Homeन्यूज अँड व्ह्यूजमुख्यमंत्री एकनाथरावांच्या 'आनंदावतारा'चा...

मुख्यमंत्री एकनाथरावांच्या ‘आनंदावतारा’चा खासदार म्हस्केंनाही ‘प्रसाद’?

गुरुवारी गौरीविसर्जनाच्या दिवशी संध्याकाळ व रात्रीच्या सुमारास धर्मवीर आनंद दिघे यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आनंदाश्रमात ढोलताशांच्या गजरात केलेल्या नोटांच्या उधळणीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधी नव्हे इतके संतप्त झाले असून त्यांनी आनंदाश्रमाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे खासदार नरेश म्हस्के हेही यातून सुटले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

खरंतर विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सगळ्याच वर्तमानपत्रांनी या बातमीस ठळक प्रसिद्धी दिली होती. बातमी पाहताच सकाळी सकाळी एकनाथरावांचा पारा चढला होता. काहीतरी कारवाई करण्याचा बेत त्यांच्या मनात शिजत असतानाच साखळी 11 वाजण्याच्या सुमारास त्या नोटांच्या उधळणीची चित्रफीत सर्वत्र प्रसारित झाल्यावर मात्र त्यांचा पारा टिपेला पोहोचला. त्यांच्यासमोर जाण्याचे धैर्य त्याक्षणी तरी कुणाकडेच नव्हते. ते आतल्या आत धूमसत होते. या संतापाच्या वेळी जणू त्यांनी ‘आनंदावतार’ घेतल्याचे तेथे हजर असलेल्यानी सांगितले.

खरंतर मुख्यमंत्री टोकाचे भडकत नाहीत. भडकले की ते सर्वांना केबिनबाहेर घालवून काही मिनिटे एकटेच शांत बसलेले दिसतात. पण ते आतून कमालीचे भडकलेले असतात, असा त्यांच्या मित्रांचा अनुभव आहे.

“जो जो उठे तो तो नेता|

मारी लंब्याचवड्या बाता;

परी हुल्लडीचा नियंता|

कुणी नाही|(मर्ढेकर)

असे मात्र काहीही न होता चित्रफीत पाहिल्यावर त्या आऊ नामक कार्यकर्त्याची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. इतर राजकीय पक्षांप्रमाणे चौकशी करू, समिती नेमू आणि समितीचा अहवाल आल्यावर कारवाई करू, असा लंबाचवडा प्रवास टाळून अवघ्या 24/30 तासांत निर्णय घेऊन आम्ही कठोर कारवाईही करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदनच केले पाहिजे.

खरंतर आनंदाश्रमाचा विषय आमच्या मनात गेले वर्षभर घोळत होता. कारण दररोज नसले तरी आम्ही कोर्ट नाका व जिल्हधिकारी कार्यालय परिसरात नियमित जात असतो. अत्यन्त वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या आनंदाश्रमात नेहमीच गर्दी असते. खासदार वा अन्य नेता येणार असेल तर गर्दी प्रचंड वाढत असते. साहजिकच गर्दीच्या मानाने आश्रम कमी पडतो. तरी मुख्यमंत्री कार्यकर्त्यांना आपल्या निवासस्थानीच भेटत असल्याने गर्दीचा व शिस्तीचा प्रश्न सुटत असला तरी कार्यकर्त्यांना आनंदाश्रमच बरा पडतो. कारण जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय व शासकीय विश्रामधाम तसेच सर्व सरकारी कार्यालये जवळपासच आहेत. परंतु आनंदाश्रमास शिस्तीचे बरेचसे वावडेच असल्याचे दिसून आले आहे.

ठाणे शहरातील व जिल्ह्यातील दुसऱ्या फळीतील नेत्यांचा हा मीटिंग पॉईंटचा पत्ता असून आता कार्यकर्ता म्हटले की त्याची चौकशी थोडीच केली जाणार? कार्यकर्त्यांच्या कपाळावर थोडीच हा सज्जन, हा दुर्जन, हा काम घेऊन आलेला आदी स्टिकर असतात? आणि नेतेही मग ते पहिल्या फळीतील असोत वा दुसऱ्या फळीतील, त्यांच्याबरोबर किमान 10/15 कार्यकर्ते असतातच. या कार्यकर्त्याची गर्दी त्याहून नेत्यांच्या कामाची गर्दी या गर्दीमुळेच अनेक कामांची ‘वाटच’ चुकते!

शहरात व जिल्ह्यात सवतेसुभे

सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सर्वांनाच सामावून घेता आले नसल्याने अनेक स्थानिक भाईंमध्ये ‘शीतयुद्ध’ सुरु असल्याचे समजते. पक्षात वागळे इस्टेट, कोपरी, नितीन कंपनी परिसर, लुईस वाडी, वर्तक नगर आदी भागांना नको इतके महत्त्व देण्यात येत असून खोपट मानपाडा, बाळकूम, कासरवडवली, गायमुख, काल्हेर, चितळसर आदी अनेक भागांना कुणी विचारतच नाही, अशी परिस्थिती आहे. घोडबंदर येथील अनेक समस्यांबाबत कुणी नेता काही बोलतच नाही अशी ‘नकोशी’ परिस्थिती आहे. तसेच आमदार व प्रमुख नेत्यांमध्येही खलबली आहे. अनेक माजी आमदारांनीही तिकिटासाठी फिल्डिंग लावल्याने अनेकांना पोटदुखीचा आजार सूरु झाला आहे. शिवसेनेवर होणाऱ्या टिकेला कुणी प्रत्युत्तर द्यायचं हीही समस्या आहे. या सर्वातूनच…

“करा रे खुशाल करा हवा तो राडा

धम्माल करण्याचा जमाना आहे…

हवामान चांगले आहे, फेस्टिव्हल कार्निव्हलचा सिझन आहे

सहनशील आहेत समजूतदार गांडू” (शांताराम)

अशी एकूणच समाजाची धारणा असून…

“मस्तली इच्छेची काया| ईर्षा अंहता असुया

बोचती जैशा की सुया| इंजेक्शआनी|| (मर्ढेकर)

अशी थोडक्यात शिवसेनेची अंतर्गत परिस्थिती असून

“मतामतांचा गलबला| कोणी पुसेना कोणाला

जो जे मती सापडला| तयास तेची थोर’ (समर्थ रामदास)

याची उदंड भर पडलेली असून निवडणुकीच्या काळात यांचा ‘भार’ पडू नये हीच इच्छा! बाकी एकनाथराव समर्थ आहेतच!!

छायाचित्रः प्रवीण वराडकर

Continue reading

मालकांचा देव!

"मालकांचा देव। मालकांना पावे.. आम्ही फक्त व्हावे। अन्नभक्त.. पोटाच्या हातात। आत्म्याचा पतंग.. स्वप्नांचे हे रंग। शेपटाला.." या कविवर्य विंदा कारंदीकर यांच्या ५० वर्षापूर्वीच्या (कदाचित जास्तच) ओळी आठवायचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेले काटकसरीचे आवाहन! काटकसर करा आणि महागड्या वस्तूंचा मोह टाळा, या पंतप्रधानांच्या आवाहनाला...

येथे प्रत्येक छायाचित्र बोलते…

"For me the subject of the picture is always important than the picture" हा सुविचार दिवंगत छायाचित्रकार रजनीश काकडे यांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनात प्रकर्षाने जाणवत होता. रजनीशला आदरांजली वाहण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या...

‘एशियाटीक’ची निवडणूक जूनमध्ये तरी होणार? दोन्ही बाजूंच्या सदस्यांत घुसखोर!

मुंबईतल्या एशियाटीक लायब्ररी, या प्रतिष्ठित संस्थेची निवडणूक 'घुसखोर' सदस्यांशिवाय जून महिन्यात घेण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला असला तरी ती जूनमध्येच होईल की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. कारण नव्याने निवडल्या जाणाऱ्या कार्यकारिणीची मुदत केवळ सप्टेंबर...
Skip to content