Homeमाय व्हॉईसपंतप्रधान महोदय, माफ...

पंतप्रधान महोदय, माफ करा!

अत्यंत व्यथित मनाने मी हे लिहीत आहे. आजचा विषय राजकारण, अर्थकारण वा समाजकारण असा कोठलाही नसून फक्त ‘आंदोलनजीवी’ इतकाच मर्यादित आहे. राजकारणाची चर्चा तर नेहमीच होते व होत राहील. यात दोन्ही बाजूंचे पहेलवान आपापली बाजू मांडण्याची शिकस्त करत असतात. परंतु असे करताना मूळ मुद्दा मात्र घरंगळत जातो व त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. दिल्ली येथे गेल्या अनेक दिवसांपासून ठिय्या देऊन बसलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात पंतप्रधानांनी ‘आंदोलनजीवी’ हा शब्द वापरला आहे. उठसुठ आंदोलन करणारे असे म्हणायचे असावे. कसेही असो, या शब्दाने आंदोलनकर्ते शेतकरी काहीसे दुखावले आहेत. यात आश्चर्य वाटायला नको. महात्मा गांधी यांनी एकेठिकाणी म्हटले आहे की, “the purpose of satyagrah is not to save our face but to instil courage in to the people and make the mind dependent in spirit.. Repression answers only so long you can overawe people but even cowards have been known to exhibit extraordinarily courage under equally extraordinarily stress”. आमच्या महाराष्ट्रात तर आंदोलनाची तेजस्वी परंपरा आहे. आमच्या महाराष्ट्राचा जन्मच मुळी आंदोलनातूनच झालेला आहे. आंदोलनाची ही परंपरा शिवप्रभूंनी सुरू केली आणि परंपरेचा अग्नी नेहमीच धगधगलेला राहावा म्हणून अनेकांनी आपल्या देहाच्या आहुती अर्पण केलेल्या आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या जन्मापासून व त्याआधीही जनसंघाने देशात तसेच महाराष्ट्रात अनेक आंदोलने केलेली आहेत. आपल्या पक्षातील अनेक धुरीणांनी त्यात भाग घेतला आहे. काही आंदोलने यशस्वी झाली आहेत तर अनेक आंदोलनामध्ये यशस्वी ताडजोडही झालेली इतिहास सांगतो. आपल्यासारख्या सुजाण पंतप्रधानांना हे माहीत नसेल असे वाटत नाही. आंदोलन पुकारल्यानंतर काही दिवसांतच मागण्या मान्य होतात असे नाही. देशाचे स्वातंत्र्य आंदोलन प्रदीर्घकाल चालले हे आपल्याला माहीत असेलच. माझ्यासारख्या छोट्या माणसाने याची आठवण करून देणे खरोखरच उचित नाही. इतकेच नव्हे तर काश्मीर आंदोलन तसेच आणीबाणीविरुद्धचा लढा दीर्घकाळ लढला गेला. ही तर आपल्या पक्षाने वा पूर्वपक्षाने केलेली आंदोलने होती. आपण पंतप्रधान होण्याआधी इंदिरा काँग्रेसच्या आघाडी सरकारविरुद्ध तर भाजपने अक्षरशः एका महिन्यात 20/20 वेळा आंदोलनाची धार पाजळली आहे. रविशंकर प्रसाद, नितीन गडकरी, मुरली मनोहर जोशी, रवीप्रसाद रुडी फार काय, आमचे रामभाऊ नाईक, दिवंगत रामभाऊ कापसे, गोपीनाथ मुंडे, शेकडो नावे सांगता येतील.

या सर्वांनी आंदोलन या शब्दास एक नवीनच आयाम दिला. इतके असूनही त्यावेळच्या सत्ताधारी काँग्रेसने त्यांना आंदोलनजीवी असे कधीच संबोधले नाही. पंतप्रधान महोदय, आपण पट्टीचे वक्ते आहात. अचूक शब्दांचे जाणकार आहात. तरी यावेळी ‘डुलकी’ घेतलीत असे वाटते. एक चूक माफही करता येते. पण मी पडलो पामर! मी कोण माफ करणार? माफ करणारा तो ‘आंदोलक’!

“माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी

माझियासाठी न माझ्या पेटण्याचा सोहळा”

अशा काहीशा वृत्तीचे तुम्ही-आम्ही. आपणास काय सांगावे?

पण आम्ही पडलो..

“कैक शाहिदांची कर्मभू लालबाग

सदैव सज्ज बॅरिकेड लालबाग

यंत्राशी जोडलेला असे जरी हात

दर्द घेऊन झुंजणारा लालबाग”

मला गप्प बसू देत नव्हता. आंदोलनाचे अनव्यार्थ बदलले असतीलही. परंतु आंदोलनजीवी हे चुकीचेच वाटते.

“agitate agitate ought to be motto of every reformer; agitation is the opposite of stagnation – one is life, other is death” असे जाणकार म्हणत आलेले आहेत. जाता जाता एक.. आठवले. महोदय, तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आपण जन्मला नसालही. पण, नेतेपद मात्र आपल्याला सोन्याच्या चमच्यातूनच मिळाले आहे यावर आमचा ठाम विश्वास आहे. केशुभाई यांच्या विरोधात गुजरातमध्ये असंतोष खदखदत होता. तत्कालीन एकही आमदार भाजप श्रेष्ठींच्या विश्वासास पात्र नव्हता. अचानक नरेंद्र दामोदरदास मोदी यांचे नाव सर्वानुमते मान्य झाले. मग दहा वर्षं आपण मागे पाहिलेच नाही. अगदी तसेच पंतप्रधानपदाच्या शर्यतीत लालजींचे नाव मागे पडून नरेंद्र दामोदरदास पुढे कधी गेले हे अडवाणी यांनी कळलेच नाही. म्हणूनच मुख्यमंत्री होण्याआधी व नंतरही.. आजतागायत भाजपच्या एकाही आंदोलनात आपण दिसत नव्हता.

गुजरातमधील ज्येष्ठ पत्रकारांनीही मला सांगितले की, गुजरातमधील भाजपच्या एकाही निदर्शनात मोदी साहेब दिसले नाहीत. गुजरातमध्ये झालेल्या नवनिर्माण आंदोलनात काही काळ आपण होतात, असे सांगितले. असो..

“जे न जन्मले वा मेले| त्यांसी म्हणे जो आपुले,

तोचि मुत्सद्दी जाणावा| देव तेथेच ओळखावा”

असंच बरचंस समाजमन झालेले असताना मी अधिक काय लिहू? या शेतकरी आंदोलनातून काहीतरी चांगले हाती लागो!

Continue reading

मालकांचा देव!

"मालकांचा देव। मालकांना पावे.. आम्ही फक्त व्हावे। अन्नभक्त.. पोटाच्या हातात। आत्म्याचा पतंग.. स्वप्नांचे हे रंग। शेपटाला.." या कविवर्य विंदा कारंदीकर यांच्या ५० वर्षापूर्वीच्या (कदाचित जास्तच) ओळी आठवायचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेले काटकसरीचे आवाहन! काटकसर करा आणि महागड्या वस्तूंचा मोह टाळा, या पंतप्रधानांच्या आवाहनाला...

येथे प्रत्येक छायाचित्र बोलते…

"For me the subject of the picture is always important than the picture" हा सुविचार दिवंगत छायाचित्रकार रजनीश काकडे यांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनात प्रकर्षाने जाणवत होता. रजनीशला आदरांजली वाहण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या...

‘एशियाटीक’ची निवडणूक जूनमध्ये तरी होणार? दोन्ही बाजूंच्या सदस्यांत घुसखोर!

मुंबईतल्या एशियाटीक लायब्ररी, या प्रतिष्ठित संस्थेची निवडणूक 'घुसखोर' सदस्यांशिवाय जून महिन्यात घेण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला असला तरी ती जूनमध्येच होईल की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. कारण नव्याने निवडल्या जाणाऱ्या कार्यकारिणीची मुदत केवळ सप्टेंबर...
Skip to content