Details
ज्येष्ठ कामगार नेते अण्णासाहेब देसाई यांचा आज सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा!
01-Jul-2019
| 0
”
केएचएल न्यूज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
महाराष्ट्रात कामगारांचे हित जोपासत या चळवळीला बळकटी आणण्यासाठी अनेक नेत्यांनी परिश्रम घेतले. त्यात अण्णासाहेब देसाई यांचेदेखील योगदान मोलाचे आहे. बदलत्या कामगार कायद्यांची आव्हानं संघटनांपुढे असतानाही त्या टिकवणे आणि पितृतुल्य भावनेतून दोन्ही बाजूंनी अत्यंत जबाबदारीने समन्वय साधून कार्य करण्याची वृत्ती त्यांनी जोपासली आहे. त्यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा आज, सोमवार, 1 जुलै 2019 यादिवशी दुपारी 2 वाजता अंबरनाथ पूर्व येथील शिवकृपा सोसायटीत (शिवमंदिर रोड, गोविंद पुलाजवळ) होणार आहे.
भारतीय मजदूर संघाशी संलग्न राहिल्यानंतर वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांचे कार्य सुरू झाले. संघटनकौशल्याच्या स्वभावामुळे साहजिकच त्यांच्याकडे माणसं जोडली जात होती. वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये संघटन झपाट्याने वाढत गेले. सर्वांगीण विचार करून वेगवेगळ्या घटकांचा मेळ साधून कामगारांचे हित जपण्याचा त्यांचा स्वभाव निश्चितपणे चळवळीतील नव्या कार्यकर्त्यांसाठी अनुकरणीय आहे. भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, भारतीय टॅक्सी संघ, भारतीय पत्रकार संघ, चित्रपट उद्योग, मुंबई मजदूर संघ, ग्रंथालय कर्मचारी संघ, घरेलू कमगार संघ, सुरक्षारक्षक संघ अशा अनेक संघटनाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. शांत, संयमी वृत्तीने योग्य न्याय ते मिळवून देत आहेत. वीज कामगार कल्याण निधीच्या माध्यमातून 1300 सदस्यांना सुमारे 1.25 कोटी रूपयांची मदत त्यांनी मिळवून दिली आहे. वीज उद्योगात अंतर्गत सुधारणा कमिटीचा मार्च 2003 मध्ये तत्कालिन ऊर्जामंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून वीज प्रशासन व कामगार संघटनांमध्ये ऐतिहासिक करार करून घेतला. त्यामुळे वीजगळती कमी झाली. सततचा वीजपुरवठा, चांगली ग्राहकसेवा मिळाल्यामुळे वीज उद्योगाची प्रतिमा चांगली झाली. वीज कामगारांना निवृत्तीवेतन मिळावे यासाठी कमिटी नेमली. त्याचा सभासद म्हणून काम पाहिले. आपल्याच पैशातून वीज कामगारांना सरकारी नोकरीनंतर निवृत्तीवेतन मिळावे, असा प्रस्ताव तयार केला.
उल्हासनगर येथील शासकीय मुलांच्या बालगृह समन्वय समितीचे अध्यक्ष, दूरदर्शन व इतर चॅनेल्सचे स्ट्रिंगर न्यूज कॅमेरामन महासंघाचे उपाध्यक्ष, देसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष, हनुमान व्यवस्थापक मंडळाचे सस्थापक, जीजाऊ बाल विकास मंदिराचे संचालक, राज्य कामगार विमा योजना रूग्णालयाचे व केंद्रीय श्रमिक शिक्षा बोर्डाचे सल्लागार व छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळेचे अध्यक्ष अशा जबाबदाऱ्यादेखील ते सांभाळत आहे. कामगारांना आर्थिक स्थिरता मिळावी यासाठी सहकारी पतसंस्थांची निर्मिती त्यांनी वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये करून दिली आहे. कुलाबा जिल्हा वीज उद्योग कर्मचारी पतसंस्था, महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी पतसंस्था, एमएसईबी एम्प्लॉईज सहकारी पतसंस्था आदींसाठी ते कार्यरत आहेत. त्याशिवाय अनेक सामाजिक, सांस्कृतिक, सहकार संस्थांशीही त्यांचा संबंध आहे. गेली 45 हून अधिक काळ ते कामगारांचे नेतृत्त्व करत आहेत. वयाच्या 80 व्या वर्षांत पदार्पण होत असतानाही ते अविरतपणे काम करत आहेत. कामगारांच्या हिताच्या अनेक प्रश्नांवर त्यांचे कार्य सुरूच आहे.”

