एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जातात. मात्र, जून २०१८पासून राज्यभरातील तब्बल ७ हजार ५०० निवृत्त झालेल्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना ही रक्कम अद्यापही महामंडळाकडून मिळालेली नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे असे सुमारे २०० कोटी रुपये देणे थकित असून हे कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयांत गेल्या चार वर्षांपासून चकरा मारत आहेत.
ही रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी नाही. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारकडून एसटीला निधी द्यावा अशी मागणी करणारे पत्र मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी आज राज्य सरकारकडे पाठवले आहे.
७१हून जास्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू
संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एसटी महामंडळाच्या सेवेत झिजवल्यानंतरसुद्धा महामंडळाच्या साडेसात हजार निवृत्त एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे स्वतःच्या हक्काचे पैसे महामंडळाकडून थकविण्यात आले आहेत. गेल्या चार वर्षांपासून पैशांची चणचण असल्याने पैसे मिळविण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. मात्र, महामंडळाने निवृत्त कामगारांचे पैसे दिलेले नाहीत. गेल्या चार वर्षांत ७१पेक्षा जास्त निवृत्त कामगारांचा मृत्यूही झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनावरील उपचारांसाठीही पैशाची चणचण
सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांपैकी, अंदाजे ७१ कर्मचारी व अधिकारी मृत्यू पावल्याची माहिती समोर आली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. निवृत्तीनंतरची सर्व देणी तत्काळ देण्याचे परिपत्रक असताना महामंडळात निवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांची थकीत देणी मिळालेली नाहीत. हे अन्यायकारक असून मुळात इतरांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. त्यामुळे साहजिकच त्यांना निवृत्तीनंतरची रक्कमसुद्धा कमी मिळते. त्यातही सदर रक्कम थकित राहिल्याने निवृत्त कर्मचारी व अधिकारी संकटात सापडले आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनावरील औषधोपचारासाठीसुद्धा रक्कम कामी आलेली नाही, असे जगताप यांनी या पत्रात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांना पत्र
आशिया खंडातील सर्वाधिक मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये एसटी महामंडळ गणले जाते. तरीही २०१८पासून ७हजार ५०० कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरक मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सर्व निवृत्त कामगारांना व अधिकाऱ्यांना निवृत्तीचे थकित पैसे व्याजासह मिळण्यासाठी राज्य सरकारने निधी द्यावा अशी मागणीही आमदार जगताप यांनी केली आहे.

