काल रात्रीचे साडेदहा वाजले होते.. संध्याकाळपासून मी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा शोधत होतो. परंतु ते कुठे आहेत ते सापडत नव्हते. माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी एका पत्राद्वारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये हफ्ता जमवून आणा असा आदेश दिल्याचा आरोप करून महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली होती. परिणामी अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा देणे भाग पडले होते. त्यानंतर संबंधित प्रकरण न्यायालयात गेले व आता त्याची सुनावणी सुरू आहे.
दरम्यान माजी आयुक्त परमबीर यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले. गुन्हेगारांना सोडण्यापासून ते कोट्यवधी रुपयांच्या खंडणीचे आरोप त्यांच्यावर पोलीस खात्यातील काही आजी-माजी अमलदारांनी केल्याने सर्व प्रकरण अधिकच गंभीर झाले. हे प्रकारणही न्यायालयात गेले आहे. आपल्यावर केलेले आरोप अंगलट येण्याची शक्यता दिसताच परमबीर यांनी आजारपणाची रजाच टाकली. ते आजपर्यंत आजारपणाच्या रजेवरच असल्याचे पोलीस महासंचालक कार्यालयातून समजले.
परमबीर यांनी आरोप केल्याप्रकारणी राज्य सरकारने नेमलेल्या चांदीवाल आयोगापुढेही ते अजूनपर्यंत हजर राहिलेले नाहीत किंवा त्यांनी आयोगाने पाठवलेल्या नोटीसीलाही उत्तर दिलेले नाही. यासाठी आयोगाने परमबीर यांना दोन वेळा प्रत्येकी २५ हजार रूपयांचा दंडही ठोठावला आहे.
परमबीर सध्या आहेत कोठे? पोलीस वर्तुळात चौकशी केली असता ते आजारी असल्याचे सर्वांनीच सांगितले. नेमके त्यांना काय झाले आहे ते मात्र कोणालाच माहीत नाही. काहींनी मात्र, त्यांना राजकारणाचे अजीर्ण झाले असून त्यांची झोप उडाली असल्याची खात्रीशीर माहिती दिली. पोलीस मुख्यालयात तर कुजबूज वाढू लागली आहे. तिच्या प्रचाराला ऊत आला आला आहे.

कोणी म्हणतात ते चंदिगढला गेले असावेत. कोणी म्हणतात केंद्र सरकारने त्यांना एखाद्या सिक्रेट मिशनवर परदेशात पाठवले असावे. पण, केंद्र सरकारने त्यांना कोठे पाठवले असेल तर त्याची माहिती राज्य सरकारला देणे केंद्राचे कर्तव्य ठरते, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. नंतर मात्र एकाने बॉम्बच टाकला. तो त्यांच्या लेटर बॉम्बपेक्षा मोठा आहे. परमबीर यांचे जवळचे नातेवाईक लंडन मुक्कामी राहतात. ते लंडनलाच असतील असे अनेकांचे मत पडले.
पण, मग आजारपणाची रजा टाकून ते लंडनला कसे जातील? दिल्लीच्या उघड मार्गाने तर नाहीच जाणार.. आणि परदेशी जायचे असेल तर राज्य सरकारला सांगावेच लागेल. किंबहुना त्यांची परवानगी आवश्यक असते. मग कोणीतरी म्हणाले, अरे वे तो खिलाडी हैं.. वे भी भाई लोग जैसे नेपालसेही ‘वन टू’ हुए होंगे..
माझी ट्यूब पटकन पेटली आणि मनात आले की, गुन्हेगार मंडळींचा हा खुष्कीचा मार्ग अनेक गुन्हे उकलणाऱ्या अधिकाऱ्यांस माहीतच असला पाहिजे. अनेक गुन्हेगार मंडळी नेपाळ मार्गानेच तर फरार व्हायचे!! आणि पोलिसांच्या स्वाधीन व्हायचे असेल तरीही नेपाळ कनेक्शनच कामी येत असे. कुख्यात छोटा राजन उर्फ नानाही नाही का नेपाळमार्गेच दिल्ली रेल्वेस्थानकाच्या फलाटावर आला होता.
गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून परमबीर आजारी असल्याचे सांगून रजेवर आहेत. शिवाय मुंबई पोलिसांनी त्यांच्यासंबंधी दोन लुक आऊट नोटीसाही जारी केलेल्या आहेत. या नोटीसा जारी केल्यावर खरे तर पोलिसांनी त्यांची शोधमोहीम हाती घेणे जरुरीचे होते. परमबीर यांच्या घरी गेल्यावर काय सांगण्यात आले, पोलीस त्यांच्या गावी गेले होते का, याचा सर्व तपशील न्यायालयासमोर पेश करण्याची आवश्यकता आहे. हे लिहीत असतानाच नाशिकच्या उपअधिक्षकानीही परमबीर यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे वृत्त आले आहे. परमबीर यांच्याबाबत महाराष्ट्र सरकार नरमाईचे धोरण तर स्वीकारत नाही ना?

