Homeटॉप स्टोरीराज्य सरकारकडून कृषी...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र आणि ट्रॅक्टरचलित रुंद सरी वरंबा यंत्रांसाठी सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पुढील ३ वर्षांसाठी ५ हजार ६६८ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या अनुषंगाने कृषी विभागाने राबविलेली ही कृषी समृद्ध योजना शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाच्या कृषि विभागाच्या प्रचलित योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या ट्रॅक्टरचलित रुंद सरी वरंबा यंत्र, वैयक्तिक शेततळे, शेतकरी सुविधा केंद्र उभारणी आणि मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन हे घटक अधिक विस्तृत स्वरुपात राबवून जास्तीतजास्त लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्याच्या दृष्टीने त्याची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कृषी समृद्धी योजनेत ट्रॅक्टरचलित रुंद सरी वरंबा यंत्र, वैयक्तिक शेततळे, शेतकरी सुविधा केंद्र उभारणी, मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन या चार घटकांचा समावेश आहे. यामध्ये २५ हजार रुंद सरी वरंबा यंत्रासाठी १७५ कोटी, १४ हजार वैयक्तिक शेतळ्यासाठी ९३ कोटी, शेतकरी सुविधा केंद्र उभारणीसाठी ५ हजार कोटी आणि ५ हजार ड्रोनसाठी ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत विविध शेती उपयोगी यंत्र पुरवणे, जैविक निविष्ठ निर्मिती केंद्र उभारणे, प्लास्टिक अस्तरीकरण, शेततळे, एकात्मिक कीड नियंत्रण, अन्नद्रव्य घटक व्यवस्थापन, मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारणी, शेतीसाठी ड्रोन या आदी बाबींचा समावेश आहे, असे भरणे म्हणाले.

राज्यभरात २५,००० बीबीएफ यंत्रांचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी एक यंत्र दर हंगामात सुमारे १०० हेक्टर क्षेत्रावर काम करू शकते. परिणामी २५ लाख हेक्टर क्षेत्रावर ही पद्धत लागू करता येईल. तसेच बियाण्याचा वापर ३०-४० टक्के कमी आणि उत्पादनात १५-२० टक्के वाढ अपेक्षित असून यंत्राच्या किमतीच्या ५० टक्के किंवा कमाल ७० हजार रुपये देण्यात येणार आहे. राज्यात १४,००० शेततळ्यांच्या बांधकामासाठी मान्यता दिली गेली आहे. त्याचसोबत, काळी चिकणमाती असलेली जमीन प्राधान्याने निवडली जाईल. वाहत्या पाण्यात किंवा दलदलीच्या भागात कुंड्या घेता येणार नाहीत. यामध्ये शेडच्या आकारानुसार १६ हजार ८६९ ते १ लाख ६७ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सरकारने २ हजार ७७८ शेतकरी सुविधा केंद्रे उभारण्यास मान्यता दिली आहे. प्रत्येक केंद्रासाठी सरासरी प्रकल्प खर्च ३ कोटी रुपये असून कमाल सरकारी अनुदानमर्यादा १ कोटी ८० लाख रुपये ठेवण्यात आले आहे. यामध्ये मृद परीक्षण प्रयोगशाळा, जैविक खत उत्पादन केंद्र, भाडेतत्त्वावर अवजारे व ड्रोन उपलब्धता केंद्र, गोडाऊन व शीतसाखळी सुविधा, कीडनियंत्रण सामग्री व अन्नद्रव्य घटक याचा समावेश आहे. या नव्याने उभारण्यात येत असलेल्या शेतकरी सुविधा केंद्रांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. तसेच, केंद्र शासनाच्या नमो ड्रोन दिदी योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन याअंतर्गत राज्यात ५ हजार कृषी ड्रोन अनुदानावर दिले जातील. यामध्ये, ड्रोन किमतीच्या ५० टक्के किंवा ८ लाख रुपये अनुदान कृषी पदवीधरांना दिले जाईल. इतर लाभार्थ्यांना ४० टक्के किंवा ४ लाख रुपये अनुदान दिले जाईल आणि ड्रोन खरेदीसाठी, महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल, असेही भरणे यांनी स्पष्ट केले.

योजनेसाठी कोण पात्र?

२०२५-२६ ते २०२७-२८ या तीन वर्षासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून अर्जदार राज्यातील सातबाराधारक असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्याकडे अॅग्रीस्टॅक फार्मर नोंदणी क्रमांक आवश्यक आहे. लाभार्थी शेतकऱ्याने कृषी विभागाच्या महाडीबीटीवर ऑनलाईन अर्ज केल्यावर प्रथम येणाऱ्यास प्रथम लाभ या तत्वावर लाभार्थी निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना डीबीटीतून थेट बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकरी, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या महाडीबीटीवर अर्ज करून लाभ घेऊ शकतात.

Continue reading

अंकुश मोरे गौरव कबड्डी १५ डिसेंबरपासून

आंतरराष्ट्रीय पंच, ज्येष्ठ कबड्डी संघटक अंकुश मोरे यांच्या एकसष्ठीपूर्तीनिमित्त गोरेगावच्या अभिनव कला आणि क्रीडा अकॅडेमीने अभिनव क्रीडा मंडळ, एकता क्रीडा मंडळ, वडगाव आणि स्पोटवूट यांच्या सहकार्याने येत्या १५ ते २० डिसेंबर या कालावधीत भव्य जिल्हास्तरीय सुपर लीग आणि बाद...

आवडेल, भावेल असा साहित्यिक कार्यक्रम १३ डिसेंबरला मुंबईत

साहित्याची आवड असणाऱ्या सर्व लेखक, वाचक यांना आवडेल, भावेल असा साहित्यिक कार्यक्रम, येत्या १३ डिसेंबरला कोकण मराठी साहित्य परिषद, दादर शाखा आणि कोमसाप, मुंबई जिल्हा, कोमसाप युवा शक्ती यांनी रोटरी क्लब ऑफ मुंबई शिवाजी पार्क, दादर यांच्या सहकार्याने आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सानेगुरुजी...

मनोरा बॅडमिंटनः सात्रा, राजपूत, साळुंखे, डेनिस, चांडक, देसाई, गावडे, सामंत विजेते

मुंबईतल्या मनोरा बॅडमिंटन अकादमीच्या विद्यमाने नुकत्याच खार जिमखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या ११८व्या बॅडमिंटन स्पर्धेत पेहेर सात्रा, साऊजा राजपूत, आरोही साळुंखे, निवान डेनिस, अर्णा चांडक, अजिंक्य देसाई, रुद्रा गावडे, साईराज सामंत यांनी आपापल्या गटात विजेतेपदाचा मान मिळवला. राज्याच्या विविध...
Skip to content