Homeहेल्थ इज वेल्थमानसोपचार यंत्रणेच्या उभारणीसाठी...

मानसोपचार यंत्रणेच्या उभारणीसाठी मुंबईत सर्वेक्षण सुरू

केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयातर्फे देशातील विविध महानगरांमध्ये मानसिक आरोग्य सर्वेक्षण प्रातिनिधिक स्वरुपात हाती घेण्यात आले आहे. मुंबई महानगरातील या सर्वेक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. या सर्वेक्षणामध्ये विशेष सॉफ्टवेअरने आपोआप निवडलेल्या ३ हजार ६०० व्यक्तिंची सुमारे ३० ते ४० मिनिटे मुलाखत घेण्यात येईल.

त्यादृष्टीने मुंबईत वस्ती पातळीवर पोहोचून सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मानसिक आजारांचे प्रमाण ठरवून त्याआधारे मानसोपचार यंत्रणा उभारणी व तिचे बळकटीकरण करण्याची गरज निश्चित करणे, यासाठी हे सर्वेक्षण अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देशातील पहिले राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण सन २०१५-१६ मध्ये करण्यात आले. यासाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मज्जासंस्था विज्ञान (NIMHANS – National Institute of Mental Health & Neurosciences) या संस्थेची मध्यवर्ती समन्वय केंद्र म्हणून निवड करण्यात आली होती. या सर्वेक्षणात देशातील १२ राज्यांचा समावेश होता. या सर्वेक्षणानुसार, मनोविकारांचे आजीवन प्रमाण हे शहरी भागात १४ टक्के तर ग्रामीण भागात १० टक्के इतके आढळले. ज्यात चिंता (नर्व्हस), नैराश्य (मूड डिसऑर्डर), अति मद्यसेवन यांचा समावेश होता. यातील बहुतेक आजारांसाठी उपचारांची गरज व प्रत्यक्ष उपलब्धता यातील तफावत ६० टक्क्यांहून अधिक आढळली होती. औषधे, मानसोपचारतज्ञ, मानसशात्रज्ञ व मानसोपचार परिचारिका यांची मोठी कमतरता सर्वच राज्यांमध्ये आढळून आली.

पहिल्या सर्वेक्षणामध्ये आढळलेली ही निरीक्षणे लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने देशातील महानगरांमधील परिस्थिती जाणून घेण्याचा उद्देशाने दुसरे सर्वेक्षण हाती घेतले आहे. यामध्ये मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, बेंगळुरु, चेन्नई व कोलकाता या महानगरांमध्ये हे सर्वेक्षण राबवण्याचे निश्चित केले आहे. मुंबई महानगरातील सर्वेक्षणासाठी महापालिकेच्या टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. नायर रुग्णालयाचा मनोविकृतीशास्त्र विभाग व जनऔषध वैद्यकशास्त्र विभाग यांनी संयुक्तपणे हे सर्वेक्षण नुकतेच सुरू केले आहे.

यामध्ये वस्ती पातळीवर सर्वेक्षण करण्यासाठी १ मुख्य समन्वयक आणि ७ क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे कर्मचारी घरोघरी जाऊन विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने निवडलेल्या निवडक कुटुंबातील व्यक्तींच्या मुलाखती घेतील. मुलाखतीसाठी संमती दिल्यानंतर त्या व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात येतील. सर्वेक्षणासाठी मंत्रालयाने ठरवून दिल्यानुसार सुमारे ३ हजार ६०० व्यक्तिंची मुलाखत यामध्ये घेतली जाईल. एका व्यक्तीच्या मुलाखतीस सुमारे ३० ते ४० मिनिटांचा अवधी लागेल. समाजातील सर्व स्तरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात येणार असून कोविडमुळे झालेल्या मानसिक परिणामांसंबंधी प्रश्नही यात समाविष्ट केले आहेत. ऑगस्ट/सप्टेंबर २०२३पर्यंत म्हणजे येत्या ८ ते ९ महिन्यांच्या कालावधीत हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येईल.

नायर रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ, रोगप्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यकशास्त्र तज्ज्ञ व महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग एकत्रितरित्या महाराष्ट्र व मुंबईतील मानसिक आरोग्यसेवेच्या स्थितीचा आढावा घेतील व आरोग्यसेवेतील त्रुटींचे प्रमाण निश्चित करतील. या सर्वेक्षणामुळे महानगरांतील मानसिक आजारांचे प्रमाण ठरवून मानसोपचार यंत्रणा उभारणी व तिचे बळकटीकरण करण्याची गरज निश्चित करता येणार आहे. हे सर्वेक्षण करण्याच्या दृष्टीने मुलाखतीसाठी आपल्या घरी कर्मचारी आल्यास त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content