Homeमाय व्हॉईसचला काकू चला.....

चला काकू चला.. वाईन रामायण होतेय सुपरफाईन!

“प्रचारावाचोन हालो नये,

प्रचारावाचोन चालो नये,

प्रचारावाचोन बोलो नये, 

इहलोकी कदापि”

या पाडगावकर यांच्या ओळी आठवण्याचे कारण म्हणजे सध्या राज्यात सुरू असलेले ‘वाईन रामायण’.. मोठ्या सुपर मार्केट्समध्ये वाईन ठेवण्यास परवानगी देण्यासंबंधी महाराष्ट्र सरकारने निर्णय काय घेतला, राज्यात वाईन रामायणच सुरू झाले. राज्यातील विरोधी पक्षाने हे राज्य मद्यराष्ट्र करण्याचा चंग शिवसेनेच्या नेतृत्त्वातील आघाडी सरकारने बांधला असल्याचा आरोप केला. त्यानंतर शेजारच्या भाजपाशासित मध्य प्रदेशमध्ये दारूबाबत काय धोरण आहे, असे तेथील पत्रकार मित्रांना विचारले असता त्या सर्वांनी बॉम्बच फोडले. त्यापैकी एक बॉम्ब मीही येथेच फोडला. त्यावर अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी हे खरे आहे का? अशी विचारणा केली. आज या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता आणखी मोठा बॉम्ब फुटला!!

तो बॉम्ब म्हणजे मध्य प्रदेश सरकारने चक्क 20 टक्क्याने दारू स्वस्त केली आहे. आता आहे की नाही हा मोठा बॉम्ब. दारू 20 टक्के स्वस्त करून ते सरकार थांबलेले नाही. महाराष्ट्र सरकारने तर सुपर मार्केट्समध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी दिली आहे तर मुख्यमंत्री मामांनी सुपर मार्केट्समध्ये दारू विक्रीला ठेवण्याचे योजले आहे. मध्य प्रदेशमधील इंदूर, भोपाळ, जबलपूर आणि ग्वालीयर या मोठ्या शहरांतील सुपर मार्केट्समध्ये दारू ठेवण्याविषयी सकारात्मक धोरण स्वीकारले आहे. तसेच ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा एक कोटी आहे त्यांना घरात बार निर्माण करण्याची परवानगी फक्त 50 हजार रुपयांच्या शुल्कात मिळणार आहे. शिवाय सामान्य माणूस घरात बियरच्या 24 बाटल्या वा टिन्स तसेच 10 दारूच्या बाटल्या ठेवू शकतो, असे जाहीर करून दारू आणि पाणी, सर्वांना एकाच पातळीवर आणले आहे (समान भावनेचा विजय असो..).

सध्या मध्य प्रदेशात देशी दारूची 2544 दुकाने आहेत तर विदेशी दारू देणारी 1061 दुकाने आहेत. या दुकानांच्या संख्येत भरीव वाढ करण्याचा मानस अबकारी खात्याने व्यक्त केला आहे. यासंबंधात मायाळू मामांवर अबकारी खात्याने विश्वास व्यक्त केला आहे. तसेच आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात सेवन करण्यात येत असलेल्या देशी, विशेषतः महुआच्या दारूला प्रोत्साहन देण्याचा इरादाही काही अबकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

यादरम्यान एक विलक्षण माहिती हाती आली. ती अशी की- गुजरातमध्ये दारूबंदी आहे हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु याच गुजरातमध्ये चोरटी दारू मोठ्या प्रमाणात मिळते हेही सर्वांना ठाऊक आहे. गुजरातला पुरवण्यात येणाऱ्या चोरट्या दारूपैकी 70 टक्के दारू मध्य प्रदेशातून जात असते अशी कुजबुजही कानावर आली..

“पेटता घरे पेटवावी विडी

प्रत्येक माणूस मानावी शिडी,

शिडीवरून मारावी उडी

खुर्चीवर सत्तेच्या”

हे मंगुअण्णा म्हणतात तेच खरे!!

1 COMMENT

  1. पूर्वी लोक उदरनिर्वाहासाठी मुंबईचा आधार घेत, आता कोरडा घसा ओला होत रहावा म्हणून तमाम दारूप्रेमी मुंबईकरांनी मध्यप्रदेशात शिफ्ट होऊन मुंबईवरचे लोकसंख्येचे ओझे कमी करावे हेच सुचवताय ना काळे!!

Comments are closed.

Continue reading

आग्रीपाड्यातली ‘यास्मिन’ आणि पोलिसांचे ‘डोला रे डोला…’!

बुधवारच्या जवळजवळ सर्वच वर्तमानपत्रात 'आग्रीपाडा येथील ड्रग फॅक्टरी उद्ध्वस्त', अशी बातमी वाचली व मन एकदम भूतकाळात गेले. लगेचच मनाशी ठरवले, आज आग्रीपाड्यात जायचेच आणि गेलोही! आग्रीपाडा पोलीसठाण्याच्या दारातच उतरलो. आजूबाजूला नजर टाकली. प्रशस्त रस्ता, गगनचुंबी इमारती.. काही इमारती तर...

ठाणे पालिकेच्या गावदेवी मार्केटला ना ओसी, ना योग्य अग्नीसुरक्षा!

ठाणे शहरातील महापालिकेच्या गावदेवी मार्केटला आग लागून सर्व मार्केट आगीत भस्मसात झाल्याला आज आठवडा झाला असूनही मार्केट सफाईचे काम अत्यंत हळू सुरु असल्याबाबत गाळेधारकांनी संताप व्यक्त केला आहे. यांत्रिक झाडू वा आधुनिक पद्धतीने सफाई न करता बाबा आदमच्या काळाप्रमाणे...

गावदेवी मार्केटची आग संशयाच्या भोवऱ्यात!

दोन दिवसांपूर्वीच आमचे वकीलमित्र गणेश सोवनी यांनी सव्वा सात वाजता पाठवलेला एक मेसेज पाहून मी हादरलोच! मेसेज छायाचित्रासह असल्याने त्याचे गांभीर्य लगेचच लक्षात आले व सकाळची सर्व कामे आटोपल्यावर ठाण्यातीलच गावदेवी मार्केट परिसरात जाण्याचे पक्के केले. वकीलसाहेबांनी पाठवलेल्या मेसेजमध्ये...
Skip to content