अंबरीश मिश्रा, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, अभ्यासू माणूस!आतापर्यंत कधीच कोणत्या वादात पडला नाही, पडण्याची गरजही नाही. माझ्या माहितीप्रमाणे तो काही काळ करंजिया यांच्या ‘डेली’ या इंग्रजी दैनिकात पत्रकारिता करत होता त्यावेळेपासून ओळख व मैत्री आहे. तो मुंबई महापालिकेत यायचा तेव्हापासून संबंध आहेत. डेलीत कुठलीही बातमी तथ्य कायम ठेवून काहीशी तिरकस करायची, ही करंजिया यांची पद्धत होती! तर अशा या आमच्या मित्राने ‘लोकसत्ता’ दैनिकात ‘दुर्गाबाई, काय हो झालं, एशियाटिकच…’ असं टाहोवजा ‘हुंदका’ देणारे हेडिंगखाली सध्या एशियाटिक ग्रंथालयात सुरु असलेल्या निवडणुकीसंदर्भात टिपण लिहिलं आहे. दरम्यान, या निवडणुकीला सध्या स्थगिती देण्यात आली आहे.
असो. या निवडणुकीत आमचे मित्रद्वय पत्रकार कुमार केतकर व खासदार विनय सहसराबुद्धे यांची दोन स्वतंत्र पॅनल्स एकमेकांसमोर उभी आहेत. विनयजींना मी ते आभाविपचे काम करत असल्यापासून ओळखत आहे तर कुमारजी, हे लोकसत्तेचे संपादक होण्याआधीपासून ओळखीचे आहेत. कुमारजी जरी काँग्रेस पक्षाचे खासदार होते तरी त्याआधीपासूनच पत्रकारितेत कार्यरत होते.
सोसायटी ‘रॉयल’च राहिलीय
मुंबईच्या या रॉयल सोसायटीची स्थापना १८०४मध्ये झाली. आशिया खंडातील साहित्य, इतिहास व समाजमनाचा इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने व या इतिहासाचे पूर्वग्रहदूषितवजा दास्तावेज करणाच्या हेतूने ही संस्था व त्याला जोडून ग्रंथालय स्थापन करण्यात आले होते. स्वातंत्र्य आंदोलनात या संस्थेच्या सदस्यांचे मोठे सहाय्य होते, हे मान्य केले तरी स्वातंत्र्यानंतर व संयुक्त महाराष्ट्र आंदोलन वगळता ही संस्था नेहमीच ‘इंग्रजाळलेली’ राहिलेली आहे, असे खेदाने म्हणावे लागते. अंबरीश, तू जी काही संपादकांची नावे घेतलेली आहेत ती सर्व मंडळी विद्वान होती यात शंकाच नाही. पण यातील ९९ टक्के विद्वान समाजाशी फटकून वागत असत. रोखठोक कुणीच व्यक्त होत नाही, ‘हेही खरे आणि तेही खोटे नाही!’ अशी बुळबुळीत धारणा होती. (अपवाद एकाचा). ज्या सोसायटीच्या पायऱ्यांवर रात्र रात्र जागून ज्या सामान्यांनी कष्ट केले त्याच्या वेदना वा त्यांची सामाजिक स्पंदने, या रॉयल सोसायटीला कधी जाणवलीच नाही! तर अशा या निवडणुकीत डावे आले काय किंवा उजवे पडले काय, याला काडीचेही महत्व नाही. अहो, ज्या सोसायटीला आपल्या कर्मचारी-कामगारांना सहा-सहा महिने पगार देता येत नाही, अशा सोसायटीला ‘रॉयल’ तरी कशापायी म्हणायचे? आहे काही उत्तर! आणि सरकारही (कुणाचेही असो) त्यांच्याशी फुटबॉल खेळते? केंद्रालाही दखल घ्यावीशी वाटत नाही. थू या विद्वानांच्या जिंदगानीवर…

मित्रा, तुला निदा फाजली माहित असेलच (अंबरीश हिंदी व उर्दू साहित्य ही जाणतो).
“दुनिया जिसे कहते है, जादूका खिलौना है
मिल जाये तो मिट्टी है, खो जाये तो सोना है”
अशी अवस्था या ग्रंथालयाची आहे. ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांना त्याची किमंत नाही. सर्वांनाच त्याचे राजकीय हत्यार करायचे आहे. स्वातंत्र्यलढ्यात १९०८मध्ये एका खटल्यात लोकमान्य टिळक यांना २२ जुलै रोजी देशद्रोही ठरवून शिक्षा ठोठावण्यात आली. लगेचच २४ जुलै रोजी मुंबईतील तमाम गिरणी कामगार स्वयंस्फूर्तीने संपावर गेला. ना कुणी नेता, ना संघटना! मुंबईत गोळीबार झाला. काही मृत्यूमुखी पडले. आंदोलन चिघळले. या गिरणी कामगार संपाचे रशियाच्या लेलिन यांनी तोंडभरून कौतुक केले. हा संप तसेच काही वर्षांपूर्वी झालेला गिरणी कामगारांच्या प्रदीर्घ संपाचा राजकीय फायदा डाव्यांना घेता आला नाही. तसेच यावेळी या रॉयल सोसायटीने कामगारांना वाऱ्यावर सोडले होते, हे कामगारवर्ग अजूनही विसरलेला नाही. म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे या रॉयल निवडणुकीत सामान्यांना कवडीचाही रस नाही. हा हस्तींदंती मानोरा आहे. कुणीही विजयी झाला तरी त्यांच्या पितृसंस्थेलाच आनंद होणार.
प्रख्यात इतिहासकर त्र्यबंक शंकर शेजवलकर यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्राला एक जबरदस्त भूत, फार मोठा समंध बांधत आहे, त्याचे नाव ‘इतिहास’ आहे. अंबरीश मित्रा.. तुही या इतिहासातच गुरफटलास रे! तसा तू नेहमी जमीनवरच असतोस, यावेळी काय बिघडले रे…
एका वेगळ्या अर्थाने..
“तेरे चूपचाप गुजरने की सदा सी आए
सामने आते हुए होठ भी सी आए” (तलख)
(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

