Homeन्यूज अँड व्ह्यूजसरपंच हत्त्याप्रकरण होणार...

सरपंच हत्त्याप्रकरण होणार शांत? बंधूंना देणार सरपंचपद??

गेले सुमारे महिनाभर संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेले बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्त्या प्रकरण लवकरच संपुष्टात येईल असे दिसते. याप्रकरणी दिल्लीवरून पुढाकार घेण्यात आल्याने राज्यातील नेत्यांचा नाईलाज झाल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान देशमुख कुटुंबाने याप्रकरणी उच्च न्यायालयात अर्ज करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मागे घेतल्याचे जाहीर केल्यानंतर हालचालीना वेग आला असून भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनाही दररोजचे फटाके न फोडण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याचे खात्रीलायरीत्या समजते. तसेच बीड आणि परळी येथील सामाजिक व राजकीय वातावरण पुन्हा नीट करण्याच्या उद्देशाने हत्त्या झालेल्या देशमुखांच्या बंधूंना सरपंचपद बहाल करण्यावरही शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

या समझोत्याची प्रचिती आजपासूनच येण्यास सुरूवात झाली. संतोष देशमुख यांच्या हत्त्येबाबत न्याय मागण्यासाठी जालन्यात काढण्यात येणाऱ्या मोर्चाकडे आमदार धस यांनी पाठ फिरवली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील तसेच आमदार धस या मोर्चात सहभागी होणार होते. कालच धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना आपण राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलीच नसल्याचा दावा केला. दोन दिवसांपर्यंत या हत्त्याप्रकरणात पोलिसांना शरण गेलेला आरोपी वाल्मिक कराड याचा आका फासावर लटकला पाहिजे असे म्हणत धस मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर ठेवावे किंवा त्यांना बिनखात्याचे मंत्री ठेवावे तसेच त्यांच्याकडे बीडचे पालकमंत्रीपद दिले जाऊ नये, अशी मागणी धस करत होते.

सरपंच

गेल्या सुमारे महिनाभर चाललेल्या रोजच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुती सरकारची प्रतिमा मोठ्या प्रमाणात काळवंडळी असून येत्या महिन्यात होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो हे लक्षात आल्यावर भाजप श्रेष्ठीनी तातडीने पावले उचलत हे प्रकरण त्वरित शांत करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांना दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
राज्यात महायुतीचे सरकार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्ष प्रमुख साथीदार असल्याने पोलिसांच्या विशेष पथकाचा जो निर्णय होईल त्याप्रमाणे नक्कीच कारवाई केली जाईल असे आश्वासन सर्व संबंधितांना दिले गेल्याने व एक वगळता या प्रकरणातील सर्व आरोपींना पकडण्यात आल्याने जनआक्रोशही काहीसा कमी झाला आहे. त्यातच प्रमुख आरोपी वाल्मिक कराड शरण आल्यानंतर आरोपातील हवाच काढून टाकण्यात आल्याचे दिसत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, सरकार वा अजितदादांची राष्ट्रवादी देशमुख कुटुंबाची सर्व जबाबदारी घेतील. त्या कुटुंबाला लागेल तितके दिवस पोलीससंरक्षण दिले जाईल. देशमुख कुटुंबाला कोणीही वाऱ्यावर सोडणार नाही. कुटूंब चालवण्यासाठी सर्व प्रकारचे आर्थिक सहाय्य दिले जाईल, असेही कुटुंबाला आश्वस्त केले गेले आहे. इतकेच नव्हे तर देशमुख यांच्या कन्येला सरकारी वा बँकेत नोकरी देण्याचा शब्दही दिला गेल्याचे एका जबाबदार नेत्याने सांगितले. हा वाद ज्यावरून उद्भवला व हकनाक हत्त्या झाली त्या पवनचक्की व वीजप्रकल्पातून निघणाऱ्या कोळशाची वैध मार्गाने विल्हेवाट लावण्यासाठी कडक नियमावली करण्याचेही सरकारने ठरवले असल्याचे मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Continue reading

गावदेवी मार्केटची आग संशयाच्या भोवऱ्यात!

दोन दिवसांपूर्वीच आमचे वकीलमित्र गणेश सोवनी यांनी सव्वा सात वाजता पाठवलेला एक मेसेज पाहून मी हादरलोच! मेसेज छायाचित्रासह असल्याने त्याचे गांभीर्य लगेचच लक्षात आले व सकाळची सर्व कामे आटोपल्यावर ठाण्यातीलच गावदेवी मार्केट परिसरात जाण्याचे पक्के केले. वकीलसाहेबांनी पाठवलेल्या मेसेजमध्ये...

मालकांचा देव!

"मालकांचा देव। मालकांना पावे.. आम्ही फक्त व्हावे। अन्नभक्त.. पोटाच्या हातात। आत्म्याचा पतंग.. स्वप्नांचे हे रंग। शेपटाला.." या कविवर्य विंदा कारंदीकर यांच्या ५० वर्षापूर्वीच्या (कदाचित जास्तच) ओळी आठवायचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेले काटकसरीचे आवाहन! काटकसर करा आणि महागड्या वस्तूंचा मोह टाळा, या पंतप्रधानांच्या आवाहनाला...

येथे प्रत्येक छायाचित्र बोलते…

"For me the subject of the picture is always important than the picture" हा सुविचार दिवंगत छायाचित्रकार रजनीश काकडे यांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनात प्रकर्षाने जाणवत होता. रजनीशला आदरांजली वाहण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या...
Skip to content