ऊन नका देऊ नेत्याला!

ऊन नका देऊ, नेत्याला.. ऊन नका देऊ.. तसं पाहिलं तर दिवाळीचे दिवस होते. त्यातच उमेदवारीअर्ज भरण्याचीही राजकीय पक्षांची घाई होती. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत ठाण्याच्या कोर्ट नाका परिसराची भेटच झालेली नव्हती. आज सकाळी दररोजसारखी वाहतूककोंडीही दिसत नव्हती म्हणून म्हटले, आज आपली आवडती कोर्ट परिसर भेट ठेवूचया! काय नशीब होते बघा. बसस्टॉपवर आलो तोच चक्क वाटानुकूलित बस सेवेशी हजर! तिकीट काढले व जरा विसावलो. सेंट्रल मैदान स्टॉप गेला आणि उभा राहिलो.. बस कोर्ट नाक्याकडे वळली आणि आश्चर्याचा झटकाच बसला. जिल्हाधिकारी कार्यालयाला बाहेरूनच पांढऱ्या रंगाचे पडदे चकाचक स्वरूपात लावले होते. जणू काही जिल्हाधिकारी कार्यालय पडदानशीन झाल्यासारखे दिसत होते. कार्यालयाच्या मुख्य दरवाजातून आत जाताच निवडणुकीची लगबग जाणवली. कधी नव्हे तो सुरक्षा अधिकारी गाडयांना आत घेण्यास नकार देत होते. दुसरे आश्चर्य म्हणजे नकार ऐकताच मागच्या गाडीतून लगबगीने पीए किंवा बाह्या सरकवत कार्यकर्तेही बाहेर आलेले दिसले नाहीत. मग लक्षात आले की अरे ही तर निवडणुकीची झलक आहे. निवडणूक या पाच अक्षरांनी सर्वांना सुतासारखे सरळ केलेले दिसले. मनातून सुखवलो. पण आत जाताच गाड्यांचा प्रचंड ताफा पाहून काहीसा हिरमूसलोही!

नेत्यांना ऊन लागू नये म्हणून..

जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो तर जवळजवळ सर्व कार्यालयाला टॉवेल गुंडाळतात तसे पडद्यात गुंडाळलेले दिसले. आजूबाजूला चौकशी केल्याशिवाय राहवले नाही. यह सफेद कपडा किसलीये भाई? त्यावर त्याने चक्क मराठीत सांगितले की, अर्ज भरायला येणाऱ्या राजकीय नेत्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हूणन? मनात आले की आपले राजकीय नेते गेल्या २० वर्षांपासून उन्हात फिरलेले कुणी पाहिले आहेत काय? जवळजवळ सर्वांकडे चांगल्या गाड्या आहेत. थोडे मोठे आहेत त्यांच्याकडे एसयुव्ही आहेत आणि त्यापेक्षाही मोठे आहेत त्यांच्याकडे परदेशी बनावटीच्या आलिशान गाड्या आहेत. सांगायचे विसरलो. या सर्व प्रकारच्या गाड्या बेफाट कूल असतात. आपल्या नेत्यांना उन्हाचा कधी त्रासच होत नसतो. कारण ‘गरमी’वर त्यांच्याकडे जालीम उपाय असतो. आता इतक्या गारेगार वातावरणातून जनतेला ‘गार’ करण्यासाठी निघालेल्या नेत्यांना पाच मिनिटे सूर्यदेवाची गरम किरणे लागली तर काय पाप लागणार आहे? पण आमचे जिल्हाधिकारी कोमल हृदयाचे असल्याने ही सर्व पडद्यांची व्यवस्था केलेली असावी.

पांढरा रंग किरणे परावर्तीत करतो असे आठवी-नववीत शिकलेले आठवले आणि मेंदूत लख्ख प्रकाश पडला. प्रकाशाबरोबर एक जुने गाणे आठवले. मालती पांडे ते गाणं म्हणत असत. “कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू..” तान्हया बाळाची झोपमोड होऊ नये म्हणून एक माय सर्वांना विनवीत आहे. अरे सर्वांनो पाय न वाजवता (न आपटता) आत या .आताच बाळाचा डोळा लागला आहे, त्याची झोपमोड व्हायला नको. मायच ती, सर्वांना सांगते, चिमणीला सांगते, गायीलापण सांगते. तू हळूच हंबर! आता कोर्टनाका परिसर म्हटला की हॉर्नचे आवाज येणारच. ते कोण थांबवणार! तसेच नेत्यांच्या तसेच निवडणूक कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गाडयांनाही किरणांचा तडका बसू नये म्हणून नवीन छप्परही उभारण्यात आलेले आहे. बिसलेरीच्या थंडगार बाटल्या तसेच साध्या बाटल्यांचे तर अनेक खोके (पुन्हा खोके) दिसत होते.

नियोजन भवनात उभारलेल्या निवडणूक कक्षात सर्वांचीच लगबग होती. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून घेण्यात येणाऱ्या या निवडणुकीनंतर तरी सुखाचे दिवस येतील का, हा आम जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे. हे सुख जर मिळणार असेल तर जनताही एक सुरात म्हणेल.. “ऊन नका देऊ नेत्याला, ऊन नका देऊ..!”

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

Continue reading

१८व्या ‘जिम्नॅस्टिक्स टॅलेन्ट डिस्प्ले’ मिनी स्टेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट जिम्नॅस्टिक्स असोसिएशन आयोजित व मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, वडाळा प्रायोजित १८व्या "जिम्नॅस्टिक्स टॅलेन्ट डिस्प्ले" मिनी स्टेट स्पर्धा मोठ्या उत्साहात भारतीय क्रीडा मंदीर, वडाळा, मुंबई येथे नुकत्याच संपन्न झाल्या. ८, १०, १२, १४ व १६ वर्षांखालील वयोगटात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीतल्या घवघवीत यशानंतर विविध महापालिकेत महापौराच्या निवडीकडे लक्ष देण्याचे सोडून, मित्र पक्षांशी वाटाघाटी करण्याची जबाबदारी आपल्या सहकाऱ्यांवर सोपवत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026मध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना झाले. या परिषदेसाठी मुख्यमंत्री...

मुंबईत भाजपाला मिळाली सुमारे २२ टक्के मते

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुरूवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण २२७ जागांपैकी ८९ जागा जिंकत भारतीय जनता पार्टी (भाजपा) सर्वाधिक प्रभावी ठरली. भाजपाने ८९ जागांवर विजय मिळवत एकूण ११,७९,२७३ मते प्राप्त केली. एकूण मतदानाच्या तुलनेत भाजपाच्या मतांचा वाटा २१.५८ टक्के असून, विजयी...
Skip to content