वाचक हो, तुम्हाला आठवत असेलच की जुन्या हिंदी चित्रपटात अर्ध्या नोटेचं चिटोरं दाखवलं की खलनायकाच्या गुहेत विनासायास प्रवेश मिळत असे. (हल्ली काही वेबसिरीजमध्येही हा खेळ दाखवत असतात) तसेच लाचलूचपत प्रतिबंधक खात्यातर्फे धाड पडली की काहीजण नोटा खातात. काहीजण संडासाच्या फ्लशमध्ये जादाचे पैसे टाकतात. काहीजण उंच इमारतीतून नोटा खाली फेकतात. विमानतळ परिसरात तर गुदद्वारातही हिरे वा सम्गल्ड वस्तू लपवल्या जातात हे आपण वाचलेले आहे. मुंबईतल्या जे जे रुग्णालयाच्या एका मोठया डॉक्टरने तर पोलिसांची धाड पडल्यावर ‘शायनिंग’ मारण्यासाठी मी केंद्रीय गृहमंत्र्यांचा जावई असल्याचे सांगितले होते. केंद्रीय मंत्र्यांबरोबरचे नाते खरे होते. पण त्यांना सांगूनच ते धाड घालायला आले होते. त्यामुळे जावयाची ही ‘मात्रा’ काही लागू पडली नाही. एक लक्षात ठेवले पाहिजे की पोलिसांची धाड पडत नाही तोवरच सर्व मित्र व नाती असतात. एकदा धाड पडली की, मी यांना ओळखत नाही इतवरचा प्रवास एका झटक्यात होतो.
तुम्ही विचाराल, सायबानू इतकं गुऱ्हाळ कशाला? मुद्द्यावर यायला काय घेणार? काहीही घेणार नाही. अहो ही गोष्टच देण्याघेण्याची आहे. पण, थोडी वेगळी. तर.. गेल्या आठवड्यात मुंबई शहराच्या पश्चिम उनगराला खेटून असलेल्या भाईंदर रेल्वेस्थानकातील रेल्वे पोलीसठाण्याच्या उद्घाटनाचा समारंभ झाला. आता रेल्वेतील समारंभ म्हणजे थाटातच होणार, हे ओघाने आलेच!

रेल्वे पोलिसांचे काही कारनामेही गेल्या 15/20 दिवसांपासून चर्चेत असताना समारंभ साधेपणाने पण शानदार झाला हे सांगायला नकोच! या नवीन पोलीसठाण्यामुळे भाईंदर परिसरातील रेल्वेमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांना चाप बसेल, अशी आशा व्यक्त करून चहापान सुरु झाले. अल्पोहाराबरोबर चहा व ताक देण्याची व्यवस्था केली गेली होती. ताक देऊन आम्ही कशी संस्कृती जपत आहोत, हेतू शुद्ध शाकाहाराचा दाखवण्याचा हेतू असावा. (हेतूबाबत शंका नको.)
भाषणे झाली, खाणेही सर्व्ह झाले आणि काहीजणांपुढे ताकाचे ग्लास दिले गेले. त्यात काही पत्रकार व ज्येष्ठ पोलीस अधिकारीही होते. थोड्याच वेळात एका पत्रकाराने आपल्या ताकाच्या ग्लासात काचसदृश्य काही वस्तू असल्याचे आयोजकांच्या निदर्शनास आणले. झाले.. एकच हलकल्लोळ माजला! कॅन्टीनवाल्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला. (साहजिकच आहे, म्हणा.) एकच धावपळ सुरु झाली. आयोजक त्या पत्रकाराला कोपऱ्यात घेऊन गेले. अर्थात समजवण्यासाठीच! पण, प्रकरण संपले नाही. पत्रकाराला समजवल्यानंतर प्रकरण खरेतर संपले होते. पण छे.. रेल्वे पोलिसचं ते.. कुजबुज सुरु झाली. अरे, त्या काचेच्या ग्लासाची न्यायवैद्यक तपासणी करायला हवी होती. म्हणजे ती काचसदृश्य वस्तू नेमकी काचच होती की हिऱ्याची काच होती याबाबत पोलिसांमध्येच तर्कवितर्क सुरु जाहले! कारण 15 / 20 दिवसापूर्वीचा ‘उंगलीमे अंगुठी सरकानेका’ किस्सा वायरल हुआ था! तिरुपती बालाजीच्या आशिर्वादाने तसें काही घडू नये याची प्रार्थना तिरुपतीला जाऊन काही शिष्यांनी केल्याचेही छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरात बोलले जात आहे. तो काचेचा तुकडा नेमका एकच कसा सापडला, कारण कुठलीही काचेची वस्तू फुटते तेव्हा अनेक तुकडे होतात. आणि हा एकच तुकडा पत्रकाराच्याच ग्लासात कसा? की हा ग्लास कुणा महत्त्वाच्या व्यक्तीला द्यायचा होता तो गरीब पत्रकाराच्या वाटेला आला? शिव.. शिव..
(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आणि गुन्हेविषयक अभ्यासक आहेत.)

