Homeबॅक पेजजेव्हा फोटो जिवंत...

जेव्हा फोटो जिवंत करणाराच ‘फोटो’त जातो…

गेल्या आठवड्यात एक दुःखद बातमी सकाळी, सकाळीच आली.. रजनीश गेला. वय अवघे ५५ वर्षे. हे वय होत का जाण्याचं? नाही. पण नियतीला काय माहित की त्याच्या हातून अजून कुणाकुणाचे फोटो कुठल्या परिस्थितीत काढायचे ते! फोटोलाच गुंगारा देऊन (तसा तो सर्वांनाच गुंगारा देत मस्त फोटो शोधत असायचा नेहमीच!) तो दिवस सुरु व्हायच्या आधीच अंतर्धान पावला होता. रजनीश यकृताच्या विकाराने बेजार होता. रुग्णालयात दाखल केले होते. घरीच औषधे व उपचार करा, असे सांगून डिस्चार्ज मिळाला होता. तब्येत सुधारत होती. स्थिर होती. अचानक हार्टअटॅक आला आणि होत्याचे नव्हते झाले. धडपडीचा तसेच चपळाईचा क्षण थप्प झाला. आपला रजनीश कायमचा निघून गेला..

काकडे कुटुंबाशी संबंध

काकडे कुटुंबाशी गेल्या ५० वर्षांपासून माझे संबंध आहेत. रजनीशचे वडील मंदार काकडे (ते डॅडी काकडे या नावाने ओळखले जात) गेल्या जमान्यातील ख्यातनाम वृत्तपत्र छायाचित्रकार! छाया: मंदार काकडे या नावाने प्रसिद्ध होते. ते नुसतेच छायाचित्रकार नव्हते तर ते छायाचित्राबरोबर बातम्याही पुरवायचे! त्याही प्रसिद्धीपत्रकासह!! आजकाल एजन्सीजचे पेव फुटले आहे. शिवाय दरही आस्मान छू रहे है.. असे असतानाही बातमी आली नाही की ग्राहक विचारू शकत नाही की बातमी का आली नाही? विचारलेच तरी आम्ही आमचे बातमी देण्याचे काम केले होते, का आली नाही हे आम्हाला माहित नाही अशी उडवाउवीची उत्तरं मिळतात, असा सर्वत्र अनुभव आहे. पण त्याकाळात तसे कुणीही करत नसे. फोटोसह तयार बातमी कुणाला नकोय? म्हणून बहुतांशी वर्तमानपत्रे काकडे यांच्याकडून आलेली बातमी व फोटो घ्यायचेच व ती छापूनही यायची.

याच फोटोची ‘जीन’ काकडेच्या राजू व रजनीशमध्ये अवतरली तर ते अजिबात नवल नव्हते. राजू काकडे यांनीही आपल्या परीने लोकसत्ता गाजवले होते. ९३च्या मुंबई दंगलीतील राजूचे फोटो गाजले होतेच. राजकीय फोटोही गाजले होते. माजी मुख्यमंत्री एकटेच खुर्चीत बसलेले व बाजूच्या सर्व खुर्च्या रिकाम्या.. असा एक फोटो गाजला होता. काकडे कुटुंबाविषयी विस्ताराने इतक्यासाठीच सांगितले की, रजनीशची बॅकग्राऊंड आजच्या पिढीला नीट कळावी! तर वर्तमानपत्र वा वृत्त विभागाला कोणत्या प्रकारचा फोटो लागतो याची जाण रजनीशला उपजतच होती. या जाणीवेपोटीच तो जिवन्त फोटोसाठी काही तास बैठक मारून बसत वा उभा राहत असे. उभा राहिला तर सतत जागा बदलत असे. मानजोगा ‘अँगल’ मिळत नसे तोवर तो सैरभैर होत असे. २६/११ मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी त्याची नजर ताजमहाल हॉटेलवरून कित्येक तास खिळळी नव्हती हे त्याच्या यशस्वीतेचे गमक आहे. हे सर्व फोटो आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले होते हे सांगायला नकोच.

आजचा हा विषय नाही. पण वृत्तपत्रसृष्टीत छायाचित्राचे महत्त्व रघु राय या ज्येष्ठ छायाचित्रकाराने अधोरेखित केले, हे मान्य करायला हरकत नाही. त्यांची संडे या साप्ताहिकात आलेली छायाचित्रे गजलेली होती. इंडियन एक्स्प्रेसमध्ये सॅबी फर्नांडिस, वसंत प्रभू, मुकेश पारपियानी, राजू काकडे, दिलीप कागडा आदींनी पत्रकारितेच्या प्रवासात चांगलीच साथ दिली हे मान्यच करावे लागेल. यापैकी काहीजण अजूनही मदत करतच असतात. रजनीशचा आणि माझा तसा जास्त संबंध आला नाही. पण ज्या-ज्या वेळी तो समोर यायचा तेव्हा बाजूला घेऊन अत्यन्त आदराने विचारपूस जरुर करायचा. आता अशी विचारपूस करणारी माणसे हळूहळू पडद्याआड होत आहेत. “A photograph is usually looked at – seldom looked in to it” असे म्हणतात. यातील दुसरा भाग रजनीशच्या छायाचित्राला लागू होतो. पण काय करणार? आणखी आनंद देण्याआधीच तो निघून गेला.

एका वेगळ्या अर्थाने…

“रोज तारों को नु्माईश में खलल पडता है..
चांद पागल है अंधेरे में निकल पडता है” (राहत)

छायाचित्रेः काकडे कुटुंबीय आणि वसंत प्रभू

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

मालकांचा देव!

"मालकांचा देव। मालकांना पावे.. आम्ही फक्त व्हावे। अन्नभक्त.. पोटाच्या हातात। आत्म्याचा पतंग.. स्वप्नांचे हे रंग। शेपटाला.." या कविवर्य विंदा कारंदीकर यांच्या ५० वर्षापूर्वीच्या (कदाचित जास्तच) ओळी आठवायचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेले काटकसरीचे आवाहन! काटकसर करा आणि महागड्या वस्तूंचा मोह टाळा, या पंतप्रधानांच्या आवाहनाला...

येथे प्रत्येक छायाचित्र बोलते…

"For me the subject of the picture is always important than the picture" हा सुविचार दिवंगत छायाचित्रकार रजनीश काकडे यांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनात प्रकर्षाने जाणवत होता. रजनीशला आदरांजली वाहण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या...

‘एशियाटीक’ची निवडणूक जूनमध्ये तरी होणार? दोन्ही बाजूंच्या सदस्यांत घुसखोर!

मुंबईतल्या एशियाटीक लायब्ररी, या प्रतिष्ठित संस्थेची निवडणूक 'घुसखोर' सदस्यांशिवाय जून महिन्यात घेण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला असला तरी ती जूनमध्येच होईल की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. कारण नव्याने निवडल्या जाणाऱ्या कार्यकारिणीची मुदत केवळ सप्टेंबर...
Skip to content