काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाममध्ये पाक अतिरेक्यांनी तेथली पर्यटकांवर धर्म विचारून गोळ्या घातल्याच्या घटनेचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अतिशय प्रतिष्ठित आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या कुलाबा येथील ‘ताज महाल पॅलेस’ आणि नरिमन पॉईंट येथील ‘ट्रायडंट’ या पंचतारांकित हॉटेल्सना दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
अज्ञात व्यक्तीने हॉटेलच्या प्रशासनाला फोन करून हल्ल्याची धमकी दिल्याची माहिती समोर येताच मुंबई पोलिसांनी तातडीने हालचाली करत दोन्ही हॉटेल परिसरात कडक सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून हॉटेलच्या इमारतींची आणि परिसराची कसून तपासणी करण्यात आली असून, हॉटेलमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आणि वाहनांची सखोल तपासणी केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह आणि दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.
हा धमकीचा फोन एका परदेशी क्रमांकावरून आल्याचा संशय आहे. संभाव्यतः हा पाकिस्तानमधील ‘+९२’ कोड असलेला क्रमांक मानला जात आहे. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात या दोन्ही वास्तूंचे झालेले नुकसान लक्षात घेता, पोलीस प्रशासनाने ही धमकी अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. मात्र, ताज्या माहितीनुसार प्राथमिक तपासणीत अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळलेली नाही. त्यामुळे हा अफवा पसरवण्यासाठी केलेला बनावट फोन (‘होक्स कॉल’) असण्याची शक्यता अधिक आहे. याप्रकरणी कुलाबा आणि मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुंबई गुन्हे शाखेचे सायबर सेल पथक तांत्रिक विश्लेषणाद्वारे या कॉलचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करत आहे. नागरिकांनी आणि पर्यटकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

