Homeडेली पल्सज्येष्ठ काँग्रेस नेते...

ज्येष्ठ काँग्रेस नेते रोहिदास पाटील यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री रोहिदास तथा दाजी पाटील यांचे आज सकाळी 11 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात विनय तसेच आमदार कुणाल पाटील हे दोन मुलगे तसेच स्मिता पाटील ही विवाहित कन्या असा परिवार आहे. रोहिदास पाटील यांच्या पार्थिवावर उद्या, 28 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता धुळ्याच्या श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या एसएसव्हीपीएस कॉलेजच्या मैदानावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

रोहिदास पाटील काँग्रेस विचाराचे सच्चे पाईक होते. काँग्रेसचा विचार त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सोडला नाही. रोहिदास पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आमदार, खासदार, विविध खात्याचे मंत्री अशा पदावर काम करुन आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. खानदेशात काँग्रेस विचार तळागाळात पोहोचण्याचे काम त्यांनी केले. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी समाजकारण आणि राजकारणात पाऊल ठेवले. त्यानंतर काँग्रेस सेवादलचे सदस्य, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशी पदे भूषवली. १९७२ साली ते धुळे जिल्हा परिषदेवर निवडून गेले. १९८० साली त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला. १९८६ साली ते महसूल राज्यंमत्री झाले. कृषी, फलोत्पादन, रोजगार, ग्रामविकास, पाटबंधारे, गृहनिर्माण, संसदीय कार्यमंत्री अशा विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते व उपाध्यक्ष पदावरही पाटील यांनी काम केले. शैक्षणिक संस्था सुरु करून धुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुला-मुलींना शिक्षणाची सुविधा निर्माण करुन दिली. जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी, जवाहर महिला सहकारी सूतगिरणी, जवाहर सहकारी कुक्कूट पालन संस्था, जवाहर सहकारी पशुखाद्य संस्थेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे विणले. धुळे जिल्ह्याला वरदान ठरणारे अक्कलपाडा धरण बांधण्यात त्यांचा मोठा पुढाकार होता. कृषी, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी भरीव योगदान दिले.  दांडगा जनसंपर्क व जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर असणारा नेता अशी त्यांची ओळख होती. आपल्याला मिळालेल्या पदांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील सर्व घटकांचा विकास करण्याचा प्रयत्न केला.

रोहिदास पाटील यांच्या निधानाचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. दाजीसाहेबांच्या निधनाने सुसंस्कृत, संयमी, विनम्र अनुभवी व लोकाभिमुख नेतृत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेसची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे, अशा भावना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content