Homeपब्लिक फिगरमुख्यमंत्र्यांचे उद्यापासून माझी...

मुख्यमंत्र्यांचे उद्यापासून माझी लाडकी बहिण कुटूंब भेट अभियान

शासनाच्या १० महत्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, १० सप्टेंबरपासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटूंब भेट अभियानाला सुरुवात करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १५ कुटुंबांची भेट घेऊन अभियानाचा शुभारंभ करणार आहेत.

आज वर्षा निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या अभियानाची माहिती दिली. या अभियानात शिवसैनिक दररोज १५ कुटुंबाची भेट घेतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा ज्यांना लाभ झालाय त्या कुटुंबांना आणि ज्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली नाही, अशा कुटुंबांचीदेखील भेट घेऊन त्यांना योजनेत सामावून घेण्याचे प्रयत्न केले जातील. उद्या मुख्यमंत्री लाडकी बहिण कुटूंब भेट अभियानाचे ॲप लाँच होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माफ योजना, कामगार कल्याण योजना, महिला बचत गटासाठी विविध योजना अशा टॉप १० योजनांबाबत कुटुंबांना माहिती देणे, योजनांचा लाभ मिळाला की नाही याबाबत विचारपूस करणे, लाभ मिळाला नसेल तर तो मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करणे, शासनाच्या इतर योजनांची प्रक्रिया कुटुंबियांना समजावून सांगणे हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटूंब भेट अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे कुटुंबातील एखादा वंचित असल्यास त्याची नोंद घेऊन या अभियानामुळे त्याला लाभ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला.

या कुटूंब भेटीत काही मागायला नाही तर जनतेला देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या धोरणांनुसार ही मोहीम राबवली जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या नोंदणीला ३० सप्टेंबर २०२४पर्यंत मुदवाढ दिली आहे. या योजनेचे अनेकांनी चांगले अनुभव सांगितले. बहिणींना खऱ्या अर्थाने मदतीचा हात देणारी ही योजना आहे. आतापर्यंत सुमारे २ कोटी महिलांनी या योजनेत अर्ज केले. त्यापैकी १ कोटी ६९ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आतापर्यंतच्या इतिहासात संपूर्ण कुंटुंबासाठी कल्याणकारी योजना आल्या नव्हत्या. अर्थव्यवस्थेला चालना देणारी सर्वात मोठी शक्ती महिला आहे. घराचे बजेट चालवणारी महिला असून तिच्या हाती येणारे पैसे पुन्हा अर्थव्यवस्थेत येणार आहेत. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत झाली तर त्याचा देशाला फायदा होईल. महाराष्ट्र आज उद्योग, इन्फ्रा, कृषी, गुंतवणूक या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे.

यापूर्वी शासन आपल्या दारी, या योजनेत राज्यातील ५ कोटींहून अधिक नागरिकांना लाभ मिळाला. सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांवरुन पाच लाख रुपये इतकी वाढवली. हे सरकार शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, वारकरी, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच घटकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

Continue reading

४ दिवसांत आज पुन्हा पेट्रोल व डिझेल महागले!

देशात गेल्या चार दिवसांत आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल महागले. पेट्रोलच्या किंमतीत ८७ पैसे प्रति लीटर तर डिझेसच्या किंमतीत ९१ पैसे प्रति लीटर वाढ करण्यात आली आहे. आज, मंगळवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ अंमलात आली आहे. तीन दिवसांपूर्वी १६ मे...

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी २० मेपासून प्रवेश

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वास्तुकला पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी येत्या २० मेपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. ही प्रवेशप्रक्रिया वेळेत राबविण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांना...

आधार समुदाय पोहोच शिबिरांचे यशस्वी आयोजन

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI)अंतर्गत आधार सेवा केंद्र (ASK), वाशी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) यांच्या सहकार्याने १० आणि ११ मे २०२६ रोजी नवी मुंबईतल्या महापे आणि सीबीडी बेलापूर येथे विशेष आधार...
Skip to content