Homeहेल्थ इज वेल्थ‘डायल 108’ने 10...

‘डायल 108’ने 10 वर्षांत केली 1 कोटी रूग्णांची ने-आण

आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत ‘डायल 108’ ही रूग्णवाहिका सेवा अत्यंत उपयोगी ठरली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या सेवेने राज्यातील नागरिकांची आरोग्यसेवा करीत तब्बल 10 वर्ष पूर्ण केली आहेत. या 10 वर्षांच्या कालावधीत या रूग्णवाहिका सेवेने राज्यात 1 कोटी 3 हजार 446 रूग्णांची विनामूल्य आरोग्यसेवा केली आहे.

कुणी आजारी असेल, अपघात झाला असेल किंवा वैद्यकीय सेवेची मदत हवी असेल तर 108 क्रमांकावर रूग्णवाहिका सेवेसाठी तत्पर असते. आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी ‘एक-शून्य-आठ’ हा विनामूल्य दूरध्वनी क्रमांक आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग व भारत विकास ग्रुपच्या (बीव्हीजी इंडिया) संयुक्त विद्यमाने ही सेवा अव्याहतपणे राज्यात ठिकठिकाणी चालविण्यात येत आहे.

महाराष्ट्रात या सेवेची सुरूवात जानेवारी 2014मध्ये झाली. या सेवेत राज्यात सध्या 937 रूग्णवाहिका असून सर्व रूग्णवाहिकेत पल्स ऑक्स‍िमीटर, मेडिकल ऑक्सिजन यंत्रणा सज्ज आहे. ही देशातील अविरत 24 तास डॉक्टर व अत्यावश्यक वैद्यकीय सुविधेसह असणारी एकमेव यंत्रणा आहे. राज्यात 108 क्रमांकावरील रूग्णवाहिकेमध्ये 40 हजार 213 प्रसूती करण्यात येऊन बाळ-बाळंतीणीला सुखरूप सोडण्यात आले आहे. 4 हजार 34 रूग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासाची (व्हेंटीलेटर) सुविधा देण्यात येऊन त्यांचे प्राण वाचविण्यात आले आहे.

राज्यात कोणत्याही ठिकाणावरून मोबाईल अथवा दूरध्वनीवरून 108 क्रमांक डायल करताच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रूग्णांना विनामूल्य आणि वेळेत रूग्णवाहिका सेवा देण्यात येते. सेवा सुरू झाली तेव्हापासून, जून 2024पर्यंत अपघाती घटनांमध्ये रूग्णवाहिकेमधून 5 लाख 22 हजार 682 रूग्णांना उपचारासाठी रूग्णालयात पोहोचविण्यात आले आहे. आगीच्या घटनांमध्ये 29 हजार 253, हृदयरोगामध्ये 75 हजार 593, उंचावरून पडून जखमी झालेल्या 1 लाख 58 हजार 684, विषबाधाप्रकरणी 2 लाख 32 हजार 426, प्रसूतीवेळी 16 लाख 56 हजार 94, शॉक किंवा वीज पडून जखमी झालेल्या घटनांमध्ये 6 हजार 949 रूग्णांना सेवा देण्यात आली आहे. अशाप्रकारे राज्यात 1 कोटी 3 हजार 446 रूग्णांना आरोग्य सेवा 108 क्रमांकाच्या माध्यमातून मिळाली आहे. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा या नावाने असलेल्या ही रूग्णवाहिका सेवा सुरू आहे.

याव्यतिरिक्त राज्यात नाशिक येथील महाकुंभमेळा कालावधीत या रूग्णवाहिकांनी 1 लाख 7 हजार 200 रूग्णांना सेवा दिली. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या पंढरपूरच्या वारीमध्ये 2 लाख 89 हजार 646 आणि गणपती उत्सवात 4 हजार 684 रूग्णांना सेवा दिली आहे. राज्यात 108 क्रमांकाची रूग्ण्वाहिका सेवा संजीवनी आहे. गरीब रुग्णांना या सेवेमुळे वेळेत उपचार मिळण्यासाठी मोलाची मदत झाली आहे. कोरोना काळात ही सेवा जीवनदायी ठरली आहे.

या सेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा सेवेच्या समाधानाबाबत नागरिकांचा प्रतिसाददेखील (फिडबॅक) घेण्यात येतो. राज्यात सेवेबद्दल 6 लाख 74 हजार 542 प्रतिसाद प्राप्त झाले आहे. यामध्ये 81 हजार 155 एकदम उत्तम, 5 लाख 70 हजार 594 उत्तम आणि 22 हजार 793 चांगला प्रकारातील आहे.  

           

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content