.
नाशिक ते अक्कलकोटदरम्यानची ही मार्गिका वाढवण बंदर इंटरचेंजजवळ दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेला, नाशिकमध्ये राष्ट्रीय महामार्ग 60 (आडेगाव)च्या जंक्शनवर आग्रा-मुंबई कॉरिडॉरला आणि पांगरी (नाशिकजवळ) येथे समृद्धी महामार्गाला जोडण्याचे प्रस्तावित आहे. ही प्रस्तावित मार्गिका पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत थेट संपर्कव्यवस्था उपलब्ध करेल. चेन्नई बंदराच्या बाजूने, तिरुवल्लूर, रेणीगुंटा, कडप्पा आणि कुर्नूलमार्गे चेन्नई ते हसापूरपर्यंत म्हणजेच महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत, (700 किमी लांब) 4-पदरी मार्गिकेचे काम आधीच प्रगतीपथावर आहे.

प्रवासाची कार्यक्षमता सुधारणे हा या प्रस्तावित ऍक्सेस-कंट्रोल्ड सहा-पदरी ग्रीनफिल्ड प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे प्रवासाचा वेळ 17 तास आणि प्रवासाचे अंतर 201 किमीने कमी होऊ शकते. नाशिक-अक्कलकोट (सोलापूर) संपर्कव्यवस्थेमुळे कोप्पर्थी आणि ओरवाकल या प्रमुख नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नोड्सवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या मालाची लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारेल.नाशिक-तळेगाव दिघे हा भाग पुणे-नाशिक एक्स्प्रेस वेच्या विकासाची गरजदेखील पूर्ण करेल. 6-पदरी ॲक्सेस-कंट्रोल्ड ग्रीनफिल्ड कॉरिडॉर ‘क्लोज टोलिंग’ सुविधेसह असेल, ज्यावर सरासरी ताशी 60 किमी आणि ताशी 100 किमी वेगाची अनुमती असेल. यामुळे प्रवासाचा एकूण वेळ अंदाजे 17 तासांपर्यंत कमी होईल. (31 तासांवरून 45%ची घट), तसेच प्रवासी आणि मालवाहू दोन्ही वाहनांसाठी अधिक सुरक्षित, वेगवान आणि विनाखंड संपर्कव्यवस्था उपलब्ध होईल. या प्रकल्पामुळे सुमारे 251.06 लाख मनुष्य-दिवस प्रत्यक्ष रोजगार आणि 313.83 लाख मनुष्य-दिवसांचा अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल.

