Homeपब्लिक फिगरउत्तर मुंबईतून महायुतीचे...

उत्तर मुंबईतून महायुतीचे ४० नगरसेवक महापालिकेवर!

आम्ही ‘उत्तर मुंबईला उत्तम मुंबई’ बनविण्याचा संकल्प हाती घेतला आहे. उत्तर मुंबईमध्ये आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, प्रदूषण, पायाभूत सुविधा इत्यादी समस्या कशा पद्धतीने सोडविल्या जातील यासंबंधी अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. आता महापालिकेच्या निवडणुका सुरू होतील. त्यावेळी महायुतीचे ४० नगरसेवक जिंकून येतील, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री तसेच उत्तर मुंबईतले भारतीय जनता पार्टीचे खासदार पियूष गोयल यांनी काल एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

‘उत्तर मुंबईला उत्तम मुंबई’ बनवण्यासाठी पियूष गोयल गेली सात महिने प्रयत्नशील आहेत. उत्तर मुंबईत विकासकामांचा झपाट्याने विस्तार होत असून अनेक नवीन योजना राबवल्या जात आहेत. लाखो नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. उत्तर मुंबईतील विकासात्मक प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री गोयल यांनी शनिवारी महापालिका, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए, क्रीडा अधिकारी आणि जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनासह विविध संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नागरी सेवासुविधाविषयी महापालिकेच्या मुख्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीत ६० हजार कोटी रुपयांहून अधिक प्रकल्पांची चर्चा झाली. सध्या प्रगतीपथावर असलेले प्रकल्प आणि नव्याने सुरू होणारे प्रकल्प तातडीने सुरू करावे, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

‘उत्तर मुंबईला उत्तम मुंबई’ बनविण्यासाठी कोस्टल रोड, लोखंडवाला डीपी रोड, मालाड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, डेव्हलपमेंट प्लेग्राऊंड, स्वच्छता मोहीम, पर्यटनस्थळांची ओळख आणि विकासासाठी नियोजन, १०० स्वयंसहायता गटांना प्रशिक्षण देण्यासाठी उपक्रम, कोळी समाजासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन, सांस्कृतिक केंद्र उभारणी, बोरीवली (पूर्व) येथे पार्किंग जागेची उपलब्धता निर्माण करणे, आरोग्यसेवा सुधारण्यासाठी उपाययोजना, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बुद्ध पुतळ्याबाबत अभ्यासिका योजना, पोईसर नदीचे रुंदीकरण, पुनर्वसन, इत्यादी विषयांवर यावेळी विस्तृत चर्चा करण्यात आल्याचे गोयल यांनी सांगितले.

उत्तर मुंबईतील विकासयोजनांमध्ये पुनर्विकास, पायाभूत सुविधांची वाढ, नागरी सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, सार्वजनिक सेवा, टोल प्लाझा, शहर सुशोभिकरण आणि प्रदूषण नियंत्रण यासह विविध समस्यांचा समावेश आहे. यासंबंधी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यात, मालाड बसस्थानक बांधणे, गोराई व चारकोप येथील पाण्याची समस्या, मालाड (पू) येथे इनडोअर स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, चारकोपमध्ये नाट्यगृह व समाजमंदिर उभारणे, मालवणी येथील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महाकाली रोड ते शहीद अब्दुल हमीद रोडचे काम, कांदिवली (प) येथील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन व परशुराम थीम पार्क इत्यादी विषयांवरही प्रकाश टाकण्यात आला. एसआरए प्रकल्पाअंतर्गत चारकोप व बोरीवली येथील पुनर्वसनाचा मुद्दा आणि कांदिवलीमध्ये १५ हजार रहिवाशांना सांडपाण्याचा प्रश्न याविषयी सकारात्मक चर्चा झाली. याप्रसंगी, आमदार अतुल भातखळकर, मनीषा चौधरी, नगरसेवक गणेश खणकर आदी लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.

भगवती रुग्णालय मे महिन्यात रुग्णांच्या सेवेत

भगवती, शताब्दी व सावित्रीबाई या रुग्णालयातील अपुरी साधनसामुग्री व मनुष्यबळ वाढविण्यावर भर दिला जात आहे. तसेच भगवती रुग्णालय मे महिन्यापर्यंत रुग्णांच्या सेवेत दाखल होईल. प्रत्येक रुग्णालयात आयुष्यमान योजनेतून रुग्णांना सेवा पुरवली जाईल, असेही केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी स्पष्ट केले.

या बैठकीची काही ठळक वैशिष्ट्यं-

60,000 कोटी रुपयांहून अधिक प्रकल्पांवर चर्चा.

पाच महिन्यांत ही तिसरी बैठक.

कोळी समुदायासाठी महत्त्वपूर्ण उपक्रमांचे नियोजन.

उत्तर मुंबईत 15 ऑगस्टपर्यंत एक आधुनिक, मल्टीस्पेशलिटी रुग्णालय.

भगवती आणि शताब्दी रुग्णालयांचा पुनर्विकास आणि 1,000 बेड्स असलेले सुपर स्पेशलिटी रुग्णालय.

वाहतूककोंडी, वर्सोवा ते भाईंदरपर्यंत कोस्टल रोड, मढ-वर्सोवा पूल बांधकाम, नवीन पाणी पाईपलाइन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणांवर लक्ष ठेवणे आणि ‘एक पेड माँ के नाम’ अभियान, लखपती दिदीमार्फत महिलांना लाभ, मच्छीमारांना मासेमारीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सोय आणि कार्यशाळेचे आयोजन इत्यादी.

Continue reading

जि.प. निवडणुकीत आंबेडकर, जानकरांपाठोपाठ शेंडगेही काँग्रेसबरोबर

महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी तसेच महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाबरोबर आघाडी करणाऱ्या काँग्रेसने आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्त्वाखालील ओबीसी बहुजन आघाडीलाही बरोबर घेतले आहे. ही...

भाजपात निष्ठावंतांकडून उचल खाण्यास सुरूवात!

गेल्या काही वर्षांपासून पक्षवाढीच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीत (भाजपा) विविध पक्षांमधून होणाऱ्या इनकमिंगमुळे मूळच्या भाजपा कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायाला आता वाचा फुटू लागली आहे. पक्षवाढ करताना वेगवेगळ्या पक्षांमधून कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेलेच पाहिजेत. पण त्यामुळे वर्षानुवर्षे संधीच्या आशेवर कार्यरत...

महाराष्ट्रात थंडीची लाट हळूहळू ओसरणार!

या हंगामात हवामानाचा लहरीपणा सुरूच असून देशभरासह राज्याच्या काही भागात आता नव्याने थंडीचे पुनरागमन होत आहे. राज्यात सध्या हवामानाचे संमिश्र स्वरूप अनुभवायला मिळत आहे. पहाटे आणि रात्री जाणवणारा गारवा आणि दिवसा सूर्यप्रकाशामुळे जाणवणारा उकाडा, अशा दुहेरी वातावरणाने नागरिक काहीसे...
Skip to content