कृषी साहित्यखरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट असे नाना प्रकारचे आरोप माझ्यावर करण्यात आले, यामध्ये कृषीखरेदीबाबत सुरुवातीला उच्च न्यायालयात ज्यांनी तक्रार केली होती, त्यांनी खोटे पुरावे दिले आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शासनाची बदनामी केली म्हणून उच्च न्यायालयाने एक लाखांचा दंड ठोठावला. त्यांनी तो भरलासुद्धा. ऑफिस ऑफ प्रॉफिट, पिक विमा असा कोणताही आरोप सिद्ध झाला नाही. मात्र माझ्या बदनामीच्या ट्रायल रंगवून दाखवल्या गेल्या. हे एक मोठे षडयंत्र असून, मला केवळ राजकारण किंवा समाजकारण यामधून संपवायचे नाही तर काही लोकांना मी या पृथ्वीतलावर नको आहे. त्यातून हे सगळे घडवून आणले जात असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.
आज मुंबईत विधानभवन येथे मुंडे यांनी बऱ्याच दिवसांनंतर प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राज्याच्या कृषीमंत्रीपदी असताना केलेल्या कृषी साहित्य खरेदी संदर्भात उच्च न्यायालयापाठोपाठ राज्याच्या लोकायुक्तांनीदेखील आपल्याविरुद्ध केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपण शासनाच्या नियमानुसार व शेतकऱ्यांचे हित समोर ठेऊनच संबंधित खरेदीबाबतचा निर्णय घेतला होता. या प्रकरणात न्यायव्यवस्था आणि नियतीने सत्य समोर आणले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
अंजली दमानिया यांच्याबाबत विचारले असता धनंजय मुंडे म्हणाले की, त्यांनी संपूर्ण जीवनात माझ्यासह नितीन गडकरी, अजितदादा, खडसे, भुजबळ, तटकरे, अशा अनेक नेत्यांवर ढीगभर आरोप करून बदनामी केली. मात्र त्यांनी केलेला एकतरी आरोप कुठे सिद्ध झाला का? केवळ खोटे पुरावे समोर आणायचे, माध्यमांच्या समोर सनसणी निर्माण करायची आणि एखाद्याला बदनाम करायचे, हे सगळे थांबवले गेले पाहिजे. आपल्या प्रकरणात आपण सध्यातरी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार नसल्याचे मुंडेंनी स्पष्ट केले.
दरम्यान मागील काही महिन्यांपासून आपल्याविरुद्ध मोठे षडयंत्र रचले जात आहे. त्यातूनच रोज नवनवीन आरोप आणि बदनामीची एक अजब मालिका सुरू आहे. मात्र न्यायव्यवस्थेसमोर एकही आरोप सिद्ध झालेला नाही. आपली बाजू सत्याची आणि त्यामुळेच नियती आपल्या सोबत आहे. त्यामुळे सहकारी आणि कार्यकर्त्यांनीदेखील संयम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

