ज्या बातम्या आणि शीर्षके जून अखेरीकडे वा खरेतर जुलैच्या मध्यावर अपेक्षित असतात, ती यंदा बरीच आधी झळकू लागली. “मुंबईत संततधार, पुण्यात पावसामुळे वाहतूककोंडी, पावसाने दाणादाण, मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा महामार्गांवर कोंडी, जगबुडी दुथडी भरून वाहू लागल्याने गावात पाणी, झाडं कोसळली, गावांना पुराचा वेढा…” अशा बातम्या साधारणतः जुलैमध्ये आपल्याला एरवी पाहयला मिळत असतात. यावेळी मात्र सारे उलटंच झाले आहे. निसर्गाच्या चमत्काराने मुंबई, पुण्यासह महाराष्ट्र पंधरा दिवस आधीच पावसाच्या तडाख्यात सापडला. पावसाळा अधिकृतरीत्या मेच्या अखेरीसच सुरु झाला आहे. खरे तर वर्षानुवर्षांच्या ठरलेल्या गणितानुसार, खरे तर ठोकताळ्यांनुसार, मेच्या शेवटच्या सप्ताहात नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन अंदमान बेटांवर होते. तिथून तो बंगालच्या उपसागरात थोडा वेळ निवांत राहून मग 1 जूनच्या सुमारास केरळच्या किनाऱ्यावर थडकतो. केरळ, कर्नाटक व्यापून मोसमी पाऊस 7 जूनला कोकणात थडकतो आणि मग पुढच्या एक-दोन दिवसात तो रायगड ओलांडून मुंबईत बरसतो. हे आपले सामान्यज्ञान यंदा कुठच्या कुठे उडून गेले. मॅडन ज्युलीयन ऑस्सीलेशन या वातावरणीय उडत्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन हा मोसमी पाऊस असा सुसाट आला की अंदमानात मेच्या दुसऱ्या, तिसऱ्या सप्ताहातच दिसला आणि अवघ्या सात-आठ दिवसांत म्हणजे 24 मे रोजीच केरळात थडकला. हा पाऊस आता चार-सहा दिवासंनी पुढे महाराष्ट्राकडे सरकेल असे वाटत असताना अवघ्या दोन दिवसांत 26 मे रोजीच तो सुरुही झाला!
सहाजिकच जनतेची तारांबळ उडणे अपरिहार्यच होते. एकेकाली आपण हवामान खात्यावर उलट्या बाजूने विसंबून राहायचो. म्हणजे हवामान खात्याने जर सांगितले की आज पाऊस येणार, तर लोकं त्यादिवशी पाऊस मुळीच येणार नाही, असेच गृहित धरून बाहेर पडायची. कारण हवामानाचे अंदाज बऱ्याचदा चुकत असायचे. पण आता उपग्रहांनी आणि विविध आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेल्या भारतीय हवामान विभागाचे पावसाचे अंदाज नेमकेपणाने खरे होत असतात. आता हवामान विभाग अशाही सूचना देतो की पुढच्या चार तासात या या भागात मोठा पऊस येण्याची शक्यता आहे आणि त्या पद्धतीने तितका मोठा पाऊस कोसळतो असा अनुभव येतो. त्याप्रमाणे यंदा पाऊस लवकर येणार याचे अंदाज हवामान विभागाने योग्य पद्धतीने घोषित केले होते. पण इतक्या लवकर इतका मोठा पाऊस येईल हे कुठेतरी पटले नव्हते. त्यामुळे पहिल्या पावसात दाणादाण उडाली. नशिबाने तो शनिवार-रविवरचा, तसा सुटीचा काळ होता. पण नंतर रविवारी रात्री व सोमवारी सकाळी जोरदार पाऊस पडल्याने सारीच शहरे तुंबून गेली. मुंबईचे हाल तर मोठे होते. विशेषतः मेट्रो स्टेशनात पाणी घुसले ही बातमी लोकांची भीतीने गाळण उडवणारी अशीच ठरली. त्या घटनेचा मानिसक आघात मुंबईकरांवर झाला असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. अर्थातच मेट्रो स्टेशनात पाणी का व कसे घुसले याची चौकशी होईल. योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाईही केली जाईल. म्हणजेच यापुढे असा मोठा पऊस झाला तरी मेट्रोचे स्थानक बंद करावे लागणार नाही अशी काळजी घेतली जाईल.

नव्याने सुरु झालेल्या मेट्रो 3 च्या म्हणजेच कुलाबा-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गावरील वरळी नाक्याजवळचे म्हणजेच आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशनाच्या बाहेर पडण्याच्या मार्गामधून धबाधब पाणी आत येत होते. तिथला काही भाग कोसळल्याचेही दिसत होते. ही सारी दृष्ये टीव्हीच्या पडद्यावर पाहणाऱ्यांना नक्कीच घाबरायला झाले असणार. “मेट्रो वुमन” असा ज्यांचा सार्थ गौरव झाला, त्या आयएएस अधिकारी, अश्विनी भिडे यांनी सांगितले की, आचार्य अत्रे चौक स्थानकाबाहेरची कामे अजूनही सुरु होती. त्यातील एका खड्ड्यात दीड तासात अकरा लाख लीटर इतके पाणी जमले. जेव्हा मोठा पाऊस कोसळत होता ती नेमकी समुद्राची भरतीची वेळ होती. मुंबईत भरतीच्या वेळेत मोठा पाऊस आला तर पावसाळी गटारे निकामी ठरतात. तशी स्थिती तेव्हा होती. पाण्याचा उलटा दाब होता. त्यात काही माती वाहिल्यामुळे स्टेशनाची पाणी थोपवणारी भिंत पडली व पाणी तिकीटविक्रीच्या स्तरावर (काँकोर्स) व खाली उतरणाऱ्या जिन्यांवर पोहोचले. पण मेट्रोचा मुख्य बोगदा तसेच रूळ मार्ग हे सारे कोरडेच होते. फक्त त्या स्थानकातील मेट्रो गाड्या बंद केल्या गेल्या. बाकी वाहतूक सुरुळीतच सुरु होती..
मुंबईत 26 मे रोजी थडकलेला पाऊस गेल्या सात दशकांत सर्वात लवकर आलेला पाऊस ठरला. भारतीय हवामान विभागाने 1950पासून भारतातील मोसमी पावसाची आकडेवारी व तारखांची नोंद घेतली व ठेवली आहे. यापूर्वी 1956मध्ये 29 मे रोजी मुंबईत पाऊस आला होता. ते रेकॉर्डही यंदा मोडले गेले. 26 मेलाच पाऊस सुरु झाला. त्यातही केरळला 24 तारखेला आणि देवगडला 25 मे रोजी पोहोचलेला पाऊस पुढच्या चोवीस तासात मुंबईत यावा हा रेकॉर्ड तर चकित करणाराच आहे. इतक्या सुपरफास्ट वेगाने पाऊस आला, तो मॅडेन ज्युलीयन ऑस्सीलेशन, एमजेओ या पर्यावरणीय घटकावर स्वार होऊन.. आता असा निष्कर्ष हवामान शास्त्रज्ञांनी काढला आहे. एमजेओ ही अशी एक वातावरणीय घटना आहे की, ज्यात विषववृत्तावरून बाष्प घेऊन येणारे वारे भारतीय उपखंडावर मोसमी पाऊस पोहोचवत असतात. 1970-71मध्ये अमेरिकेतील रोनाल्ड मॅडेन व पॉल ज्युलीयन या दोघा हवामान शास्त्रज्ञांनी हा घटक प्रथम शोधला. म्हणून त्यांची नावे या पर्यावरणीय घटकाला बहाल झाली. ही एमजेओ ही घटना दिंदी महासागरात सुरु होते. पूर्वेकडे वेगाने वाहणारे वारे बाष्प व ढग यातून ती तयार होते. याचा वेग सेकंदाला चार ते सहा मीटर असा प्रचंड असतो. तीस ते साठ दिवसांचा या वाऱ्यांचा प्रवास असतो.

22 मे रोजी भारतीय हवामान विभागाने (आयएमडी)ने जाहीर केले होते की एमजेओ घटक सध्या चौथ्या टप्प्यात पोहोचला असून त्यातून लवकर पाऊस येण्याची सूचना मिळते. विषववृत्तावरून दक्षिणेकडून उत्तरेकडे बाष्प आणि ऊष्णता एकत्रित घेऊन हे वारे वेगाने भारताच्या दिशेने येत असल्याचे 22 मेचे निरिक्षण होते आणि तीच मोसमी पावसाच्या आगमनाची पूर्वसूचनाही होती. याआधी 1956, 1969 आणि 1971 अशा तीन वर्षी पावसाळ्याचे आगमन 29 मेला झाले होते. ते रेकॉर्ड यंदाच्या अतिवेगवान एमजेओ घटनेमुळे तुटले आहे. आयएमडीच्या शास्त्रज्ञांनी मोसमी पावसाचे आगमन अधिकृतरीत्या जाहीर जरी केले असले तरी लंडनमधील काही हवामान शास्त्रज्ञांच्या मते मेमध्ये पडलेला पाऊस हा पूर्वमोसमी म्हणजे, ज्याला आपण साध्या भाषेत, वळिवाचा पाऊस म्हणतो, तसा होता. मात्र आयएमडीने म्हटले आहे की, मोसमी पाऊस सुरु झाला, पावसाचे आगमन झाले आहे. हा वळीवाचा पऊस नाही हे ठामपणाने म्हटले. पावसाच्या या आगमनामुळे यंदाचे वर्ष मेमध्ये सर्वाधिक पाऊस असण्याचे वर्षही ठरले आहे.
मोसमी पाऊस सुरु झाला हे आयएमडी कोणत्या मुद्द्यांद्वारे वा कोणत्या अनुमानाद्वारे जाहीर करते असा प्रश्न सहाजिकच उभा राहतो. त्यासाठी अनेक शास्त्रीय आधार घेतले जातात. आयएमडीची चौदा जलमापन केंद्रे भारताच्या दक्षिण टोकाकडे आहेत. लक्षद्वीप, केरळ व कर्नाटकातील या 14 जलमापन केंद्रांमध्ये सलग दोन दिवस 2.5 मिलीमीटर वा त्यापेक्षा अधिकचा पाऊस नोंदला गेला, तर मग मोसमी पाऊस सुरु झाला असे मानले जाते. दुसरा मुद्दा असतो तो वाऱ्यांच्या वेगाचा व वाऱ्यांच्या उंचीचा. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे अक्षांश रेखांशांच्या विशिष्ट चौकटीमध्ये किती तीव्रतेने वाहत आहेत व ते किती उंचीवरून वाहत आहेत हे उपग्रहांच्या मदतीने मोजले जाते. त्यावरूनही मोसमी पाऊस सुरु झाल्याचे ठरवले जाते. जमीन, सागर तचेच वातावरणातून, वरच्या दिशेने बाहेर पडणारी ऊष्णता (आऊट गोईंग लाँगवेव्ह रेडिएशन) याची मोजणी इनसॅटवरून केली जात असते. त्याआधारेही मोसमी पावसाचे आगमन निश्चित होत असते. या सर्व मुद्दायंच्या आधारे पावसाळा सुरु झाल्यची घोषणा 24 मे रोजी झाली आहे.
यंदाचा मोसमी पाऊस लवकर कसा आला याचे अनुमान आयएमडीने कढले आहे. ते असे आहे की, अरबी सागर आणि बंगालचा उपसागर यातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा यंदा बरेच अधिक नोंदले गेले. त्याचाही मोठा हात मोसमी पावसाचे लवकर आगमन होण्यामध्ये आहे. एमजेओ घटनेचाही वेग यावेळी अधिक राहिला. सोमाली जेट नावाने ओळखले जाणारे अतिउंचावरून, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे, अरुंद पट्टयातील तीव्र वारे (जेट) हे मॉरिशस ते मागदागास्कर टापूत सुरु होतात. हे वारे भारतीय उपखंडाकडे बाष्पयुक्त हवा ढकलत असतात. हे वारे यंदा अधिक सक्रीय राहिले. या सर्व घटकांना, अरबी सागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणखी गती मिळाली आणि मोसमी पाऊस नेहमीपेक्षा दोन आठवडे आधीच महाराष्ट्रात धडकला. पण आता रशियावर तयार झालेल्या अति दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रापुढे होणारी पावसाची प्रगती थोडी अडखळणार आहे. तरीही येत्या आठवड्यात पावसाची घोडदौड पुन्हा जोरात सुरु होईल, असे हवामान शास्त्रज्ञांचे अनुमान आहे.