बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफ परिसरातील माता शीतला मंदिरात मंगळवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली. यात किमान ९ भाविक ठार, तर इतर अनेक जखमी झाले आहेत. चैत्र महिन्यातील शेवटचा मंगळवार असल्याने व महावीर जयंतीमुळे मंदिरात प्रचंड गर्दी जमली होती. बॅरिकेड्स तुटल्याने धावपळ उडाली. त्यामुळे भक्तांची झुंबड उडाली आणि त्याचे पर्यावसान चेंगराचेंगरीत झाले. जखमींना सदर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
बिहार सरकारने मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत. बिहार सरकारने पीडित कुटुंबांना आपत्कालीन निधीतून ₹ ४ लाख आणि मुख्यमंत्री मदत निधीतून ₹ २ लाख असे एकूण ₹ ६ लाख सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबाला ₹ २ लाख व जखमींना ₹ ५०,००० देण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजच नालंदा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी राजगीरमध्ये आल्या होत्या. त्यांच्या सुरक्षेसाठी बहुतांश पोलीस तैनात असल्याने मंदिराकडे पुरेशी सुरक्षाव्यवस्था नव्हती, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

