Details
नरेंद्र विश्वनाथराव वाबळे
narendrawable@rediffmail.com
“भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अजित वाडेकर यांचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल. भारताला परदेशात यश मिळवून देणारे पहिले कर्णधार म्हणून वाडेकर यांचे नाव आदराने घेतले जाते. डावखुरे फलंदाज आणि स्लीपमधील चपळ क्षेत्ररक्षक म्हणूनदेखील ते ओळखले जातात. 1971च्या दौऱ्यात भारताने इंग्लंड आणि वेस्ट इंडीजच्या बलाढ्य संघांना त्यांच्याच देशात पराभूत करण्याचा चमत्कार केला. या चमत्काराचे शिल्पकार होते कर्णधार अजित वाडेकर. इंग्लंडमधील त्या विजयाला नुकतीच 49 वर्षे पूर्ण झाली. आता त्या विजयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू आहे. वाडेकर यांनी क्रिकेट विश्वात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. भारताचे कर्णधार, व्यवस्थापक, राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख अशा भूमिका त्यांनी बजावल्या.”
“1958पासून मुंबईने सलग 15 वर्षे रणजी विजेतेपद पटकाविले. तेव्हा अजित वाडेकर या संघाचे सदस्य होते. निवृत्तीनंतर मुंबई क्रिकेटच्या प्रशासनात उपाध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले काम केले. अध्यक्षपदाची निवडणूकदेखील लढविली. त्याशिवाय शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्ष म्हणूनदेखील त्यांनी उत्तम काम केले. दिव्यांग क्रिकेटपटूंच्या संघटनेची स्थापना त्यांनी केली. या संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी बहुमोल कार्य केले. आता तर या संघटनेला बीसीसीआयची मान्यतादेखील मिळाली आहे. असे असतानाही वाडेकर यांच्या हयातीत ते उपेक्षित राहिले. मुंबई क्रिकेट असोसिएशनने वेळीच त्यांचा गौरव केला नाही. तथापि, त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या नशिबी उपेक्षा यावी, हे भारतीय क्रिकेटचे दुर्दैव होय.”
“वानखेडे स्टेडियमच्या नॉर्थ स्टॅण्डच्या ब्लॉक्सना माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या विचाराधीन आहे. पण त्याचवेळी वाडेकरांचा मात्र असोसिएशनला विसर पडला आहे. वानखेडे स्टेडियमच्या दोन्ही प्रवेशद्वारांना पॉली उम्रीगर आणि विनू मंकड यांची नावे देण्यात आली आहेत. ती योग्यच आहेत. किंबहुना, वानखेडे स्टेडियम निर्माण होत असताना पॉली उम्रीगर यांनी घेतलेले परिश्रम सर्वश्रूत आहेत. वानखेडे स्टेडियमच्या स्टॅण्ड्स्ना सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर यांची नावे देण्यात आली आहेत. ड्रेसिंग रूमला विजय मांजरेकर यांचे नाव दिले गेले आहे. या नावांना आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. पण त्याचबरोबर वाडेकर यांचा विसरदेखील कोणाला पडता कामा नये. या संदर्भातील उल्लेखनीय गोष्ट म्हणजे वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखालील संघातच गावसकर यांनी आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीचा शुभारंभ केला. वाडेकर हे आपल्या कसदार नेतृत्त्वाने क्रिकेट विश्व गाजवत असताना सचिन तेंडुलकर जन्मालादेखील आला नव्हता. पण जेथे त्याचे नाव दिले गेले तेथे वाडेकरांचा मात्र संबंधितांना पद्धतशीर विसर पडलेला दिसतो.”
“उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मध्य प्रदेशातील इंदूर येथे होळकर स्टेडियम आहे. या स्टेडियममधील स्टॅण्ड्स्ना अजित वाडेकर आणि सुनील गावसकर यांची नावे दिली आहेत. मुंबईच्या या दोन महान क्रिकेटपटूंनी क्रिकेट क्षेत्रात जागतिक स्तरावर केलेल्या अतुलनीय कामगिरीची दखल मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने घेतली आहे. होळकर स्टेडियमच्या स्टॅण्ड्स्ना त्यांची नावे देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. पण ज्या मुंबईत वाडेकर यांची क्रिकेट कारकीर्द बहरली, ज्या मुंबई संघाचे त्यांनी यशस्वी नेतृत्त्व केले, ज्या मुंबई शहरात क्रिकेटला उभारी मिळावी म्हणून त्यांनी परिश्रमपूर्वक प्रयत्न केले, त्या मुंबई शहरात त्यांची उपेक्षा व्हावी! अरेरे, काय चालले आहे हे? राजकारण सर्व क्षेत्रात असते. गळाकापू राजकारणदेखील असते. पण क्रिकेटसारख्या क्षेत्रात राजकारण असावे आणि त्याचा फटका वाडेकर यांच्यासारख्या दिग्गजाला बसावा हे धक्कादायक आणि संतापजनक आहे. वानखेडे स्टेडियमच्या एखाद्या भागाला नाव दिल्यामुळे वाडेकर मोठे होणार नाहीत. ते आधीच खूप मोठे आहेत. पण त्यांच्या नावामुळे वानखेडे स्टेडियमची शोभा मात्र वाढणार आहे. क्रिकेटप्रेमी बॅ. शेषराव वानखेडे यांच्या सन्मानार्थ या स्टेडियमला त्यांचे नाव दिले गेले. त्या स्टेडियममध्ये वाडेकर उपेक्षित राहणार असतील तर ते वानखेडे साहेबांनादेखील पटणार नाही.”

