Homeन्यूज अँड व्ह्यूजएकनाथरावांचा ठाण्यातला मुक्काम...

एकनाथरावांचा ठाण्यातला मुक्काम वाढला! जाणवले प्रदूषण!!

डिसेंबर २४पासून मुंबई आणि ठाणे शहराच्या प्रदूषणात वाढ होत असून या महिन्यात प्रदूषणाची पातळी अधिकच वाढल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथराव शिंदे यांनी पालिका प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. यासंबंधात उपमुख्यमंत्री येत्या दोनचार दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याप्रकरणी कठोर पावले उचलण्याची मागणी करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी या प्रतिनिधीला सांगितले. उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचा अधिक काळ ठाणे शहर व आसपासच्या भागातच जात असल्याने त्यांना प्रदूषणाची जाणीव अधिक गांभीर्याने झाली असल्याचेही सांगण्यात आले. पूर्वी मुख्यमंत्री असताना त्यांचा ठाणे शहराशी सतत संपर्क होताच पण आता वास्तव्यही अधिक काळ येथेच असल्याने उपमुख्यमंत्र्यांना प्रदूषण व वाहतूककोंडीचा त्रास अधिक जवळून पाहायला मिळत असल्यानेच आठ-दहा दिवसांपूर्वी त्यांनी महापालिका, प्रदूषण मंडळ आणि वाहतूक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून खास करून प्रदूषण प्रतिबंधक कारवाई होतच नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

‘स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे व हरित ठाणे’, या महापालिकेच्या घोषणेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे ठाणेकरांचे म्हणणे आहे.जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या व्याख्येनुसार वातावरणातील नैसर्गिक हवेत जेव्हा कोणतेही रासायनिक, जैविक किंवा भौतिक रेणूंचा समावेश होतो आणि त्यामुळे वावरणातील हवेत बदल होतात तेव्हा त्याला प्रदूषण असे संबोधले जाते. हे इतक्यासाठीच विस्ताराने सांगितले की, आपल्या हल्लीच्या ठाणे, मुंबईच्या हवेत काय काय असते याची सामान्यांना कल्पना यावी. वाहनांची वाढती संख्या, वाहतूककोंडी व प्रत्येक ५०/६० पावलांवर होत आसलेली इमारतींची बांधकामे ही यामागची प्रमुख कारणे आहेत. हे कमी म्हणूनच की काय मेट्रो व इतर विकासकामांमुळे हवेची गुणवत्ता घसरली आहे हे उघड सत्य आहे. हवेतील गारवा, आद्रता आणि मध्येच जाणवणारी उष्णता आणि धुळीच्या कणांमुळे संसर्गजन्य आजरांचे प्रमाण वाढले असल्याचे मत नामवंत पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रमोद साळसकर यांनी माझ्याशी बोलताना व्यक्त केले.

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊननंतर हवेची गुणवत्ता सुधारल्याचे दिसून आले होते. स्वच्छ आकाश, गोंगाट नाहीच, पक्षांचा चिवचिवाट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हलकी हवा हे सर्व प्रदूषण कमी झाल्याचीच लक्षणे होती. परंतु नंतर परिस्थिती पालटली व हवेची गुणवत्ता घसरण्यास सुरुवात झाली. २०२३मध्ये हवेची गुणवत्ता सरासरी १७२ इतकी झाली होती. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अहवालानुसार शहरातील हवेची गुणवत्ता डिसेंबर महिन्यापासून खाली घसरण्यास सुरुवात झाली. हिवाळ्यात तर हवेची गुणवत्ता सतत घसरतच होती. डिसेंबर महिन्याच्या शेवटी हवा गुणवत्ता निर्देशांक १८३ इतका नोंदवण्यात आला होता. सध्याच्या पाहणीनुसार पी एम १० कणाचं प्रमाण १६० प्रति क्यूबिक घनमीटर तर पी एम २.५चं प्रमाण ६५ प्रति क्यूबिक घनमीटर इतकं आहे. ठाणे शहरातील पी एमचं प्रमाण हवेच्या गुणवत्तेनुसार १५६ इतकं आहे. विशेष म्हणजे घोडबंदर भागातील हवा सर्वात जास्त प्रदूषित असल्याचं आकडेवाडीतून समोर आले आहे. घोडबंदर येथील हवेची गुणवत्ता १९० इतकी नोंदवण्यात आली आहे. याचाच अर्थ महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कार्यक्रमाचा पुरता बोजवारा उडाल्याचेच दिसून येत आहे.

माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिवसाआड संपूर्ण ठाणे शहरातील रस्त्यांवर पाणी शिंपडावे वा रस्ते पाण्याने धुवावे असे फर्मान काढलेले होते. त्या फर्मानाची अंमलबजावणी जेमतेम आठवडाभर झाली व नंतर सर्व सामसूम झाले. नव्या राजवटीत तर एकही दिवस रस्ते धुतले गेलेले नाहीत. खरंतर पाणी मारण्याचे काम बिल्डर लॉबीला देण्याची गरज आहे. कारण बिल्डर आणि विकास प्राधिकरणाचीच कामे सर्व ठिकाणी सुरु आहेत. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे बिल्डर लॉबीशी चांगले संबंध आहेत. म्हणूनच प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांनाही कामाला लावण्याची गरज आहे. “Pollution is nothing but resources not harvesting. We allow them to disperse because we have been ignorant of their values” हेही प्रदूषण वाढीचं प्रमुख कारण आहे. हवेची गुणवत्ता दर्जेदार राहवी याची जबाबदारी केवळ महापालिका वा सरकारी यंत्रणावर टाकणे अन्याय करण्यासारखे आहे. नागरिकांनीही आपल्या कर्तव्याचे पालन करायला हवे. वाहनांची नियमित पीयूसी करणे, सिग्नलवर वाहनांचे इंजिन बंद ठेवणे तसेच अवजड वाहनांनी भेसळयुक्त इंधन वापरू नये आदी गोष्टींचे पालन करायला हवे. प्रदूषण मोजलं जाते ते पीएम कणांमुळे. पीएम म्हणजे पार्टीकल्स इन मायक्रोग्राम पर क्यूबिक मीटर. हे पीएम कण म्हणजे फक्त धुळीचे कण नसतात. तर त्यात सल्फेट, नायत्रेट अशी घातक रसायनेही असतात. हे सर्व शरीरात गेल्याने श्वसनाला त्रास होतो तर कार्बन मोनोक्साईड रक्तात मिसळतो. हे सर्व घटक घातक असतात. त्यामुळेच प्रदूषणाबाबत सर्वांनीच काळजी घेतलेली बरी!

Continue reading

मालकांचा देव!

"मालकांचा देव। मालकांना पावे.. आम्ही फक्त व्हावे। अन्नभक्त.. पोटाच्या हातात। आत्म्याचा पतंग.. स्वप्नांचे हे रंग। शेपटाला.." या कविवर्य विंदा कारंदीकर यांच्या ५० वर्षापूर्वीच्या (कदाचित जास्तच) ओळी आठवायचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेले काटकसरीचे आवाहन! काटकसर करा आणि महागड्या वस्तूंचा मोह टाळा, या पंतप्रधानांच्या आवाहनाला...

येथे प्रत्येक छायाचित्र बोलते…

"For me the subject of the picture is always important than the picture" हा सुविचार दिवंगत छायाचित्रकार रजनीश काकडे यांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनात प्रकर्षाने जाणवत होता. रजनीशला आदरांजली वाहण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या...

‘एशियाटीक’ची निवडणूक जूनमध्ये तरी होणार? दोन्ही बाजूंच्या सदस्यांत घुसखोर!

मुंबईतल्या एशियाटीक लायब्ररी, या प्रतिष्ठित संस्थेची निवडणूक 'घुसखोर' सदस्यांशिवाय जून महिन्यात घेण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला असला तरी ती जूनमध्येच होईल की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. कारण नव्याने निवडल्या जाणाऱ्या कार्यकारिणीची मुदत केवळ सप्टेंबर...
Skip to content