Homeमाय व्हॉईसतुमच्या बापापेक्षा माझा...

तुमच्या बापापेक्षा माझा काका मोठा आहे…

जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम सुरू होती. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रपणे घड्याळ चिन्हावर या निवडणुकांना सामोरे जात आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी एकच आहे. निवडणूक काळात जेव्हा अजितदादांवरआरोप झाले तेव्हा ते म्हणाले- तुमच्या बापापेक्षा माझा काका मोठा आहे… दादांचे हे वाक्य सर्वांचे लक्ष वेधून घेत असतानाच सकाळी सव्वानऊ वाजता शिवसेनेचे माजी आमदार शिशिर शिंदे यांचा मला फोन आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा सकाळी पावणेनऊच्या सुमारास बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाल्याचे त्यांनी मला सांगितले. मला धक्का बसलाच. पण  या घटनेने सारा महाराष्ट्र हळहळला. आदल्या दिवशी मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अजितदादा उपस्थित होते. बुधवारी सकाळी ते एका छोट्या खाजगी विमानाने बारामतीला निघाले. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बारामतीत त्यांच्या तीन प्रचारसभा होत्या. बारामती विमानतळावर विमान उतरत असताना धावपट्टीजवळ ही दुर्घटना घडली नि मोठा स्फोट होऊन विमानाने पेट घेतला. वृत्तवाहिन्यांवर अजिदादांचा विमान अपघातात मृत्यू, अशा बातम्या सुरू झाल्या आणि सारा महाराष्ट्र सुन्न झाला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर महाराष्ट्र असाच अस्वस्थ झाला होता. अजित पवार हा लढवय्या नेता होता. त्यांचे काका शरद पवार यांचे बोट धरून ते सार्वजनिक जीवनात आले. पण त्यांनी आपल्या कामाने महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी शरद पवारांच्या विरोधात जुलै २०२३मध्ये बंडाचा झेंडा फडकवला. पक्षाचे चाळीस आमदार घेऊन ते भाजपप्रणित महायुतीच्या छावणीत दाखल झाले. एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव व घड्याळ हे चिन्ह त्यांनी आपल्या पक्षाकडे घेण्यात यश मिळवले. शरद पवारांनी १९९९मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस या नावाचे दोन पक्ष झाले. काकांच्या पक्षाला तुतारी चिन्ह मिळाले. दोन पक्ष वेगळे, दोन चिन्हं वेगळी. पण पवार परिवारात कौटुंबिक संबंध सलोख्याचे राहिले. दरवर्षी दिवाळीत पवार परिवार बारामतीत एकत्र असतो. कौटुंबिक कार्यक्रमाला सारे पवार कुटुंबीय एकत्र दिसले. राजकारण वेगळे असले तरी कौटुंबिक नातेसंबंध काका-पुतण्यांनी टिकवून ठेवलेत.

अजित पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातील लंबे रेस का घोडा होता. पण नियतीने त्यांच्यावर अचानक घाला घातला. अजितदादा म्हणजे शब्दाला पक्का, कामाला वाघ होता. त्यांच्या मृत्यूने राजकारणातील एक झंजावात संपला. प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड होती. दुसरीकडे सर्वसामान्य जनतेचे व कार्यकर्त्यांचे ते खऱ्या अर्थाने दादा होते. कार्यकर्त्यांसाठी वाट्टेल ते… असा त्यांचा खाक्या होता. मात्र चुकीचे काम कोणी आणले तर ते होणार नाही, असे रोखठोकपणे सांगणारा त्यांचा स्वभाव होता. लोकाभिमुख नेता कसा असावा याचे उदाहरण म्हणजे अजितदादा

काका

होते. दिलेला शब्द पाळणारा नेता होता. बारामती ते मंत्रालय असा त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. म्हणूनच त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना, दादा परत या असा आक्रोश सामान्य जनतेकडून प्रकट झाला. सन २००४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ७१ तर काँग्रेसचे ६९ आमदार निवडून आले होते. आपल्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आले, म्हणून मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला म्हणजेच आपल्याला मिळेल असे अजितदादांना वाटले होते. पण शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिले व आपली संधी गेली, अशी भावना अजितदादांनी नंतर अनेकदा बोलून दाखवली होती.

सुप्रिया यांचा २००९मध्ये राजकारणात प्रवेश झाला तेव्हाच अजितदादांना आता आपल्याला डावलले जाईल असे वाटू लागले होते. १९९९ ते २००९ या काळात ते सरकारमध्ये जलसंधारण मंत्री होते. त्याच काळात सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचे आरोप झाले. २०१४च्या निवडणुकीत भाजपाने अजितदादांवर भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चक्की पिसिंग.. पिसिंग.. असा फिल्मी डायलॉग मारला होता. तेव्हा आपली बदनामी करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे, असे अजितदादांनी म्हटले होते. सहकार क्षेत्रातील साखर कारखाने कवडीमोल भावाने विकल्याच्या त्यांच्यावर आरोप झाला होता. ऑगस्ट २०२२मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. नंतर ती फाईलच क्लोज झाली. दोन मे २०२२ रोजी शरद पवारांनी  पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हा, अजितदादांनी, नवीन चेहऱ्यांना सधी दिली जाईल असे म्हटले होते. पण चार दिवसातच शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला. त्यानंतर अजितदादांनी बंडाचा झेंडा फडकविण्याचा निर्णय घेतला व एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांनी शरद पवारांचा गळा घोटला, अशी टीका पवारांच्या निकटवर्तींयांनी त्यांच्यावर केली होती.  

सहा वेळा उपमुख्यमंत्री व रेकॉर्डब्रेक अर्थमंत्री अशी अजित पवारांच्या नावापुढे नोंद राहिल. सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे अशा मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत ते सरकारमध्ये विविध खात्याचे मंत्री राहिले. मुख्यमंत्री बदलत राहिले, पण अजितदादा उपमुख्यमंत्री नि अर्थमंत्री म्हणून कायम राहिले. मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न मात्र त्यांचे पूर्ण होऊ शकले नाही. अजितदादांचे नाव घेतले की त्यांनी देवेंद्र फडणवीसांबरोबर राजभवन (आता लोकभवन)वर पहाटेचा (तसा तो सकाळीच झाला) घेतलेला शपथविधी सर्वांना आठवतो. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री व अजित पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली होती. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर २२ नोव्हेंबर २०१९ रोजी नेहरू सेंटरला काँग्रेस, अविभाजित शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक चालू होती. या बैठकीला अजितदादा हातात एक फाईल घेऊन बसले होते. मधेच एक फोन आला म्हणून ते बाहेर गेले. दुसऱ्या दिवस उजाडला तो देवेंद्र व अजितदादांच्या शपथविधीच्या वृत्ताने सारा महाराष्ट्रात हादरला. हे सरकार पाच वर्षे चालेल असे  योजले होते. तेव्हा अजितदादा म्हणाले- तीन पक्षांच्या (काँग्रेस, शिवसेना व राष्ट्र्रवादी काँग्रेस) चर्चेला काही अंत नाही. एक महिन्यापासून चर्चा चालूच आहे, जी कुठे पोहोचणार नाही. राज्याला स्थिर सरकार हवे आहे म्हणून मी हे पाऊल उचलले. अजितदादा भाजपासोबत सरकार स्थापनेसाठी गेले, तेव्हा त्यांच्यावर घर फोडणारे म्हणून टीका झाली. त्यावर अजितदादांनी, आम्ही भाजपासोबत जाणार हे शरद पवारांना ठाऊक होते असे म्हटले. पण शरद पवारांच्या दबावामुळे अजितदादांबरोबर गेलेले बंडखोर आमदार परतले व पहाटे स्थापन झालेले सरकार ऐंशी तासात कोसळले.

सन २०२४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांनी त्यांची पत्नी सुनेत्रा पवारांना उभे केले. सुप्रिया निवडून आल्या. भाजपाच्या सांगण्यावरून अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुप्रियाविरोधात उभे केले अशी तेव्हा चर्चा झाली. नंतर अजित पवार यांनी म्हटले, बहिणीच्या विरोधात पत्नीला उभे करणे ही एक चूक होती. अजित पवार भाजपाबरोबर महायुती सरकारमध्ये सामील झाले तरी त्यांनी शरद पवारांशी संबंध तोडले नाहीत. अनेक सहकारी व शिक्षण संस्थांमध्ये काका-पुतण्या पदाधिकारी आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या नियमित भेटीगाठी होतच राहिल्या. भाजपासोबत जाऊनही ते भाजपाच्या आहारी गेले नाहीत. कधी जाती-धर्माचे राजकारण केले नाही. कधी हिंदू-मुस्लिम मुद्दा उगाळला नाही. नागपूर येथे विधिमंडळाच्या अधिवेशन काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन आपण संघ व भाजपाचे किती जवळचे आहोत असे प्रदर्शन केले नाही. सरकारमध्ये काही मनाविरूध्द घडले म्हणून वारंवार दिल्लीला धाव घेऊन मोदी-शाहांकडे तक्रारी केल्या नाहीत. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रावर पवार काका-पुतण्याचे विशेष प्रेम होते. भाजपाची मक्तेदारी तोडल्याशिवाय आपले पुण्यावर वर्चस्व निर्माण होणार नाही याची अजितदादांना खात्री होती. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून भाजपाच्या विरोधात लढवली. जिल्हा परिषद निवडणूकही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रपणे घड्याळ चिन्हावर लढवत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी एकच आहे. निवडणूक काळात जेव्हा अजितदादांवरआरोप झाले तेव्हा ते म्हणाले- तुमच्या बापापेक्षा माझा काका मोठा आहे… आज हेच वाक्य राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांच्या मनावर आदळत आहे.

(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

अजितदादाच म्हणाले होते- नियतीने बोलावल्यावर जावेच लागते!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याच्या घटनेने सारा देश हादरला. बारामती येथे विमान धावपट्टीवर उतरत असतानाच कोसळले, काही क्षणातच मोठा स्फोट झाला, आगीचा मोठा लोळ उसळला आणि अजित पवार यांच्यासह वैमानिक, सहवैमानिक, अंगरक्षक, अटेंडंट यांचाही मृत्यू झाला....

शरद पवारांना अंधारात ठेवून सुनेत्राताईंनी काय साधले?

अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर चौथ्या दिवशी मुंबईतील लोकभवनात त्यांच्या पत्नी सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजितदादांच्या मृत्यूनंतर सारा महाराष्ट्र हळहळला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेच नव्हे तर सर्वसामान्य जनतेलाही दु:ख अनावर झाले होते. बारामतीत झालेल्या अत्यंस्काराच्यावेळी परत या.....

एमआयएमने दिला काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच सपा-उबाठाला इशारा

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये एआयएमआयएम पक्षाचे १२६ नगरसेवक निवडून आल्याने सर्वच राजकीय पक्षांना धक्का बसला आहे. मुस्लिम व्होट बँकेच्या जोरावर या पक्षाने मिळालेल्या यशामुळे काँग्रेस, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षांना मुस्लिम मतदारांनी इशारा घंटा दिली आहे. धर्मनिरपेक्ष पक्ष असा बँड...
Skip to content