गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने ज्ञानविकास विद्यालय, कोपरखैरणेचा ३२-१९ गुणांनी पराभव केला. एसआयईएसकडून वैदेही गवळी तर ज्ञानविकास हायस्कूलकडून वैभवी सिंग यांनी उत्कृष्ट खेळ केला.
उपांत्य फेरीच्या सामन्यात ज्ञानविकास हायस्कूलने सेंट जॉन हायस्कूलचा आरामात पराभव केला. सेंट जॉन हायस्कूलची कृतिका कदम तर ज्ञानविकास विद्यालयाची उन्नती रावडे ह्या छान खेळल्या. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एसआयईएस हायस्कूल व कुमुद विद्यालय हा सामना ३२-३२ गुणांनी बरोबरीत सुटला. मग ५-५ चढायांच्या जादा डावात एसआयईएसने बाजी मारली.
ह्यावेळी कबड्डी खेळातील नामांकित राष्ट्रीय खेळाडू पुष्पा डावरे, उषा सावंत, श्रद्धा म्हात्रे, सुवर्णा लोखंडे, स्वाती पार्थ, यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला तसेच पारितोषिक वितरण समारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुणे असलेल्या पुष्पा डावरे NIS सेंट्रल रेल्वे महिला कबड्डी कोच यांनी, वरील चारही संघांना रोख रक्कम देऊन प्रोत्साहन दिले. दीपक कांदळगावकर, विकास लाड, संतोष देवरुखकर, राष्ट्रीय खेळाडू भारत संघाणे, शशी चव्हाण, नितीन घाग, राजा हुमणे, सुभाष चव्हाण, प्रतिक गाढवे, मनिष मोरे, अतुल चव्हाण, निलेश झंजे, अमित कांबळे, अॅड. विश्वास कांबळे यांनी स्पर्धेला उपस्थिती लावून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. राष्ट्रीय प्रशिक्षक, खेळाडू बंडू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. अविनाश महाडिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत घेतली.

