Homeमाय व्हॉईसठाणे रेल्वेस्थानक परिसराला...

ठाणे रेल्वेस्थानक परिसराला महाव्यवस्थापकांची २० वर्षांत भेटच नाही!

गेल्या १५/२० वर्षात ठाणे रेल्वेस्थानकाचा बराच विस्तार झाला. फलाटही वाढले तसेच लोकल आणि इतर गाड्यांची संख्याही वाढली हे मान्य केलेच पाहिजे. या प्रमाणात स्थानक परिसरातील सोयीसुविधा मात्र कासव गतीने वाढत आहेत. याविरूध्द ठाणेकरांच्या मनात रोष आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वगळता ठाणे रेल्वेस्थानकाकडून प्रचंड प्रमाणात महसूल रेल्वेला पर्यायाने केंद्र सरकारला मिळत असूनही या स्थानकाचे स्वरूप गलिच्छ आणि ओंगळवाणेच राहिलेले आहे.

प्रचंड गर्दी हे परिसराचे खरे दुखणे आहे. त्यातच हल्ली या परिसराला भिकारी आणि बेवारस लोकांनी जणू गराडाच घातलेला दिसत आहे. भिकाऱ्यांचे नंदनवन असल्यासारखीच परिस्थिती आहे. अगदी रिक्षा थांब्याच्या जागेपासून भिकारी दर्शन देत असतात. जे दर्शन देत नाहीत ते थांब्याच्या मागे अस्ताव्यस्त पडलेले असतात. नाशिक टॅक्सी थांब्याच्या टपरीवर चक्क एक भिकारी पहुडलेली दिसत आहे तसेच आतील फलाट क्रमांक एकवर बसण्याच्या जागेवर चक्क एका प्रवाशाने झोप काढायची ठरवल्याचे दिसत आहे. रेल्वे पोलिस व्हॅनशेजारीच एक बेवारस झोपलेला दिसत आहे. त्या रिक्षा थांब्याची ही दुर्दशा झालेली आहे. आतील बाजूच्या अनेक लाद्या उखडून गेलेल्या आहेत तर तेथे असलेला एक आधार खांब ‘स्वच्छतेचा’ पुरस्कार आपल्याला कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहे. या परिसरातील रस्त्यांबांबत काय बोलावे? समतल म्हणजे काय हे त्या अभियंत्याला जणू माहीतच नसावे असे खेदाने म्हणावे लागत आहे.

महाव्यवस्थापकांच्या भेटीबाबत एक किस्सा समजला. गेल्या सुमारे २० वर्षात एकाही महव्यवस्थापकाने या स्थानक परिसराची एकदाही पाहणी केलेली नाही. एक अधिकारी म्हणाला की, महाव्यवस्थापकांना कर्जत/लोणावळा येथे जायचे असेल तेव्हाच फक्त ते स्थानकाची बसल्या जागीच फ्लायिंग पाहणी करतात. ठाणे, कल्याण परिसरातील एकाही खासदाराला याबाबत प्रश्न विचारावासा वाटत नाही. यातच रेल्वेकडून ठाण्याचा अपमान का होतो याचे कारण दडले असल्याचे एका ज्येष्ठ प्रवाशाने सांगितले. ठाणे रेल्वेस्थानक परिसराची अशीच दुरवस्था कायम राहिली तर कधीतरी प्रवाशांचा संताप अनावर होईल हे मात्र निश्चित!

Continue reading

माध्यमांना ठाकरेंच्या शिवसेनेचे का बरे वावडे?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज दाकल झाले. या प्रक्रियेत गेल्या चार दिवसांपासून विविध मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत एक सवाल विचारला गेला- उबाठाचे प्रवक्ते पत्रकारांना वा वृत्तवाहिन्यांना उपलब्ध का नसतात? त्याबाबत निरीक्षणातून हाती आलेली...

‘केइएम’मध्ये मदत कक्षालाच हवी मदत! तपासायला डॉक्टर मिळाला तर उत्तमच!!

मुंबई महापालिकेच्या प्रमुख समजल्या जाणाऱ्या केइएम रुग्णालयात डॉक्टरांसहित कर्मचारी-कामगारांमध्ये सुमारे २० टक्के इतकी मोठी कपात करण्यात आली असून मोडकळीस आलेले स्ट्रेचर्स वगैरे सामान गोदमात ढकलून देण्यासाठीही कामगार नसल्याची संतापजनक माहिती हाती आली आहे. अपघात विभागातील डॉक्टरांची संख्या तर एक-दोन...

मुंबई बॉम्बस्फोटांचे मास्टरमाईंड अंमली पदार्थांच्या फॅक्टरीमागे?

मुंबईच्या आग्रीपाडा पोलीसठाण्याच्या समोरच्या बाजूसच असलेल्या घास गल्लीतील अमली पदार्थांचा कारखाना नार्कोटिक्स विभागाने उद्ध्वस्त केल्यानंतर गेले सुमारे पाच-सहा दिवस दक्षिणमध्य मुंबईतील अनेक भागांना भेटी दिल्यानंतर एक गोष्ट हळूहळू स्पष्ट होत आहे की, या अमली पदार्थांच्या व्यापार व कारखान्यांमागे मुंबईत...
Skip to content