Homeन्यूज अँड व्ह्यूजनितीन देसाई यांच्या...

नितीन देसाई यांच्या कर्जाचा बाऊ करणाऱ्यांनो…

काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील सूरतच्या एका व्यापाऱ्याने बँक ऑफ महाराष्ट्रला सुमारे 500 कोटींचा चुना लावल्याबाबत लिहिले होते. काल प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्त्या केल्याचे वृत्त आले. देसाई यांच्यावरील कर्जाचा बोजा सुमारे 200 कोटी रुपयांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. काही ठिकाणी हा कर्जाचा आकडा वेगवेगळा आहे. तात्पर्य एकच आहे की, देसाई यांच्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठी व या सर्व चक्रव्यूहातून सुटण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्नही केले होते. नाही असे नाही. परंतु या प्रयत्नांना यश न आल्यानेच त्यांनी आत्महत्त्येचा निर्णय घेतल्याचे त्यांनीच रेकॉर्ड करून ठेवले आहे.

राज्य विधिमंडळात सर्वच रजकीय पक्षांनी देसाई यांना कर्जफेडीचा तगादा लावण्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी केली आणि राज्य सरकारने ती मान्यही केली. मला येथे कुठलेही राजकारण करायचे नाही. परंतु सरकारमधील कुणालाही हे माहित नसावे यावर माझा तरी विश्वास नाही. कदाचित देसाई यांनी उचललेले पाऊल अचानक असेलही. परंतु आम्हाला काहीच माहित नव्हते, किमान असे तरी राजकीय पक्षांनी सांगण्याचा प्रयत्न करू नये.

देसाई

नितीन देसाई यांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेतले हे मान्य. त्यांनी आपल्या कर्जफेडीचे काही हफ्तेही भरले होते. असे असताना त्यांच्यामागे बँकेने आणि आर्थिक कंपनीने त्यांना मानसिक तणाव येईल इतका तगादा लावायला नको होता. कारण, देसाई यांच्यापेक्षा कितीतरी मोठया रकमेची कर्जे अनेक बँकानी माफ केल्याची यादी आता माझ्यासमोर, टेबलावर आहे. ही यादी रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेली असून या यादीत सन 1920पर्यंतची नावे आहेत. अद्ययावत यादी येत्या काही दिवसात अपेक्षित आहे. या यादीनुसार माफ केलेल्या कर्जाची रक्कम 12 हजार कोटी रुपयांच्या वर आहे. इतकी भली मोठी रक्कम माफ होऊ शकते तर देसाई यांच्या अवघ्या 200 कोटी रुपयांबाबत चर्चा करून मार्ग काढता आला नसता का? बरे माफ केलेली 12 हजार कोटींची कर्जे थेट 2012/13मध्ये घेतलेली आहेत.

काही हजारो आणि शेकडो कोटी रुपयांची कर्जे घेणाऱ्या कंपन्याची एक संतापजनक खासियत अशी आहे की, अनेक कंपन्यांनी कर्जाचे हफ्तेच कधीही वेळेवर भरलेले नाहीत. काही महाभाग तर असे आहेत की त्यांनी कर्जफेडीचा एकही हफ्ता भरलेला नाही. मनधाना कंपनीने 1706 कोटी रुपयांचे कर्ज घेतले व शेवटपर्यंत एक छदामही परत भरलेला नाही. हेलिओस फोटो कंपनी, आर आर बासमती, गुजरात कोक, हॉटेल लीला, जय बालाजी, इस्पातच्या अनेक कंपन्या मिळून सुमारे 700 कोटी, सिद्धीविनायक लॉजिस्टिकचे सुमारे 1500 कोटीही या यादीत आहे. ही यादी बरीच वाढवता येईल. आपल्या डी एस कुलकर्णी यांचेही नाव यात दिसले.

राज्यातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षांकडेही कर्जमाफीची यादी असेलच. केंद्रासमोर ही यादी धरून याच धर्तीवर नितीन देसाई यांच्याबाबत काही तरी ठोस निर्णय घ्या, अशी जोरदार मागणी करणे गरजेचे आहे. अन्यथा राज्य विधिमंडळात केलेली भाषणे शब्दांचे बुडबुडे ठरतील!

या क्लेशकारक आत्महत्त्येनंतर नामदेव ढसाळ यांच्या पुढील ओळी आठवल्या-

“आधी मरून झालं की;

छान सुरू होतो जगण्याचा झंजावात:

सर्व चरचाराला गुंडाळून स्वतःत

स्वतःलाही पार करत पुढे पुढे धावत असं जगणं..”

आतापर्यंतच्या विवेचनाचा असा कुणीही अर्थ काढू नये की, मी देसाई यांच्या कर्जमाफीसाठी इतके लिहिले. मुळीच नाही. देसाई यांच्या कुटुंबियांनाही हे आवडणार नाही. यातून काहीतरी सन्मान्य तोडगा निघाला पाहिजे इतकेच मला सुचवायचे आहे. सांबाधित बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्जाची पुनःर्रचना करून द्यावी, जेणेकरून हा उद्योग पुन्हा लागून येथील कामगारवर्गालाही दिलासा मिळेल..

“घाव लागल्याचे दुःख आता नाही

रक्ताचाच रंग बदलला

आता बेडीचाही संपला गा जाच

पांगळ्याचे पाय कोण बांधी” (विंदा)

अशी परिस्थिती निर्माण होऊ नये…

Continue reading

एक संध्याकाळ ‘बर्वे संचित’च्या सानिध्यात!

ही संध्याकाळ कधीच विसरता येणारी नाही. (संध्याकाळ हा शब्द वाचला की काही रोमँटिक असं वाटेल, पण असं अजिबात नाही. पण, एका वेगळ्या अर्थाचा 'रोमान्स' जरूर आहे.) गर्दीच्या ठिकाणचे आपले रवींद्र नाट्यमंदिर संध्याकाळी फक्त गर्दीच नव्हे तर वाहतुकीच्या प्रचंड कोंडीसाठीही...

ठाणे शहरातल्या वाहतूककोंडीचे बिल पोलिसांच्या वाहतूक शाखेवर!

ठाणे शहराच्या कोपरी उड्डाणपुलावर क्रेन कोसळणे, माजिवडा चौकात रस्ता खचणे, घोडबंदर रोडवरील खोळम्बलेली सेवारस्त्यांची कामे, तसेच शहरभर या ना त्या कारणाने खोदून ठेवलेल्या अनेक रस्त्यांमुळे प्रचंड वाहतूककोंडी होत असताना त्याचे बिल पोलिसांच्या वाहतूक शाखेवर फाडले जात असल्याने वाहतूक पोलिसात...

मदिरा व मदिराक्षी! पोलीस अधिकाऱ्यांचे डोंबिवलीच्या वेशीवर ‘मै टल्ली हो गयी..’

डोंबिवलीनजिकच्या शीळ फाट्यावरून डोंबिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडले नावाचे सुंदर गाव आहे. गावात अजून बऱ्यापैकी निसर्ग शाबूत आहे. उंच इमारती आहेत. पण उंची गगनाला वेसण घालण्याइतपत नाही, ही जमेची बाजू! हे पडले गाव सुरु होताच मुक्ता नामक विकासकाची ओळख व्हायला...
Skip to content