संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीतनाट्य महोत्सव मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच साजरा झाला. रसिकांच्या गर्दीने हा संगीतनाट्य महोत्सव विशेष रंगत गेला. ही संस्था गेली अनेक वर्षे संगीतनाटकांना पुनश्च वैभव प्राप्त करून देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करत असते. ‘संगीत शांतीब्रह्म’ हे नव्याने लिहिलेले संगीत नाटक. संपूर्ण संहिता नवी कोरी. त्यातली गाणीही अपरिचित. पण मनाचा वेध घेणाऱ्या या नाटकातल्या गाण्यांनीही रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. साध्या, सोप्या चालीत बांधलेली नाट्यगीते कलाकारांनी उत्तमप्रकारे सादर केली. खल्वायन, या रत्नागिरी येथील संस्थेने त्याची निर्मिती केली आहे.

विद्याधर गोखले यांच्या लेखणीने शब्दबद्ध केलेले व्यावसायिक रंगभूमीवर गाजलेले नाटक `संगीत स्वरसम्राज्ञी’. संहिता, गीते प्रेक्षकांच्या परिचयाची. तरीही व्यावसायिक प्रयोगांशी तोडीस तोड असा हा नाट्यप्रयोग झाला. दर्जेदार अभिनय आणि स्वर-लयीचा तोल साधत सादर केलेली नाट्यगीते, त्यामुळे प्रयोग अधिकच खुलला. अर्थातच प्रेक्षकांच्या पसंतीची मोहोर यावर ठसली, यात शंकाच नाही. स्वरसम्राज्ञी, सादर करणाऱ्या संस्थेचे नाव परस्पर सहाय्यक मंडळ (वाघांबे). गुहागर तालुक्यातील ही संस्था असली तरी यातले कलाकार त्रिस्थळी विखुरले असून दूर अंतरावरून प्रवास करत त्यांनी तालमी केल्या आणि नजरकैद करणारा उत्तम प्रयोग सादर केला.

श्री विजयदुर्गा सांस्किक मंडळ, केरी, फोंडा या संस्थेने सादर केलेले नाटक `संगीत कट्यार काळजात घुसली’, हे रसिकांनी अनेकदा रंगभूमीवर पाहिलेले. तरीही पुन्हा त्याचा आनंद घेण्यासाठी ते उत्सुक दिसले. या नाटकात सर्व महिला कलाकार होत्या, हे त्याचे वेगळेपण. शास्त्रीय संगीताची भक्कम बैठक असलेल्या कलाकारांनी नाटकाचा हा प्रयोग सर्वोच्च पातळीवर नेला.

हे प्रयोग नेटाने पार पडावेत, यासाठी विलास कात्रे, दिलीप काटदरे, नीता आंबेकर, अंजली बक्षी, रविंद्र आवटी, सावंत यांनी निधी उपलब्ध केला तर विकाल कात्रे आणि राजीव श्रीखंडे यांनीही अखेरच्या दिवशी आर्थिक सहाय्य केल्याची घोषणा केली. शिबानी जोशी यांचे उत्तम निवेदन तिन्ही दिवस होते.

