Homeटॉप स्टोरीविधान परिषदेतल्या दोघा...

विधान परिषदेतल्या दोघा आमदारांचे भवितव्य आज निश्चित?

महाराष्ट्र विधान परिषदेचे १५ सदस्य याच महिन्यात निवृत्त होत असून यातल्या तीन सदस्यांचा सभागृहातला प्रवेश निश्चित झाला असून दोघांचे भवितव्य आज निश्चित होण्याची शक्यता आहे. निवृत्त होणारे दोन आमदार, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. याच निवडणुकीत उमेदवारीअर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. त्यावर या दोन्ही सदस्यांच्या विधान परिषदेतल्या पुनर्प्रवेश अवलंबून आहे.

विधानपरिषदेतील सदस्य विलास पोतनीस, निरंजन डावखरे, किशोर दराडे आणि कपिल पाटील येत्या सात जुलैला निवृत्त होत आहेत. अनिल परब, महादेव जानकर, डॉ. मनीषा कायंदे, विजय ऊर्फ भाई गिरकर, बाबाजानी दुर्राणी, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. मिर्झा वजाहत, डॉ. प्रज्ञा सातव आणि जयंत पाटील येत्या २७ जुलैला निवृत्त होत आहेत. यातले निरंजन डावखरे, किशोर दराडे आणि अनिल परब पुन्हा निवडून आले आहेत. त्यामुळे या सदस्यांचा विधान परिषदेतला पुनर्प्रवेश निश्चित झाला आहे. डॉ. प्रज्ञा सातव तसेच जयंत पाटील यांनी विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या मतदारसंघातून उमेदवारीअर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघातून ११ सदस्य निवडून जायचे आहेत. त्याकरीता आताच्या घडीला १२ उमेदवार रिंगणात आहेत. आहेत. आज उमेदवारीअर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. जर या दोघांव्यतिरिक्त कोणी उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला तर हे दोन्ही सदस्य पुन्हा विधान परिषदेत दिसतील.

या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून पाच तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी दोन उमेदवार देण्यात आले आहेत. विरोधकांकडून डॉ. प्रज्ञा सातव, जयंत पाटील यांच्याबरोबरच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. सत्ताधारी महायुतीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवार मागे घेणार नसल्याचे ठासून सांगितले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने एक उमेदवार मागे घेतला तरच ही निवडणूक बिनविरोध होईल. नाही तर १२ जुलैला होणाऱ्या निवडणुकीनंतरच प्रज्ञा सातव आणि जयंत पाटील यांचा विधान परिषदेतला पुन्हा प्रवेश निश्चित होईल.

निवृत्त होणाऱ्या सदस्यांची कामगिरी होणार इतिहास – एकनाथ शिंदे

दरम्यान, काल विधान परिषदेत पुढच्या अधिवेशनाआधी निवृत्त होणाऱ्या या १५ सदस्यांना निरोप देण्यात आला. विधान परिषद महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने वरिष्ठ सभागृह आहे. त्याचा नावलौकिक उंचावणारी कामगिरीच आज निवृत्त होणाऱ्या सदस्यांनी केली आहे. या कामगिरीची दखल विधिमंडळाच्या कामकाजाच्या रुपाने इतिहास म्हणून नोंदवली गेली आहे. येणाऱ्या पिढ्यांना या सदस्यांचे काम या कामकाजाच्या नोंदीवरून अभ्यासता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

ही नव्या कार्यकाळाची सुरूवात – देवेंद्र फडणवीस

विधान परिषदेतील कार्यकाळ पूर्ण झालेल्या सदस्यांची ही निवृत्ती नाही किंवा त्यांना निरोप नाही तर त्यांचा एक कार्यकाळ संपतोय आणि ते दुसऱ्या वेगळ्या कार्यकाळाची सुरूवात करताहेत असे मी मानतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.

जनमानसांना न्याय देण्याचे कार्य – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या की, सर्व सदस्यांनी जनतेच्या समस्या मांडण्यासाठी प्रश्न, लक्षवेधीसह विविध संसदीय आयुधे वापरली. त्यांचे समाजकारण पुढेही असेच सुरू राहवे.

यानंतर विधिमंडळात विधानसभेचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधान परिषदेच्या उपसभापती यांच्यासमवेत सदस्यांचे एकत्रित छायाचित्र काढण्यात आले. यावेळी सतेज पाटील, शशिकांत शिंदे, अनिल परब, कपिल पाटील, भाई गिरकर, मनीषा कायंदे, डॉ. वजाहत मिर्झा, किशोर दराडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

Continue reading

अमित शाहच आहेत बंगालमधल्या परिवर्तनाचे सूत्रधार!

पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये...

ओss जादूगर…

ए जादूगर.. तेरे नयना.. दिल जाएगा बच के कहाँ?... संजीव कुमार आणि वहिदा रहमान यांचे १९७१मधल्या मनमंदिर, चित्रपटातले सदाबहार गीत आजही प्रत्येकाला भुरळ घालते. या गीताचीच परवा आठवण झाली, जेव्हा लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देश्यून...

राजीनाम्याची हूल देणाऱ्या ठाकरेंच्या आमदारकीला आज निरोप!

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर २०२२मध्ये शिंदेंबरोबर जाणाऱ्या शिवसेनेतल्या आमदारांना तसेच शिवसैनिकांना रोखण्याकरीता तेव्हाच्या अखंड शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा तसेच विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची भावनात्मक घोषणा केली. त्यानंतर ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र,...
Skip to content