मुंबईत मल्लखांब लव संघ, सुविद्या प्रसारक संघ आणि आर्किटेक्चर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली (पश्चिम) येथे “५वी अजिंक्यतारा मल्लखांब चषक स्पर्धा” उत्साही वातावरणात नुकतीच संपन्न झाली. ही स्पर्धा मल्लखांब खेळातील अनभिषिक्त सम्राट दत्ताराम दुदम यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येते. मुंबई विभागीय स्तरावर झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातील ५० संघांमधून जवळपास १ हजारपेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. यात सुविद्या, समता, मुंबादेवी, दहिसर विद्या मंदिर, समर्थ, श्रीमा, ऋतुराज, या संघानी सर्वात जास्त पारितोषिके मिळवली.

स्पर्धाप्रमुख म्हणून आशिष देवल व स्पर्धा सचिव म्हणून संचिता देवल यांनी स्पर्धेची जबाबदारी उत्तमपणे पार पाडली. कर्ममूर्ती महादेव रानडे, मुंबईचे उपमहापौर संजय घाडी, नगरसेविका सीमा शिंदे, सुप्रसिद्ध कलाकार भाग्यश्री मिलिंद, ओंकार भोजने, समाजसेवक प्रशांत पाटील, एअरमार्शल गजेंद्र सर, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकारी मंगेश नाईक, एअरफोर्स अधिकारी वाडकर, सुप्रसिद्ध उद्योजfका सोनाली कोचरेकर या मान्यवरांनी स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत सुविद्यालय शाळा, मुंबादेवी विद्यानिकेतन, दहिसर विद्यामंदिर, समता क्रीडा भवन, बोरीवली स्पोर्ट्स कल्चरल सेंटर, शैलेन्द्र एज्युकेशन सोसायटी, समर्थ व्यायाम मंदिर, श्रीमा गुरुकुल, ऋतूराज स्पोर्ट्स अकादमी या संघांनी सर्वाधिक पारितोषिके पटकावली.

भारतातील एकमेव पॅरा मल्लखांब स्पर्धादेखील यावेळी पार पडली., यामध्ये ५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरलेल्या पॅरा मल्लखांब स्पर्धेतील खेळाडूंनी स्पर्धा आयोजकांचे कौतुक केले, तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मल्लखांब लव टीमचे आभार मानले. पुढील वर्षी या स्पर्धेत अधिक मोठ्या संख्येने खेळाडूंचा सहभाग असेल असा विश्वास स्पर्धाप्रमुख आशिष देवल यांनी व्यक्त केला.

