बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या राजकीय रणधुमाळीत सोमवारी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे सुपूर्द केला. या अर्जाद्वारे त्यांनी बारामतीच्या राजकीय रिंगणात आपली दावेदारी निश्चित केली असून, यावेळी समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. उमेदवारीअर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी कौटुंबिक परंपरेला आणि वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाला प्राधान्य दिले. त्यांनी काटेवाडी येथे जाऊन अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांची भेट घेतली आणि त्यांचे आशिर्वाद घेतले. राजकीय प्रवासाच्या या महत्त्वाच्या वळणावर घेतलेली ही भेट आणि मिळालेले आशीर्वाद सध्या बारामतीत चर्चेचा विषय ठरत आहेत.
अर्ज भरण्याच्या या प्रक्रियेनंतर आता बारामतीमध्ये प्रचाराचा धुरळा अधिक जोमाने उडणार आहे. पवारांच्या या बालेकिल्ल्यात होणारी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून, उमेदवारीअर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवार आता प्रत्यक्ष जनसंपर्कावर आणि विकासकामांच्या मुद्द्यांवर भर देणार असल्याचे दिसून येत आहे. ज्या बारामतीत अजितदादांनी शेवटचा श्वास घेतला त्या बारामतीला आपण कधीही अंतर देणार नाही. बारामतीचा विकास हेच आपले ध्येय आहे. बारामतीकर हाच आपला परिवार आहे, असे सुनेत्रा पवार यांनी मतदारांशी साधलेल्या संवादात सांगितले.

