राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील “राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!” हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील समर्पण, अनुभव आणि योगदानाचे मोल विशद केले.
पंतप्रधान मोदी यांनी निवृत्त खासदारांना सांगितले की, राज्यसभेतून बाहेर पडणे म्हणजे राजकीय प्रवासाचा अंत नाही. देशसेवेची उर्मी आणि अनुभवाची शिदोरी घेऊन हे नेते समाजात नव्या रूपाने कार्यरत राहू शकतात. त्यांनी या खासदारांच्या कार्यकाळातील योगदानाचे कौतुक करताना राज्यसभेला “लोकशाहीचे परिपक्व व्यासपीठ” असे गौरवोद्गार काढले.
मोदी यांनी राजकीय जीवनातील चढउतारांवर भाष्य करताना सांगितले की, प्रत्येक टप्पा हा नव्या संधीची सुरुवात असतो. दीर्घ संसदीय अनुभव ही देशाची अमूल्य संपत्ती असून निवृत्त खासदारांनी आपले ज्ञान व अनुभव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही त्यांनी केले. सभागृहातील या भाषणाने उपस्थित सर्वपक्षीय सदस्यांवर त्यांनी प्रभाव पाडला.
विविध पक्षांचे अनेक ज्येष्ठ खासदार राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यावेळच्या पंतप्रधानांच्या “बीटवीन दी लाईन्स” वक्तव्याने राजकीय वर्तुळात सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. “फुलस्टॉप नसतो” हे त्यांचे शब्द केवळ निवृत्त खासदारांसाठीच नव्हे, तर देशातील प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणेचा स्रोत ठरले आहेत.

