अलीकडे आपल्या सार्वजनिक व खासगी बँकामधील गैरप्रकारांची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. भविष्यात आणखीही येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अशा सर्व प्रकरणाची एक खासियत आहे की, बँकेचे संबंधित अधिकारी वा संबंधित व्यवसायिक एकदा का न्यायालयात गेले की न्यायांचे ‘दळण’ सुरु होते व त्यात अनेक वर्षे वाया जातात. विजय मल्ल्या यांच्या प्रकरणावरून तर हे सिद्धच झालेले आहे. अशात आपल्याकडील कुठला अधिकारी मी माझ्या कारकिर्दीत चुका केल्या असे सांगेल! खरंतर संबंधित व्यक्तीचा प्रस्ताव समंत करण्याच्या लायकीचाच नव्हता, पण काय करणार फलाण्या मंत्र्याचा वा सनदी अधिकाऱ्याचा फोन आल्याने असे करावे लागले असेही कुणी सांगणार नाही, याची खात्री आहे. म्हणूनच हल्ली चौकशीचे चौऱ्याऐंशी हजार फेऱ्या झाल्यानंतर काही प्रकरणात सरकारच ‘क्लीन’ चिट देत असते. सत्यमेव जयते!
आमच्याकडील किती बँकांचे संचालक व बँकांचे महाव्यवस्थापक कबूल करतील की ‘होय आम्ही आमच्या कारकिर्दीत खूप खोटे बोललो आहे.’ अर्थात हे विधान बँकेच्या कामासंबंधात आहे हे ओघाने आलेच. मलेशियातील एका अब्जावधी डॉलर्सचा भ्रष्टचार करणारी गोल्डमन सच्स या बँकेचे हे प्रकरण अमेरिकेत गाजत आहे. रॉजर नेगने हा करोडोंचा गैरप्रकार केला आहे. त्याला साथ तेथील वरिष्ठ व्यवस्थापक वा गैरव्यवहारातील उजवा हात समजला जाणारा टीम लेन्सर हा आता माफीचा साक्षीदार झाल्याने भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार बाहेर आले आहेत.

न्यायालयात त्यानेच सांगितले की, होय मी अनेकदा खोटे बोललो आहे व मोठ्या ग्राहकांना खोटी आमिषे दाखवून चुना लावला आहे! आपल्याकडील अधिकारी आम्ही खोटे बोललोच नाही, आम्ही वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले असे निर्लज्जपणे सांगतील. त्यांचे वरिष्ठ सांगतील की, नेत्यांची तशी पत्रे होती म्हणून आम्ही तसे वागलो, काही शहाणे सांगतील की रिस्क घेतल्याशिवाय टार्गेट पूर्ण कसे होईल? म्हणून आम्ही हे केले.
आपल्याकडील राजकीय नेते म्हणजे दहा हुशार माणसांचा ‘अर्क’ असतो. हा नेता अमुक एक काम करा, असे थेट केव्हाच सांगत नाही. ‘नियमात बसत असेल तर काम करा ‘, ‘भरतीत बसवता येते की नाही ते पाहावे’, ‘कर्जासाठी अर्ज केलेला आहे सर्व बाबी तपासून कर्ज मंजूर करण्याबाबत विचार करावा’ आदी मोघम पत्रे पाठवतात. ही विनंतीपत्रे मोघम स्वरूपाची असली तरी नंतर स्वीय सहाय्यकांचा फोन मारा सुरू होतो हे सांगायला नकोच. सध्या आपल्याकडे कुठल्याही मोठ्या बँकेचे नाव घ्या, घोटाळा लगेच डोळ्यासमोर हजर राहतो. घोटाळे सिद्ध होण्याचे आपल्याकडील प्रमाण न्यायव्यवस्थेमुळे अत्यन्त नगण्य आहे. तरीही एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने मी खोटे बोललो, हे शपथेवर सांगितलेले नाही. आपल्याकडील आमिषेही ठरलेली. आलिशान रिसॉर्टमधील दारूची पार्टी, नंतर सुंदर रमा, कर्जाची रक्कम जसजशी वाढत जाईल तसे वेल फर्निश्ड मोठा ब्लॉक, थंड हवेच्या ठिकाणी चौसपी बंगला. अगदीच राहवले नाहीतर तुमच्या धंद्यात 20 टक्के भागीदार आदी.. याला आकाश ठेंगणेच. मुंबई उच्च न्यायालयातील एका माजी न्यायमूर्तीने कार्यकक्षा नसतानाही एक जामीन मंजूर केला होता. त्याला सेवानिवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी घरपोच मर्सिडीज’ मिळाली होती. तरीही आपले न्यायमूर्तीही कधीच सांगणार नाहीत की ‘मी कधीच खोटे केलेले नाही’… जय सत्यमेव जयते!
(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

