Homeमाय व्हॉईसपाण्यासाठी दाहीदिशा.. का...

पाण्यासाठी दाहीदिशा.. का आम्हा फिरवीशी रे आयुक्ता?

गेल्या महिन्यातील जोरदार पावसानंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पार कोलमडले आहे. खरे तर देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वेळी असे काही लिहावे लागेल याची कल्पनाच केलेली नव्हती. ठाण्यासारख्या मुंबईनजीक असलेल्या महानगरात आजही अशी परिस्थिती असेल तर गावखेडयात काय असेल याची कल्पनाच केलेली बरी!

जोरदार पावसामुळे पिसे येथील उदंचन केंद्रात गाळ साठला होता. तो साफ करण्यासाठी पाणीपुरवठा बंद ठेवावा लागत आहे, असा गुळमुळीत खुलासा महापालिकेने केला आहे. खरेतर हा खुलासाच गुळमुळीतच आहे, कारण याच व आजूबाजूच्या क्षेत्रातून मुंबई शहरालाही पाणीपुरवठा होत असतो. या जोरदार पावसाच्यावेळी भांडुप येथील मुंबई महापालिकेच्या यंत्रणेतही मोठा बिघाड झाला होता. पाणी शिरून तेथेही चिखल झालेला होता हे वाचकांना आठवत असेलच. मुंबई महापालिकेनेही काही भागातील पाणीपुरवठा बंद ठेवला होता. परंतु तेथील जल अभियंत्यांच्या टीमने दिवसभर काम करून वा सर्वांना कामाला लावून पाणीपुरवठा अर्ध्या दिवसात पूर्ववत केला होता. हे सविस्तरपणे इतक्यासाठीच सांगितले की अधिकाऱ्यांचा नेता कार्यकुशल असला की त्याचे चांगले परिणाम दिसतातच! 

ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा खात्याची एकदा झाडाझडती होण्याची गरज आहे. दुरुस्तीच्या नावाखाली ठाणे शहरात महिन्यातून दोनदा, तीनदा पाणीकपात केली जाते आणि नंतरचे चार दिवस कमी दाबाने पाणी सोडले जाते. म्हणजे ती अप्रत्यक्षपणे पाणीकपातच असते. शिवाय विजेच्या वापरात बचत व्हावी म्हणून सरकारने येथील इमारतींच्या बांधकामात सोलर पद्धतीचा वापर सक्तीचा केलेला आहे. अशी पाणीकपात होते तेव्हा या वीजबचतीला सपशेल हरताळ फासला जातो व गिझरचा वापर करावा लागतो.

या लेखाबरोबर एक छायाचित्र जोडण्यात आले आहे. आयुक्त विपीन वर्मा यांना हे ठिकाण माहीत आहे की नाही याची कल्पना नाही. नसली तर त्यांनी याची माहिती करून घ्यावी आणि कोणताही लवाजमा न घेता आणि विशेष म्हणजे खासगी गाडी घेऊन चालकही नवीन घेऊन बाळकुममार्गे साकेतला जावे. तेथे भल्यामोठ्या जल वाहिन्यांखाली असे टँकर शेकड्याने उभे असलेले दिसतील. तुमच्या (आयुक्तांच्या) मनात सहज प्रश्न निर्माण होतील.. अरे, इतके टँकर येथे कशाला?

आयुक्त महोदय याचे उत्तर सोपे आहे. ‘जनतेच्या सेवेसाठी आणि नंतर मेवा खाण्यासाठी..’ काही लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा पाण्याचा व्यापार या ठाणे शहरात खुलेआम सुरू आहे. पाणी महापालिकेचे.. तेही फुकट.. मात्र टँकरमध्ये ते पाणी जाताच त्याची किंमत वाढते. कधीकधी किंमत पाच हजारांपासून दहा हजारावर कधी पोहोचते ते मूळ मालकलाही कळत नाही. काही फेरीवाले कसे चेहरा पाहून पुडी सोडतात किंवा भाव लावतात.. अगदी तसेच! घोडबंदर रोड किंवा माजीवडा येथील पॉश निवासी संकुलातून पाण्याची मागणी आली की गुलाबी गांधी हटकून वाढतो.

थोडक्यात.. हा पाण्याचा व्यापार थांबवण्यासाठी काही करता आले तर पाहावे, आयुक्त महोदय! शिवाय आता किती प्रमाणात इमारत बांधकामांना परवानगी देता येऊ शकेल याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. या ठाणे शहरात अशा शेकड्यांनी इमारती आहेत की, त्या गेली अनेक वर्षे टँकरवरच अवलंबून आहेत. आपल्या जलाभियंता विभागाला याची माहिती नक्कीच असेल. दुरुस्तीच्या कामाची पाहणी करण्यासाठी मात्र, प्रमुख जल अभियंत्यांसह विभागातील अभियंत्यांना मुंबई महाप्सलिकेच्या दौऱ्यावर किमान 15 दिवस तर पाठवण्यात यावे, अशी माझी विनंती आहे. ठाणे शहरातील जनता नको इतकी सहनशील असल्यानेच नोकरशहा आणि नेते या शहराला त्रास देत आहेत की काय असे वाटू लागले आहे. ही जनभावना बळावू नये, याची दक्षता आपल्यालाच घ्यावी लागणार. नाही का?

Continue reading

येथे प्रत्येक छायाचित्र बोलते…

"For me the subject of the picture is always important than the picture" हा सुविचार दिवंगत छायाचित्रकार रजनीश काकडे यांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनात प्रकर्षाने जाणवत होता. रजनीशला आदरांजली वाहण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या...

‘एशियाटीक’ची निवडणूक जूनमध्ये तरी होणार? दोन्ही बाजूंच्या सदस्यांत घुसखोर!

मुंबईतल्या एशियाटीक लायब्ररी, या प्रतिष्ठित संस्थेची निवडणूक 'घुसखोर' सदस्यांशिवाय जून महिन्यात घेण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला असला तरी ती जूनमध्येच होईल की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. कारण नव्याने निवडल्या जाणाऱ्या कार्यकारिणीची मुदत केवळ सप्टेंबर...

ठाणे पालिकेच्या बेसमेंटमध्ये आहे ५० घमेली धूळ!

ठाणे शहरात संपूर्ण लोकमान्य नगर अगदी जुन्या बस डेपोपासून तो नव्या बस डेपोपर्यंत फेरफटका मारला असता रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेल्या दुचाक्या व रिक्षा यांना चकवत नागरिक कसे चालत असतील याचा विचारच न केलेला बरा. लोकमान्य नगरात तर एका ठिकाणी...
Skip to content