Homeमाय व्हॉईसआतातरी ठाण्याचे आयुक्त...

आतातरी ठाण्याचे आयुक्त अभिजित बांगर यांचे कौतुक करा ना!

मी सातत्याने ठाणे रेल्वेस्थानकाच्या बजबजपुरीबद्द्ल लिहिलेले आहे, हे वाचकांना आठवत असेलच. ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी गोतावळा न घेता रेल्वेस्थानक परिसराची पाहणी करावी, असे आवाहनही मी केलेले होते. गेली अनेक वर्षं या स्थानकाला फेरीवाल्यांच्या समस्येने ग्रासलेले होते. रेल्वेस्थानकात जायचे म्हणजे हजारो फेरीवाल्यांच्या अडथळ्यास तोंड देत स्थानक गाठायचे म्हणजे चाकरमान्यांची ही अडथळ्याची शर्यतच होती जणू! परंतु आयुक्त बांगर यांनी पुढाकार घेऊन सर्व संबंधित यंत्रणांना बरोबर घेऊन काही कठोर उपाय योजलेत. त्याचे ठाणेकरांनी स्वागतच करायला हवे.

मला स्थानकपरिसर मोकळा झाल्याचे आधीच कळले होते. परंतु माझ्या मनात शंका होती की तीन-चार दिवस हा चमत्कार दिसेल आणि नंतर पुन्हा पाढे पंचावन्न!! पण मला सांगायला आनंद होतोय की, गेल्या १५/२० दिवसांपासून कधी नव्हे ते ठाणे रेल्वेस्थानक परिसराने मोकळा श्वास घेतलेला दिसतोय. मी एका रविवारीही स्थानक परिसरात फेरफटका मारून आलेलो आहे. अगदी दीड-दोन तास मनमुराद फिरलो आहे. कारण इतके मोकळे स्थानक पाहायची मला सवयच नव्हती. नोकरशहाने एकदा का ठरवले की आजच्या जमान्यातही चमत्कार घडतात. तसेच “we shall save city problems by leaving the city itself” हे विधान निदान एका बाबतीत तरी मागे घ्यावे लागत असल्याची प्रांजळ कबुली मी देत आहे.

ठाणे शहरातील राजकीय नेते आणि इतर सामाजिक धुरीण तसेच विविध कामगार संघटनांनी हे शहर जणू वेठीला धरल्यासारखे वाटत असतानाच आयुक्तांनी हा सुखद धक्का दिल्याचे मान्य करायलाच हवे. मात्र हे सुख चिरकाल टिकावे अशी सदिच्छा मी व्यक्त करतो. आता  जबाबदारी ठाणेकर नागरिकांची तसेच इतर राजकीय नेत्यांचीही आहे. एक सूचना मात्र येथे अवश्य करेन. जसा फेरीवाल्यांचा त्रास कमी झालेला दिसतोय असाच दुसरा मोठा त्रास म्हणजे भिकारी आणि बेवारस लोकांचा… एक भिक्षेकरी महिला सतत रिक्षा थांब्यावर आपल्या पांगुळगाड्यासह रांगेतील प्रवशांचा अंत पाहात होती. तिचे दोन फोटो सार्वजनिक केल्यापासून आता ती महिला गेले काही दिवस दिसत नाहीय. पण आता एक भिक्षेकरी बाबा अवतीर्ण झाला आहे.

हा एकच नव्हे तर किमान ७५/८० भिकाऱ्यांचा वेढाच स्थानक परिसराला पडलेला असतो. या रिक्षाच्या थांब्यालाच लहान मुलाची एक झोळीही बांधलेली दिसेल. संतापजनक बाब म्हणजे या रिक्षाथांब्याच्या मागील बाजूस पोलिसांची एक गाडी २४ तासांसाठी उभी असते. दररोज तेच काम करून पोलीसदादा कंटाळत असतील हे मान्य. परंतु हे सर्व पोलीसदादा सदैव माना खाली घालून मोबाईल पाहण्यातच गर्क असतात. या गाडीच्या आसपासच किमान दहा भिकारी घुटमळत असतात. या पोलीस गाडीतील अधिकारी मात्र मला चार वर्षांत कधीच दिसलेला नाही.

आता थोडे भिकाऱ्यांबाबत. या भिकाऱ्यांची मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय बळावत आहे. या भिकाऱ्यांना स्थानक परिसरात आणून सोडणारी व रात्री घेऊन जाणारी एक टोळी नक्की असणारच. अनेक बेवारस तर स्थानक परिसरातच ठाण मांडून बसलेले दिसतात. असाध्य रोगांनी ग्रासलेले भिकारीही अनेक दिसतात. पोलिसांनी या सर्वांना उचलून भिक्षेकरी सुधारगृहात डांबावे असे वाटते. परंतू तेथेही हे सर्व भिकारी ऐदूपणा सोडण्यास तयार नसतात, असे काही पोलिसांनी सांगितले. तसेच काही भिकारी या भिक्षेकरीगृहातून पळून जाणे पसंत करतात. “the mark of great city is not how its treat it’s special places everybody does the right but how its treat ordinary ones” हे जरी खरे असले तरी रेल्वेस्थानकात दररोज आपल्या रोजीरोटीसाठी जाणारी माणसे सर्वसामान्यच आहेत ना? मग अशा या सर्वसामान्यांसाठी आयुक्तांनी उचललेल्या पावलाचे ठाणेकर स्वागत कधी करणार?  की अजून मुहूर्त पाहताय? गूड जॉब आयुक्तसाहेब!!

Continue reading

येथे प्रत्येक छायाचित्र बोलते…

"For me the subject of the picture is always important than the picture" हा सुविचार दिवंगत छायाचित्रकार रजनीश काकडे यांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनात प्रकर्षाने जाणवत होता. रजनीशला आदरांजली वाहण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या...

‘एशियाटीक’ची निवडणूक जूनमध्ये तरी होणार? दोन्ही बाजूंच्या सदस्यांत घुसखोर!

मुंबईतल्या एशियाटीक लायब्ररी, या प्रतिष्ठित संस्थेची निवडणूक 'घुसखोर' सदस्यांशिवाय जून महिन्यात घेण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला असला तरी ती जूनमध्येच होईल की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. कारण नव्याने निवडल्या जाणाऱ्या कार्यकारिणीची मुदत केवळ सप्टेंबर...

ठाणे पालिकेच्या बेसमेंटमध्ये आहे ५० घमेली धूळ!

ठाणे शहरात संपूर्ण लोकमान्य नगर अगदी जुन्या बस डेपोपासून तो नव्या बस डेपोपर्यंत फेरफटका मारला असता रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेल्या दुचाक्या व रिक्षा यांना चकवत नागरिक कसे चालत असतील याचा विचारच न केलेला बरा. लोकमान्य नगरात तर एका ठिकाणी...
Skip to content